मुंबई – पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून देशाबाहेर पळालेल्या नीरव मोदीचा अलिबाग येथील अनधिकृत बंगला पाडण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील हा बंगला पाडण्यात यावा, असे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत.
इतकेच नाही तर, अलिबागमधील एकूण १२१ अनधिकृत बंगले आणि मुरूडमधील १५१ अनधिकृत बंगले आहेत, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. नीरव मोदी, मेहुल चोक्सी, स्मिता गोदरेज, मधुकर पारेख आणि इतरांचे अनधिकृत बंगले या भागांमध्ये आहेत. रायगडच्या जिल्हाधिका-यांना नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.
अलिबागमधील एकूण २०२ अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाला. लवकरात लवकर ही कारवाई केली जाणार आहे, असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या सर्व प्रकरणात अलिबागमध्ये ६९ आणि मुरूडमध्ये ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नीरव मोदीच्या बंगल्याचाही समावेश आहे.
तर अनेक सेलिब्रेटींचेही बंगले या यादीत आहेत. कलम १५ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यामध्ये १ लाख रुपये दंडापासून ५ वर्षे कैद इथपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. अलिबागमधील किहीम या गावात नीरव मोदीचा बंगला आहे. तर मेहुल चोक्सीचा बंगला आवास या गावात आहे. सीआरझेडच्या तरतुदींनुसार नीरव मोदीचा बंगला पाडण्यात येईल, असे अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.