हडप्पासारख्या जगभरातील अनेक प्राचीन संस्कृतींचा -हास कसा झाला याची कारणं संशोधक आजही शोधत आहेत. माया व काही इतर संस्कृतीही त्यांच्या ऐन उत्कर्षाच्या काळात नाश पावल्या. वायकिंग जमातीचं उदाहरण हेही अभ्यासण्यासारखं आहे. त्यांच्या विनाशासाठी कारणीभूत झालेल्या घटकांवर नजर टाकूया.
प्रशांत महासागरात हजारो बेटांची वस्ती विखुरलेली आहे. या महासागरात ईस्टर बेटांचा समूह आहे, जो चिली देशापासून पश्चिमेकडून दोन हजार मैलांवर स्थित आहे. ईस्टर बेटांपासून पॉलिनिशियन बेटांची शृंखला तेराशे मैलावर आहे. पॉलिनिशियन समूहात फिजी व हवाई बेटांबरोबरच इतर अनेक अन्य बेटांचा सुद्धा समावेश होतो. या पॉलिनिशियन बेटांचे काही रहिवासी ईस्टर बेटांवर सुमारे ८०० सालाच्या सुमारास येऊन स्थानिक झाले. ईस्टरसारख्या सुदूर व निर्जन ठिकाणी येऊन राहण्याचे या लोकांचे काय प्रयोजन होते हे आता ठामपणे कोणी सांगू शकत नाही, पण हा पहिला लोंढा आल्यानंतर ईस्टर बेटांवर दुसरी कोणतीही लोकं तिथे आली किंवा गेली नव्हती.
ईस्टर बेट मोठमोठ्या पाषाण पुतळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हे पुतळे दोन-तीन मजल्यांच्या उंचीचे व ऐंशी टन वजनाचे आहेत. तिथे बसाल्ट खडकाचे उभे खांब फार मोठ्या प्रमाणात आढळतात. या खडकात कोरीव काम केल्यानंतर ईस्टर रहिवासी त्या अवजड पुतळ्यांना ओंडक्यांच्या व स्वत:च्या ताकदीने त्यांना खाणींपासून आणत व समुद्रकिनारी डोंगरांवर उभे करत असत. त्यांच्या दिमतीला गाय, म्हैस, गाढव, हत्ती यांसारखे वजनदार वस्तू वाहणारे प्राणीसुद्धा नव्हते. तरीही त्यांनी हा भार वाहून नेला.
आज ईस्टर एकदम ओसाड पडलेले आहे. गवताशिवाय इथे आज काहीही उगवलेले दिसत नाही, पण इथल्या गाळाचा, पुरातत्त्व वस्तूंचा, जीवशास्त्राचा तसेच उंदरांच्या बिळात जतन झालेल्या जिन्नसांचा अभ्यास केल्यानंतर त्या काळी जंगल व उंच झाडांची दाटी अस्तित्वात होती याचे ठळक पुरावे सापडतात. पॉलिनिशियन लोकांचा जो जत्था त्या काळी ईस्टर बेटांवर स्थायिक झाला, त्याने तिथल्या झाडपाल्यांना व इतर सजीवांना आपल्या उपजीविकेसाठी वापरण्यास सुरुवात केली. त्यांचे पहिले पाऊल पडले तेव्हा नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात तिथे अस्तित्वात होती, पण लोकसंख्या वाढत गेल्याने तिथल्या पर्यावरणावर प्रमाणाबाहेर भार वाढत चालला होता. त्यांची संख्या १६०० च्या आसपास सुमारे दहा हजारांपर्यंत वाढली होती, पण तोपर्यंत सारे जंगल फस्त झाले होते. जंगल नाहीसे झाल्यामुळे पक्ष्यांची संख्याही रोडावली. लाकडाची कमतरता ज्या वेळेपासून त्यांना जाणवू लागली त्या वेळेपासून त्यांनी पुतळ्यांची उभारणी बंद केली. त्याचबरोबर मातीची धूप वाढत गेली व शेतीवरही प्रतिकूल परिणाम झाला. लाकूड नसल्यामुळे बोटी बांधून मासेमारीला खोल समुद्रात जाणे किंवा तिथून पळ काढून दुस-या एखाद्या सुरक्षित ठिकाणी जाणेही त्यांना करता आले नाही. त्याचा इतका वाईट परिणाम झाला की दहा हजारांवरून त्यांची संख्या फक्त दोन हजारांवर आली. पर्यावरणाला नष्ट केल्यानेच ईस्टर संस्कृतीची अधोगती झाली.
