मराठी नाटकांच्या विदेश दौ-याच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. या विदेश दौ-यांचं आर्थिक गणित नेमकं कसं असतं आणि त्यातून नाटकांना काही फायदा होतो का?
मराठी नाटकांनी परदेशी जाण्याची गोष्ट नवी नाही. गेली तीस-पस्तीस र्वष तरी ही परंपरा सुरू आहे. विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’चे प्रयोग इंग्लंड-अमेरिकेत झाले होते. मालवणीसम्राट मच्छिंद्र कांबळीही ‘वस्त्रहरण’ घेऊन लंडनला गेले होते. त्यानंतर अनेक मराठी नाटकं विदेशात गेली. हल्ली तर दरवर्षी पाच-सात मराठी नाटकं विदेशात जात असतात. मराठी माणूस रोजीरोटीनिमित्त जगभर गेला आहे आणि तो कुठेही गेला तरी त्याची नाटकांची आवड सोडत आणि विसरत नाही. त्यामुळे त्याची नाटय़करमणुकीची भूक भागवण्यासाठी निर्माते आपली नाटकं तिकडे घेऊन जातात. अर्थात, परदेशात जाणारी मराठी नाटकं ही बहुतकेदा तिथली एखादी संस्था, मंडळ किंवा ग्रुपने आमंत्रित केलेली असतात. फारच कमी निर्माते स्वत:च्या हिमतीवर परदेशात नाटकं घेऊन जातात. किंबहुना याबाबतीत एकमेव नाव सुधीर भट आणि गोपाळ अलगेरी यांच्या ‘सुयोग’ या नाटय़संस्थेचंच घ्यावं लागेल. ‘सुयोग’नेच अमेरिकेसारख्या देशात पहिल्यांदा मराठी नाटकांचा महोत्सव आयोजित केला.
आपल्या नाटकांच्या या विदेशवारीविषयी बोलताना ‘सुयोग’चे गोपाळ अलगेरी यांनी सांगितलं, ‘आम्ही गेल्या सतरा वर्षात २८ नाटकं विदेशात नेली आहेत. त्यामध्ये ‘मोरूची मावशी’, ‘असा मी असामी’,‘ व्वा गुरू’, ‘मित्र’, ‘शू कुठे बोलायचं नाही’, ‘हिच तर प्रेमाची गंमत आहे’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी सगळ्या लोप्रिय नाटकांचा समावेश होता. १९९७ साली आम्ही ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक घेऊन पहिल्यांदा अमेरिकेत गेलो. आम्ही आजपर्यंत अमेरिका, इंग्लंड, दुबई, मस्कत, कुवेत, सिंगापूर, कॅनडा येथे मराठी नाटकं नेली आहेत. परदेशात नाटकं नेण्याचा आमचा एकमेव हेतू हाच होता की, तिथल्या मराठी माणसांना उत्तमोत्तम मराठी नाटकं पाहायला मिळाली पाहिजेत. म्हणूनच आम्ही अनेकदा नुकसान सहन करून, डोक्यावर कर्जाचा बोजा करून आम्ही विदेशात दौरे काढले. फायदा-तोटय़ाच्या पलीकडे जाऊन आम्ही हे केलं आहे.’
विदेशातील संस्था, मंडळाकडून आमंत्रण आल्यावर एखाद्या महोत्सवात वा अधिवेशनात नाटक करणं आणि निर्मात्याने स्वत:च जाऊन तिथे नाटक करणं यात बारच फरक असतो. नाटक आमंत्रित असल्यास निर्मात्याला फारसं काही करावं लागत नाही. नाटकाचे कलाकार-तंत्रज्ञांच्या जाण्या-येण्यापासून ते तिथल्या राहण्यापर्यंतचा खर्च आयोजकच करतो. शिवाय तिथे केलेल्या प्रयोगाची ठरावीक बिदागीही निर्मात्याला मिळते. याऊलट निर्मात्याने स्वत: नाटक परदेशात नेल्यास कलाकारांच्या व्हिसापासून जाण्यायेण्याच्या, राहण्याच्या, खाण्यापिण्याच्या सगळ्या खर्चाची जबाबदारी निर्मात्याला घ्यावी लागते. शिवाय यासाठी धावपळ करावी लागते ती वेगळी. यात फायद्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते.
