विधानसभेतील कामकाजाचा दांडगा अनुभव, सामाजिक प्रश्नांची जाण व ते सोडवून घेण्याचे कौशल्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातच आहे.
मुंबई- विधानसभेतील कामकाजाचा दांडगा अनुभव, सामाजिक प्रश्नांची जाण व ते सोडवून घेण्याचे कौशल्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यातच आहे.
वांद्रे पूर्व मतदारसंघापुरतीच ही निवडणूक असली तरी राणे यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांचे विरोधक संपूर्ण शक्ती पणाला लावत आहेत. मात्र ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणा-यांची लाट गेली असून राणे नावाचे वादळ आता आले आहे, त्याला थांबवणे शक्य होणार नाही, असा विश्वास मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केला.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सांताक्रूझ गोळीबार पाचवा रोड जनसेवा चाळ येथे नुकतेच चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या चौकसभेला काँग्रेसचे चरणसिंग सप्रा, आमदार वर्षाताई गायकवाड, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणा-यांनी स्थानिकांची दिशाभूल केली आहे. महागाई गगनाला भिडली असून बस, रेल्वे, मेट्रोच्या तिकिटांचे दर वाढल्याने सामान्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे.
१० लाखांचा सूट घालणा-यांचे ‘अच्छे दिन’ आले असून सामान्यांचे ‘बुरे दिन’ आल्याचे चरणसिंग सप्रा यावेळी म्हणाले. वांद्रे पूर्व परिसराची जी दुरवस्था झाली आहे ती बदलण्याची क्षमता केवळ नारायण राणे यांच्यातच आहे.
कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, रस्ते, प्रसाधनगृहे आदी प्राथमिक सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या. गेली २२ वर्षे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही वांद्रे पूर्व येथील रहिवाशांना प्राथमिक सुविधांसाठी का झगडावे लागत आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ही निवडणूक काँग्रेस कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरणार आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता जिद्दीने पेटून उठल्याचे माजी मंत्री वर्षाताई गायकवाड म्हणाल्या.
वांद्रे पूर्व येथील प्राथमिक सुविधा, पुनर्विकासाच्या समस्या सोडवत रहिवाशांचा आवाज केवळ नारायण राणेच विधानसभेत पोहोचवू शकतात, असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला.