एक सिनेमा यशस्वी झाला की मग इतरांच्याही प्रतिभेला अधिकाधिक धुमारे फुटायला लागतात. जगातल्या फार कमी कलाकृती या स्वतंत्र कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत.
एक सिनेमा यशस्वी झाला की मग इतरांच्याही प्रतिभेला अधिकाधिक धुमारे फुटायला लागतात. जगातल्या फार कमी कलाकृती या स्वतंत्र कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत. अर्थात एका कलाकृतीकडून दुस-या कलाकृतीसाठी प्रेरणा घेणं काही नवीन नाही. त्यात काही गैरही नाही. प्रत्येक कलाकृती या कोणत्या ना कोणत्या कलाकृतीकडून प्रेरणा घेऊन येत असतात.
अर्थात अशा प्रकारच्या प्रेरणांना आपण उचलेगिरी म्हणू शकत नाही. त्या कलाकृतींचाही तितकाच संयम आपण ठेवत असतो. मात्र ही अशा प्रकारची कलाकृती सादर करताना त्या कलाकृतीचे पुरेसं गांभीर्य हे जपलं पाहिजे. जर अशा प्रकारचं गांभीर्य जपलं नाही तर मात्र त्या कलाकृतीचा तितकासा प्रभाव प्रेक्षकांना जाणवत नाही. अशाच प्रकारचा एक चित्रपट म्हणजे ऊर्फी.
ऊर्फी या शब्दाला तसा काही अर्थ नाही. हा शब्द एका अतिरेकी कारवाईचा कोड आहे. तो का आहे, कसा आहे, कशासाठी आहे याच्या जरी आपण तपशिलात जाणार नाही. ज्यांना चित्रपट पाहायचा आहे त्यांच्या या आनंदाला आपण कशाला विरजण लावा. ही कथा आहे दोन प्रेमिकांची. त्यातली एक चांगल्या घरातली मुलगी आहे. तर मुलगा हा रस्त्यावरचा एक मवाली टाईप मुलगा. त्या दोघांमध्ये प्रेम निर्माण होतं. त्या मुलीच्या घरातल्या लोकांनाही त्याच्याविषयी प्रेम आहे. पुढे मात्र अशा काही घटना घडतात ती त्याच्या या प्रेमाला वेगळचं वळण लागतं. ते काय आहे हे तुम्हाला पडद्यावरच पाहावं लागेल.
दिग्दर्शक विक्रम प्रधान याला ही कथा चांगल्या प्रकारे सुचली आहे. त्या कथेला स्वत:ची अशी एक शक्ती आहे. त्याची जातकुळी आहे. असं असतानाही त्याने चित्रपटाच्या पूर्वाधात ही कथा गाजलेल्या टाईमपास या चित्रपटाच्या अवतीभवती नेली आहे. त्यामुळे होतं काय की या कथेचे बारकावे दाखवणं दूर राहातं व हा चित्रपट म्हणजे टाईमपास या चित्रपटाची एक कॉपी वाटते.
दोन सिनेमाच्या पात्रांमध्ये जरी सारखेपणा असला तरी त्यामुळे चित्रपटाची ट्रिटमेंट बदलण्याची काही गरज नसते. त्यामुळे होतं काय की या चित्रपटाची पकड सुरुवातीलाच सुटून जाते. त्यानंतरच्या काही प्रसंगातही दिग्दर्शकाने पुरेसे गांभीर्य पाळल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये कधीही न दिसलेल्या अनेक नव्या गोष्टी त्याने या चित्रपटात वापरलेल्या आहेत मात्र या जुनाट व वापरलेल्या तंत्राने या चित्रपटाचा घात केला आहे.
वास्तविक पाहता प्रथमेश परब याला त्याच्या ईमेजमधून बाहेर काढणारी ही भूमिका होती. तो जरी रस्त्यावरचा किंवा अनाथ असलेला मुलगा असला तरी त्याची पार्श्वभूमी वेगळी होती. दोन्ही चित्रपटांमधले प्रेम वेगळे आहे याचा दिग्दर्शकाने फार बारकाईने विचार करायला हवा होता, तो न झाल्यामुळे या चित्रपटाची ही पकड ढिली झालेली दिसून येते. चित्रपटात दोन फार चांगल्या गोष्टी आहेत. एक या चित्रपटाची कथा व दुसरीकडे या चित्रपटाचे संवाद. ते चटकदार आहेत. प्रत्येक पात्राला योग्य पद्धतीने न्याय देणारे आहेत. असे असले तरी दिग्दर्शकाने या सा-या गोष्टींचा चांगला वापर का केला नाही याची हूरहूर वाटते.
चित्रपटासाठी वापरलेली लोकेशनही वेगळी आहेत. त्यांचा वापरही चांगला आहे. मेट्रोच्या खालच्या एका वस्तीचा वापर खरोखरच चांगला झाला आहे. त्यातही ज्या मंदिरात एक गाणं चित्रित झालं आहे तो प्रयत्नही चांगला झालाय. खासकरून कुंभमेळयात जाऊन चित्रण करण्याचं दिग्दर्शकाचं धाडसही वाखाणण्यासारखं आहे. कलाकारांनीही आपल्या वाटयाला आलेल्या भूमिका योग्य पद्धतीन साकारलेल्या आहेत.
कविता लाडने साकारलेली आई भाव खाऊन जाते. चित्रपटातली साहसदृश्येही चांगली जमून आली आहेत. त्यासाठी घेतलेली मेहनतही दिसून येते. असे असले तरी या चित्रपटावर थोडी अधिक मेहनत घ्यायला हवी होती. या चित्रपटाच्या सर्वच तांत्रिक बाजू या विलक्षण झाल्या असल्याने सादरीकरणातला हा ढिसाळपणा अधिक डोळयात खुपणारा आहे. असे असले तरी हा चित्रपट एकदा तरी पाहण्यासारखा निश्चितच आहे. तो केवळ मनोरंजक असा नसून त्यात एक चांगली कथाही आहे हे निश्चित.