‘सुयोग’चे गोपाळ अलगेरी सांगतात, ‘आम्ही आमची विदेशात नेलेली बहुतेक नाटकं स्वत:च विदेशी नेली आहेत. एवढंच नव्हे तर आम्ही मराठी नाटकांचे अनेक महोत्सव आजवर विदेशात भरवले आहेत. असा महोत्सव करायचा म्हणजे साधारणपणे महिनाभर तिकडे मुक्काम करावा लागतो. कारण विदेशात विकेंड म्हणजे फक्त शनिवार-रविवारीच शो होतात. एवढे दिवस दौ-यावर असलेल्या सगळ्यांची हॉटेलात सोय करावी लागते. कुणाच्या घरात राहिल्यास हा खर्च कमी होऊ शकतो, परंतु तिथे शेवटी गैरसोयच होत असल्याने ‘सुयोग’ने कधीच असं केलं नाही.
एवढंच नव्हे तर कलाकारांच्या साइटसीईंगचाही खर्च आम्हीच केला आहे. हा सगळा खर्च कोटय़वधींच्या घरात जातो. नाटक सादर करण्यासाठी आम्हाला तिथल्या एखाद्या मंडळाची मदत घेण्याशिवाय गत्यंतर नसतं. कारण तिकिटविक्रीची वगैरे व्यवस्था करावी लागते. याबदल्यात त्यांना कमाईच्या अमुक टक्के रक्कम द्यावी लागते. त्यानंतर जाहिरात वगैरे करून उर्वरित रक्कम आम्हाला मिळते. यात मंडळाचा कधीच लॉस होत नाही. कारण अमुक टक्के रक्कम मिळतेच. त्यामुळे तोटा झाला तर निर्मात्याला सहन करावा लागतो. या नाटकांना प्रत्येक शहरात असणा-या मराठी माणसांच्या संख्येनुसार प्रतिसाद मिळतो. अमेरिकेत हजार-बाराशे प्रेक्षक येतात. पण सिंगापूरसारख्या शहरात तीनशे प्रेक्षक आले तरी खूप असतात. यातही नेमक्या त्याच वेळी तिथल्या एखाद्या मराठी कुटुंबात लग्नसमारंभ असेल किंवा परीक्षेचा काळ असेल तर नाटकाच्या तिकिटविक्रीवर त्याचा परिणाम होतो. प्रेक्षकांची संख्या कमी होते.’
विदेशात नाटकांचे प्रयोग करताना अडचणींना सुरुवात तशी इथून निघतानाच होते. कलाकार-तंत्रज्ञांचा व्हिसा ही मोठी समस्या असते. कारण अमेरिकेसारख्या देशांत व्हिसाचे नियम अतिशय कडक आहेत. तिथे अनेक प्रकारची कागदपत्रं लागतात.
आपल्याकडे अनेकांकडे आयटी पेपर्स नसतात, कुणाच्या नावावर मालमत्ता नसते, कुणाच्या बँक अकाउंटमध्ये पुरेसे पैसे नसतात, एवढय़ा कारणाने व्हिसा मिळत नाही. व्हिसा मिळाला तरी किती जणांना घेऊन जायचं, हा प्रश्नच असतो. कारण अमेरिकेसारख्या देशात एका माणसाला न्यायचं तर अडीच-तीन लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे एखाद्या नाटकात दहा-पंधरा पात्र असतील, तर खर्च अफाट वाढतो. अशा वेळी तडजोड करावी लागते. एखादं पात्र नाटकातून कटाप करावं लागतं आणि फक्त मुख्य कलाकारालाच नेलं जातं. यासाठी संहितेतही थोडाफार बदल करावा लागतो. तंत्रज्ञांपेकी साउंड रेकॉर्डिस्ट आणि लाइटमनना मात्र न्यावंच लागतं. कारण त्याच्याशिवाय काम अडतं. कधी कधी तंत्रज्ञ किंवा दिग्दर्शकही एखादी छोटीशी भूमिका करतो. महोत्सव असल्यास मोजकेच कलाकार सगळ्या नाटकात भूमिका करतात. नाटकाचे सेटही अनेकदा पूर्णपणे नेता येत नाहीत. त्यामुळे कमी नेपथ्य, कमी तंत्रज्ञ घेऊन नाटकाचा प्रयोग सादर करावा लागतो. अर्थात, विमान कंपन्यांशी चांगले संबंध असल्यास सवलती मिळतात.
