येऊर (ठाणे) येथे २० जानेवारी रोजी होत असलेल्या कुणबी समाजसेवा संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शहापूर परिसरात सामाजिक कार्याचा पसारा उभा करणारे सहकारप्रेमी-समाजसेवक दत्ता पाटील यांचा घेतलेला व्यक्तिवेध.
हाताशी फारशी साधनं नसताना, आर्थिक पाठबळाचा अभाव असताना निव्वळ सामाजिक कार्याच्या आवडीतून एखाद्या कार्यकर्त्यांने समाजसेवेच्या क्षेत्रात मोठी मजल मारावी, अशी उदाहरणं महाराष्ट्रात तशी अनेक आहेत. हे कार्यकर्ते समाजाचे खरे कर्मयोगी असतात, असंच म्हणता येईल. असेच एक कार्यकर्ते समाजसेवक म्हणजे दत्ता बाळकृष्ण पाटील.
जनकल्याणाचा वसा घेऊन, जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ, जनकल्याण सह पतपेढी, जनकल्याण सार्वजनिक वाचनालय, जनकल्याण विद्यार्थी नॉलेज अॅमकॅडमी इत्यादी समाजाभिमुख उपक्रम चालवणारे, शेतकरी कुटुंबातील दत्तात्रेय पाटील (ऊर्फ दत्ता पाटील) म्हणजे चालती-बोलती संस्थाच, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. कलाशाखेची पदवी घेऊन, विक्रीकर खात्यात रुजू झाल्यावर, पुढे परीक्षा देऊन सेल्स ऑफिसर झालेल्या दत्ता पाटील यांच्याकडे पाहिल्यास, अखंड उत्साह, नम्रता, क्रियाशीलता तरीही तत्त्वाबद्दल आग्रह हे गुणविशेष ठळकपणे जाणवतात.
किशोरावस्थेत दहीहंडी, गणेशोत्सवासारखा सार्वजनिक उत्सवातूनच पाटील यांच्यातला कार्यकर्ता घडला, फुलला. कोणतीही सामाजिक संघटना, संस्था यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आवडीच्या जबाबदा-या देऊन, त्या क्षेत्राचं योग्य प्रशिक्षण दिल्यास जोमाने दर्जेदार काम करून घेता येतं व संस्थेचा विकास साध्य होतो, या मंत्रावर त्यांचा विश्वास. कुणबी समाजाविषयीच्या कळकळीतून त्यांच्या कामाला सुरुवात झाली. हा समाज श्रमजीवी, परंतु श्रद्धाळू व सोशिक असल्याने परंपरांना चिकटलेला. त्यामुळे त्याच्यात चाकोरीबाहेरचे प्रगत विचार रुजवण्याकरता भरीव कार्य करण्याची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यातून त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक कार्याचा पसारा उभा राहिला.
कुणबी समाजातील युवक जागृती व प्रबोधनाचं पहिलं पाऊल त्यांनी १९८५ मध्ये उचललं. कुणबी युवक मंडळ स्थापून दुर्बल विद्यार्थ्यांचं शिक्षण खंडीत होऊ नये म्हणून, त्याद्वारे कर्जाऊ शिष्यवृत्तीची योजना सुरू केली. समविचारी, प्रगतशील तरुणांना सोबत घेऊन, कोकणात सहकार फुलावा यासाठी त्यांनी, कोल्हापूरला जाऊन, सहकार तत्त्वांचा अभ्यास केला. त्यातून अर्थ, शिक्षण व प्रबोधनाची शृंखला सुरू झाली.
१९८८ मध्ये शहापूर येथे १०० रुपये शेडर्सने, २५ हजारांच्या भांडवलावर ‘जनकल्याण सह पतपेढी’ची स्थापना झाली. ती आज दहा कोटींच्या ठेवींपर्यंत पोहोचली आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या जोरावर तिने तालुक्यात मोठय़ा विश्वासाचं स्थान प्राप्त केलं आहे. एखादी आर्थिक संस्था २५ र्वष पैशाचाही घोटाळा न होऊ देता यशस्वीरीत्या चालवणं, ही आजघडीला विशेष बाब म्हटली जाते.
१९९३ मध्ये ‘जनकल्याण शिक्षण प्रसारक मंडळ’ची स्थापना करून वंचित दुर्बल घटकांना कसदार शिक्षण देण्यासाठी पाटील यांनी माध्यमिक विद्यालय सुरू केलं. पाचवी ते १२ वीपर्यंत दर्जेदार शिक्षणाची परंपरा आज हक्काच्या वास्तूमध्ये सुरू आहे. दहावीच्या निकाल आजपर्यंत कुठल्याही ९० टक्क्यांपेक्षा खाली लागलेला नाही. याच संस्थेतर्फे पुढे ‘शहापूर तालुका नॉलेज अॅकॅडमी’चाही स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षांकरता मार्गदर्शन शिबिरं आयोजित करून, प्रत्यक्ष परीक्षा घेऊन, त्यांचा गौरव करणं, ज्यातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून, मानसिकता तयार करणं, हा उद्देश होता. कुणबी ‘समाज उन्नती संघ शहापूर’ ते पाच र्वष अध्यक्ष होते.
प्रागतिक विचारांचा समाज घडावा, यासाठी पाटील यांनी अनेक उपक्रम हाती घेतले. त्यात वाचनसंस्कृती वाढून प्रगत समाजनिर्मिती व्हावी, यासाठी पाटील यांनी २००४ मध्ये जनकल्याण सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. या वाचनालयाची तीन हजारांची ग्रंथसंपदा आज वाचकांच्या विचारप्रबोधनाचं काम करत आहे. समाजप्रबोधनाच्या हेतूने व लेखनाच्या आवडीतून त्यांनी ‘अभिदुत’ हे साप्ताहिकही सुरू केलं. या साप्ताहिकातून सातत्याने सामाजभिमुख उपक्रम राबवण्यात आले.
‘शेतक-याचा असूड’सह महात्मा फुलेंच्या समग्र वाङ्मयातील त्यांचे विचार वाचून समाजसेवेची प्रेरणा मिळाल्याचं पाटील सांगतात. कुणबी समाजाचा मूळ व्यवसाय असलेल्या ‘शेती’मध्ये पीकबदलाचा प्रयोग करून तिच्याकडे उद्योगाच्या दृष्टीने पाहता येईल आणि आधुनिकतेची कास धरल्यास व प्रयोगशील राहिल्यास कोकणातील शेतीला वैभव प्राप्त होईल, असं त्यांचं मत आहे.
शासकीय सेवेत अधिकारीपदावर कार्यरत राहून सामाजिक व सहकार क्षेत्रात भरीव योगदान देणा-या पाटील यांची निगर्विता, प्रयोगशीलता, उत्साह व प्रचंड आशावाद अशी अनेक वैशिष्टय़ं आहेत. जमिनीवर पाय ठेवून नियोजनबद्ध केल्यास यश हमखास लाभतं, हे त्यांच्याकडे पाहून पटतं.