लग्न ही जीवनातली एक महत्त्वाची घटना आहे. एखाद्या साध्या परीक्षेला जरी तयार व्हायचं असलं तरी त्यासाठी कितीतरी तयारी करावी लागते. मुलाखतीसाठी, एखाद्या व्यावसायिक कारणासाठी जरी जायचं असलं तरी ही तयारी लागतेच लागते.
लग्न ही जीवनातली एक महत्त्वाची घटना आहे. एखाद्या साध्या परीक्षेला जरी तयार व्हायचं असलं तरी त्यासाठी कितीतरी तयारी करावी लागते. मुलाखतीसाठी, एखाद्या व्यावसायिक कारणासाठी जरी जायचं असलं तरी ही तयारी लागतेच लागते. मग लग्न करताना त्या नव-या मुलाला व मुलींना किती तयारी करावी लागत असेल.
आता यासाठी जी बाकीची तयारी असते ती करण्यासाठी संपूर्ण कुटुंब तयार असतं मात्र या लग्नासाठीची मानसिक तयारी मात्र मुला-मुलींना स्वत:लाच करायला लागते. लग्नं करणं म्हणजे एक मोठी जबाबदारी उचलणं असतं.
अनेकांच्या आपल्याकडून अपेक्षा असतात, त्या पूर्ण कराव्या लागत असतात. आपल्याला याच माणसाबरोबर लग्न करायचं आहे का याचीही निश्चिती झालेली नसते. मुलीच्या मनातल्या या भावनांना एका वेगळया पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न ‘ते आठ दिवस’ या चित्रपटातून करण्यात आला आहे.
हा विषय फार संवेदनशील, अगदी सगळय़ांच्या मनाच्या जवळचा. एक कथा म्हणून हा चित्रपट व त्याला आलेली विविध वळणं ही फार चांगली झालेली असली तरी एक चित्रपट म्हणून त्याची मांडणी ही काहीशी कंटाळवाणी झालेली आहे.
दिग्दर्शकाच्या हाती या कथेच्या निमित्ताने एक सोन्याची वीटच आली होती. त्याला हवे तेवढे व हवे तितके दागिने तो यातून घडवू शकला असता. मात्र त्याने एका वेगळयाच विचाराने हा चित्रपट फारच संथ करून टाकला आहे.
चित्रपटाची कथा सुरू होते ती एका मुलीच्या पंसत पडल्याच्या निरोपावरून. त्यानंतर घरात अगदी आनंदाचं व उत्साहाचं वातावरण सुरू होतं. त्या वातावरणात एक मिठाचा खडा पडल्यासारखा होतो. कारण या मुलीची आई तिला सोडून अठरा वर्षापूर्वी अमेरिकेत गेलेली असते. आपल्या मुलीचं लग्न आहे हे तिला समजतं व ती भारतात यायला निघते. ती घरात येतेही, त्यानिमित्ताने पुढे काय काय होतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
ही आई म्हणजे वसुंधरा देवधर (रेणुका शहाणे) ही एका मोठया ऑफरसाठी आपला नवरा सुधाकर देवधर (तुषार दळवी) व आपली एक वर्षाची मुलगी व संपूर्ण सासर सोडून निघून गेलेली असते. तिचा तिच्या लहान दिराशी मधुकर देवधर (अतुल तोडणकर) याच्याशी मात्र फोनवरून संपर्क असतो. तो तिला तिच्या मुलीचं प्राजक्ता (दीपाली मुचीरकर) हिचं लग्न ठरल्याची बातमी देतो. त्यावर ती भारतात येते.
इथे आधी तिचं स्वागत न करण्याचा निर्णय घेतात मात्र तिच्या मुलीच्या लग्नात आपल्याला तिला विरोध करता येणार नाही, असा विचार तिचे सासरे आबा (अविनाश मसुरेकर) हे मांडतात, त्यामुळे तिचं स्वागत होतं. आईची व मुलीची भेट होते. पुढे मात्र या कथानकाला एक वेगळचं वळणं लागतं. व पुढे एका चांगल्या नोटवर हा चित्रपट संपतो.
ही कथा मांडताना दिग्दर्शक श्याम धानोरकर याने थोडी घाई केली आहे. या चित्रपटाच्या अगदी बारीक सारीक प्रसंगांवर त्याने लक्ष दिल्याचं दिसत नाही. त्यात अनेक तांत्रिक अंगही आहेतच. या चित्रपटाचं ध्वनी आरेखनही फारच बाळबोध झालं आहे. त्यामुळे अनेकदा हा चित्रपट कर्कश वाटतो. दिग्दर्शकाने अतुल तोडणकरला जरा सुटं सोडलं आहे. त्यामुळे तो सतत मोठया मोठयाने बडबडत असतो. त्याचा आवाज काही काही प्रसंगात तर अगदी असह्य होऊन जातो. या चित्रपटाचे संवादही अशाच बाळबोध पद्धतीने लिहिले आहेत. त्यात कोणतीही सहजता नाही.