पण विदेशात प्रयोग करण्याचा नाटकांना काही फायदा होतो का? म्हणजे एखादं नाटक अमेरिकेत जाऊन आल्यावर इकडे ते चालायला लागतं का? तर तसं काही दिसत नाही. मुळातच साधारणपणे आपल्याकडे गाजलेल्या नाटकांनाच विदेशात आवतण मिळतं. त्यामुळे त्या नाटकांना अमेरिकेत जाऊन आल्याचा फायदा होण्याचा प्रश्नच नसतो आणि जे नाटक न चालणारं असतं, त्याला अमेरिकेतील प्रयोगाचा शिक्का लागला तरी काही फायदा होत नाही. फार तर जाहिरातीसाठी त्याचा वापर करता येऊ शकतो. तसंच थोडीफार माउथ पब्लिसिटी होते. या परदेश दौ-याचा सर्वात जास्त फायदा कलाकारांना होतो. त्यांना वेगळ्या प्रेक्षकांसमोर नाटक करण्याचा अनुभव मिळतो आणि या निमित्ताने देश-विदेशात त्यांचं पर्यटनही होतं.
‘प्राइस टॅग’ हे आमचं नाटक घेऊन नुकताच आम्ही अमेरिकेचा दौरा केला. न्यू जर्सी येथील ‘मराठी विश्व’ या संस्थेने आयोजित केलेल्या नाटय़महोत्सवाचं आम्हाला आमंत्रण मिळालं होतं. या महोत्सवात आम्ही पाच शहरांत पाच प्रयोग केले. तिथला अनुभव सांगायचा तर आम्हाला खूपच छान प्रतिसाद मिळाला. चारशे-पाचशे प्रेक्षक प्रत्येक प्रयोगाला असायचे. शाळांच्या हॉलमध्ये आम्ही हे प्रयोग केले. आमच्या दृष्टीने सांगायचं तर आम्हाला या अमेरिका दौ-याचा फायदाच झाला. कारण आमच्या जाण्या-येण्याचा आणि राहण्याचा सगळा खर्च आयोजकांनीच केला होता. तसंच प्रत्येक नाटकाला त्यांनी १२०० डॉलर्सचं मानधनही दिलं. आयोजकांनी या महोत्सवाचं खूप चांगलं आयोजन केलं होतं. त्यामुळे आयोजकांनाही तोटा झाला नाही. – प्रदीप वैद्य, दिग्दर्शक- प्राइस टॅग
पप्पांनी ‘वस्त्रहरण’ नाटक लंडनला नेलं होतं, पण मी माझं एकही नाटक विदेशात केलेलं नाही. कारण मला त्याचं फार अप्रूप किंवा आकर्षण नाही. कारण तिथे एकतर पैसे कमी मिळतात आणि ज्या फॉरमॅटमध्ये आपण नाटक करतो, त्यात तडजोड करून नाटक करण्यापेक्षा ते न केलेलं बरं, असं मला वाटतं. नाटक हा अख्खा प्रयोग असतो. त्यात काटछाट केल्यास वेगळाच प्रयोग सादर होतो. तसंच या सगळ्या प्रक्रियेतला क्लिष्टपणा सांभाळून तिथे नाटक करायला मला आवडत नाही. मुळातच जिथे कंफर्टेबल आहे, तिथेच मला नाटक करायला आवडतं. म्हणून माझ्या नाटकांचे नव्वद टक्के प्रयोग मुंबईतच केलेत. शिवाय नाटक लंडन, अमेरिकेला गेल्यावर नाटक चांगलं, मोठं होतं असं मला वाटत नाही. त्यापेक्षा मुंबईत नाटक चांगलं झालं तर मला अधिक समाधान मिळतं. – प्रसाद कांबळी, निर्माता
अमेरिकेत झालेल्या नुकत्याच झालेल्या महोत्सवात इकडची सगळी आखणी मी केली होती. यासाठी ‘मी रेवती देशपांडे’, ‘प्राइस टॅग’, ‘भय इथले संपत नाही’ आणि ‘काटकोन त्रिकोण’ या चार नाटकांची निवड आम्ही केली होती. या नाटकांच्या अमेरिका दौ-याचा सगळा खर्च आम्हीच केला होता. नाटकांना आम्ही मानधनही दिलं. अमेरिकेतील मराठी नाटकांची आवड असलेल्या प्रेक्षकांना चांगली नाटकं बघता यावीत, या महोत्सवाचा हेतू होता. – दीपक करंजीकर, कलाकार