राज्यात झालेली गारपीट आणि शेतक-यांच्या आत्महत्या अशा गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना वातावरण अनेकदा गंभीर झाले.
राज्यात झालेली गारपीट आणि शेतक-यांच्या आत्महत्या अशा गंभीर विषयावर चर्चा सुरू असताना वातावरण अनेकदा गंभीर झाले.
मात्र या गंभीर वातावरणातही सरकार आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी हळूच चिमटे काढत आणि कोपरखळय़ा मारत वातावरण काही काळ हलकेफुलके केले.
जयंत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री विरोधी बाकांवर होते तेव्हा शेतक-यांच्या प्रश्नांवर अत्यंत तळमळीने बोलत होते. त्यांच्या मनात शेतक-यांविषयी तळमळ आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
त्यांच्या मनातील ही संवेदनशीलता शेतक-यांना मदत देताना दिसावी. गारपीट आणि दुष्काळग्रस्तांना मदत देताना त्यांनी आपले वजन केंद्र सरकारमध्ये वापरावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अत्यंत लाडके मुख्यमंत्री आहेत, असे आम्ही ऐकून आहोत. असे जयंत पाटील यांनी म्हणताच बाजूला बसलेले छगन भुजबळ म्हणाले, ‘मुफ्ती मोहम्मद सईद हे नरेंद्र मोदी यांचे सर्वात लाडके मुख्यमंत्री आहेत.’
कश्मीरमधील फुटीरतावादी कैदी मसरत आलम याची सुटका केल्यावरून नरेंद्र मोदी आणि कश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा संदर्भ असल्याने सभागृहात एकच हशा पिकला.
पाटील पुढे म्हणाले, ‘मुख्यमंत्री सभागृहात दणादण घोषणा करतात. परंतु ते अधिकारी ऐकतात की नाहीत, असा मला प्रश्न पडला आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की, वैध सावकारांकडून शेतक-यांनी जे कर्ज घेतले असेल ते माफ केले जाईल. मी माहितीच्या अधिकारात याची माहिती काढली. परंतु आतापर्यंत त्याबाबतचा शासन निर्णय निघालेला नाही.
मुख्यमंत्री शेतक-यांप्रती खूप संवेदनशील आहेत. मध्यंतरी ते एका शेतक-याच्या घरी मुक्कामाला राहिले होते. त्या शेतक-याच्या घरी त्यांनी नाश्ताही घेतला. त्या नाश्त्याला जागून तरी..’ असे पाटील बोलत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्येच हस्तक्षेप करीत म्हणाले,
‘नाश्ता दुस-या दिवशी. आदल्या दिवशी जेवणही घेतले होते.’ त्यावर जयंत पाटील पुढे म्हणाले, ‘तुम्हाला जास्त भार वाटू नये म्हणून फक्त मी नाश्ताच म्हणालो. त्या नाश्त्याची, त्या जेवणाची आठवण ठेवून शेतक-यांना मदत द्यावी.’ तेव्हा सभागृहात पुन्हा हशा पिकला.
सभागृहात कोणताही विषय येतो, तेव्हा हे आघाडी सरकारचे पाप आहे, असे समर्थन भाजपा सरकारकडून केले जाते. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात त्याची चांगलीच खिल्ली उडविली. शेतक-यांनी आत्महत्या केल्या, सरकार म्हणते मागच्या सरकारचे पाप आहे.
टोल बंद करता आला नाही, सरकार म्हणते मागच्या लोकांचे पाप आहे. आता राज्यात वर्षातून तीन वेळा गारपीट झाली, हे आघाडी सरकारचेच पाप आहे का, असा सवाल भुजबळ यांनी केला तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.
पावसाच्या लहरीपणावर बोलताना शिवसेनेचे गुलाबराव पाटील म्हणाले की, एक जण म्हणतो बाजूच्या गावात पाऊस झाला, पण आमच्या गावात झाला नाही. दुसरा त्याच्यापेक्षा भारी निघाला तो म्हणाला, हे तर काहीच नाही.
माझ्या एका शेतात पाऊस पडला, पण दुस-या शेतात पडला नाही. तिसरा त्याच्यापेक्षा वरचढ होता. तो म्हणाला, मी शेतात औत चालवत असताना एक बैल भिजला. दुसरा कोरडाच होता. त्यावर एकच हशा पिकला. परंतु लगेच गंभीर होत गुलाबराव म्हणाले, सरकारी अधिकारी तसेच पंचनामे करीत आहेत.
एकाच भागातल्या एका शेतक-याला मदत मिळत आहे. मात्र त्याच्या बाजूच्या शेतक-याला मिळत नाही. या विषमतेमुळे आलेल्या नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे पाटील यांनी सांगताच वातावरण एकदम गंभीर झाले.