काही काही वेळा ते उगीचचं तत्त्वज्ञान सांगण्यात येतं तर कधी अनेक निर्थक वाक्यांनीही डोकं दुखतं. ‘चला खूप कामं पडलीत’ हे वाक्य तर इतक्या वेळा आलेलं आहे की नेमकं काम कोणी काय करायचं हे काही लक्षातच येतं नाही. लग्नाचे प्रसंग चित्रित करणं व ते दाखवणं यात डिटेलिंगला फार मोठं महत्त्व आहे. त्यात अनेक संवेदनशील प्रसंग येतात ते सारेच लेखकाने व दिग्दर्शकाने टाळलेले आहेत. या चित्रपटात जी गाणी आली आहेत तीही अशीच काळाच्या पुढची.
म्हणजे लग्न अद्याप लागायचं असतं व आपल्यासमोर सतत पाठवणीचं गाणं येतं. त्यानंतर या चित्रपटात एक प्लॅन करण्यात आला आहे. त्याची मांडणी तर अगदी लहान मुलांसारखी झाली आहे. कॉलेजमध्ये जाणा-या सुशिक्षित मुलीच्या जीवनात येणारा हा प्रसंग व त्याला तिने व्यक्त केलेली प्रतिक्रिया नोंदवताना कुठेही सारासार विचार करण्यात आलेला नाही. त्यामुळे ही सुशिक्षित मुलं अशी का वागतात हे काही कळतं नाही. त्याला पुरक असे प्रसंग देण्यातही दिग्दर्शक अयशस्वी झाला आहे. त्यामुळे होतं काय की तेच ते प्रसंग अनेक वेळा पाहावे लागतात. वेशभूषेच्या बाबतीतही तेच सांगता येईल.
आबा हे रात्री बे-रात्रीही घरात अगदी लग्नाला तयार असल्यासारखे कपडे घालून असतात. कोणकोणती प्रतिक्रिया देतात याचाही काही नेम नाही. सुहास परांजपेचं पात्र मोठया खुबीनं आणलंय खरं मात्र त्याचाही वापर करून घेण्यात आला नाही. केवळ रेणुका शहाणेने आपल्या अभिनयाच्या जोरावर या पात्राला न्याय दिला आहे. मात्र पुढे त्याचं काय होतं याचाही काही अर्थबोध होत नाही. एकंदरीत सगळाच काही ना काही गोंधळ होऊन जातो.
बरं तो मुलीच्या मनातला आहे की दिग्दर्शकाच्या हेही लक्षात येत नाही. वास्तविक पाहता दिग्दर्शकाकडे सगळं काही होतं मात्र तयारी कमी असलेल्या चित्रपटासारखा हा चित्रपट होऊन गेलेला आहे. त्याला चांगला निर्माता होता. तांत्रिक अंगेही होती. गीते लिहिण्यासाठी सौमित्र होता, मात्र त्याला कोणता प्रसंग सांगून हे गीत लिहून घेतलं व काय दाखवलं हेही कळत नाही. कलाकारांची एक चांगली फळी होती. रेणुका शहाणेने ही भूमिका अगदी मन लाऊन केलेली आहे.
अमेरिकेत इतकी वर्ष राहून होणा-या उच्चारांच्या बदलावरही तिने मेहनत घेतली आहे. एका बाजूला सगळया जगाच्या विरोधात जायलाही तयार असणारी करारी आई तिने चांगली उभी केली आहे. तुषार दळवी यांनी साकारलेले बाबाही असेच विलक्षण, त्या मानाने त्यांच्या अभिनयाला वाव मिळावा, असे फार प्रसंग त्यांच्या वाटयाला आलेले नाहीत. ते आपल्या बायकोला घेऊन हॉटेलमध्ये जातात व तिथे लोकं त्यांच्याबद्दल काही बोलतात हा अतिशय बालीश प्रसंग ज्याला कुणाला सुचला असेल त्याला तर नमस्कारच करायला हवा.
अविनाश मसुरेकर यांनी आपल्याला देण्यात आलेल्या भूमिकेचा बाज सांभाळला आहे. मुख्य भूमिका करणा-या दीपालीने आपल्या संवादांवर अधिक मेहनत घ्यायला हवी, त्याचप्रमाणे केवळ दिसणं नव्हे तर आपण अभिनयही केला पाहिजे याचेही धडे गिरवायला हवे. इतर भूमिका या यथातथा. त्यातही आशय कुलकर्णीने त्याच्या वाटयाला आलेली भूमिका फारच जबाबदारीने केली आहे.
नवरा-मुलगा असलेला आरोह वेलणकर यानेही त्याची भूमिका फारच मन लाऊन केलेली आहे. या सा-या मेहनतीला थोडा वेळ मिळाला असता तर हा एक जबरदस्त चित्रपट म्हणून गणला गेला असता.