मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील तिकीट तपासनीसांच्या कमतरतेमुळे गेल्या दोन वर्षात फुकट प्रवास करणा-यांची संख्या वाढली आहे.
मुंबई – मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील तिकीट तपासनीसांच्या कमतरतेमुळे गेल्या दोन वर्षात फुकट प्रवास करणा-यांची संख्या वाढली आहे. त्यातच नवीन तिकीट तापासनीसांच्या भरतीलाही विलंब होत आहे. त्यामुळे अनेक पदे रिक्त आहेत.
यावर तोडगा म्हणून आता निवृत्त तिकीट तपासनीसांना दोन वर्षासाठी पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अतुल राणे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.
मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर सध्या तिकीट तपासनीसांची कमतरता आहे. त्यात दर महिन्याला सरासरी ८ ते १० तिकीट तपासनीस निवृत्त होत आहेत. ज्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्या प्रमाणात भरती होत नाही. त्याचा थेट परिणाम कामावर होत आहे. सध्या मध्य रेल्वेकडे १,४४० तिकीट तपासनीसाची पदे मंजूर आहेत. त्यातील १९४ पदे रिक्त आहेत. तर १,२१० तिकीट तपासनीस कार्यरत आहेत. मात्र त्यातले ७०० तिकीट तपासनीस हे लांबपल्ल्यांच्या गाडय़ांसाठी काम करतात.
तर उपनगरीय रेल्वेच्या जवळपास १,६०० लोकलसाठी केवळ ३०० तिकीट तपासनीस काम करत आहेत. त्यामुळे तिकीट तपासनीसांची कमतरता जाणवते. याचा फायदा मोठय़ा प्रमाणात फुकटे प्रवासी घेत आहेत. गेल्या दोन वर्षाची आकडेवारीवर पाहता ते स्पष्ट होते. २०१२मध्ये २ लाख ९७ हजार ५४५ जणांना फुकट प्रवास करताना पकडण्यात आले होते. यंदा ३ लाख ५९ हजार फुकटय़ांना पकडण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुकटय़ा प्रवाशांच्या संख्येत २० टक्के वाढ झाली आहे.
उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे तिकीट देण्याची साधनेही वाढली आहेत. फुकटय़ा प्रवाशांची वाढती संख्या पाहता तिकीट तपासनीसांची आवश्यकता वाढली आहे. म्हणूनच निवृत्त झालेल्या अनुभवी तिकीट तपासनीसांचा त्यासाठी फायदा होऊ शकतो.
– अतुल राणे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
रोजचे ५०० रुपये मिळणार
फुकटयांची वाढती संख्या आणि तिकीट तपासनीसांची रिक्त पदे लक्षात घेता नव्याने भरती होणा-या तिकीट तपासनीसांची वाट पाहण्यापेक्षा निवृत्त तिकीट तपासनीसांनाच दोन वर्षासाठी कामावर घेतले जाणार आहे. २०११नंतर जे तिकीट तपासनीस निवृत्त झाले आहेत, त्यांना ही संधी मिळणार आहे. या कर्मचा-यांना रोज ३५० ते ५०० रुपये देण्यात येणार आहेत. मात्र असे झाल्यास नव्या भरती प्रक्रियेवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.