अॅरिझोना, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो व उटाह या अमेरिकेतील राज्यांना जोडणाऱ्या प्रदेशात, अनासाझी जमात राहात होती. या जमातीचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांनी डोंगरांच्या कडेकपारीत आज सहा मजले होतील इतक्या उंचीची घरे कोरली होती. त्यांचे सारे राहणीमान शेतीवर अवलंबून होते, पण आज हा सारा परिसर वाळवंटासमान आहे. इथे कधीकाळी शेती होती हे कुणाला सांगूनही पटणारे नाही. इतका हा परिसर उष्ण व जलहीन आहे. ६००च्या आसपास अनासाझी लोकांनी या प्रदेशात ठिय्या मांडला. त्यांना इथली शुष्क परिस्थिती परिचित होती. कोणतीही नैसर्गिक साधनसंपत्ती हाताशी नसताना त्यांनी कमी पावसाचा योग्य वापर करण्याचे तंत्र विकसित केले. त्यांनी त्यांच्या अखत्यारित असणा-या प्रदेशात कालव्यांचे एक अनोखे जाळे उभारले. सुरुवातीला जंगलतोड करून शेतीसाठी जमीन साफ करण्याचे, उपज कमी झाल्यानंतर त्या जमिनीवर शेती करणे सोडून दुस-या ठिकाणची जंगलतोड करून शेतजमीन मिळवण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले होते, पण एक-दोन शतकानंतर त्यांच्या घरापासून सुपीक जमीन फार लांब गेली होती. घराजवळच शेती करण्यासाठी त्यांनी कालव्यांचे जाळे निर्माण केले होते. जिथे पाऊस जास्त पडतो किंवा साचून राहतो तिथून कालवे खणून पाणी घराजवळच्या शेतापर्यंत आणले जात होते.
अनासाझी राहणा-या ठिकाणाची माती भुसभुशीत होती. भुसभुशीत माती असणा-या ठिकाणी जेव्हा कालवा खणला जातो तेव्हा दुस-या, तिस-या पावसात त्या कालव्याच्या दरम्यान एक दुसरा कालवा तयार होतो. वर्षानुवर्षे ही क्रिया सुरू राहिल्यानंतर तो कालवा खोल खोल होत राहतो. या परिसरात सुमारे तीस फुटांपर्यंत कालवे आजही अस्तित्वात आहेत. या क्षेत्रात १०४० आणि १०९० साली सुका दुष्काळ पडला होता, पण त्यांनी कशीतरी या समस्येवर मात केली होती, पण १११७ साली आलेल्या भीषण दुष्काळाने या लोकांची कंबरच मोडली होती. अपु-या साधनसंपत्तीसाठी त्यांच्यात भांडणे होऊ लागली व काही वर्षानंतर या सा-या अनासाझी लोकांचे कायमपणे तिथून स्थलांतर झाले. त्यांनीच पर्यावरणाला ओरबाडून टाकल्यामुळे व हवामान बदलामुळे त्यांचीच अधोगती झाली.
ग्रीनलँड देशातील वायकिंग या लोकसमूहाचे पूर्ण उच्चाटन १४०० च्या आसपास झाले. नॉर्वेतील काही लोक ९८४ च्या जवळपास ग्रीनलँडमध्ये स्थायिक झाले. नॉर्वे दूध देणा-या प्राण्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. नॉर्वेची ही संस्कृती घेऊन वायकिंग ग्रीनलँडमध्ये पोहोचले होते. ही लोकं वॉलरस या प्राण्याची शिकार करून त्यांच्या दातांचा वापर करत असत. त्या काळी युरोपमध्ये हस्तिदंताला भरपूर मागणी होती, पण अरबांच्या युद्धामुळे तिथे हस्तिदंताचा व्यापार ठप्प पडला होता. याचा फायदा वायकिंग लोकांनी उठवला व त्यांनी वॉलरसच्या दातांचा व्यापार नॉर्वेवाटे युरोपबरोबर सुरू केला. यात त्यांची बरीच प्रगती झाली. पण अचानक १३६० सालानंतर त्यांची अधोगती सुरू झाली व १४४० नंतर तर ही जमात संपूर्णपणे नष्ट झाली.
त्यांच्या नाशाची कारणे आज नॉर्वे व ग्रीनलँडमध्ये लिहून ठेवलेल्या बखरींवरून लक्षात येतात. या लोकांच्या अधोगतीला पहिलं कारण ठरलं ते म्हणजे पर्यावरणाचा -हास. ही लोकं लोखंडाला वितळवण्यासाठी लाकूड व कोळशाचा वापर अति प्रमाणात करत असत. त्यासाठी जंगलतोड अपरिहार्य ठरली, पण ही अपरिहार्यता त्यांच्या मुळावर उठली जेव्हा ईनुईट नावाची दुसरी जमात ग्रीनलँडमध्ये स्थायिक होण्याचा प्रयत्न करू लागली, तेव्हा वायकिंग व ईनुईट जमातीत युद्ध होऊ लागली व लोखंडाची उपकरणं बनवणं त्यांना अवघड होऊ लागलं. ईनुईटनी त्यांच्या कत्तली केल्या होत्या.
वायकिंग लोकांच्या अधोगतीला हवामान बदलसुद्धा कारणीभूत ठरलेला आहे. १३०० व १४०० च्या आसपास युरोपमध्ये एक छोटंसं हिमयुग अवतरलं होतं. याला आपण लिटल आइस एज म्हणतो. थंडीचे प्रमाण काही दशकांकरता वाढल्यामुळे इथल्या वनस्पतींवर, दूधदुभत्या जनावरांसाठी चारा गोळा करणं या लोकांना अवघड बनू लागलं. त्यातच समुद्र गोठल्यामुळे युरोपबरोबर चालणारा व्यापार पूर्णपणे बंद झाला. या दरम्यान अरबी युद्धाचा काळ संपत आला होता व युरोपीय लोकांना हस्तिदंतांची आयात करणे सोपे झाले. त्यामुळे वॉलरस दातांचे आकर्षण कमी झाले. वायकिंगचा व्यापार हळूहळू संपूर्णपणे बंद झाला.
वायकिंगच्या नाशाला ते स्वत: व त्यांच्यावर झालेला सांस्कृतिक संस्कारसुद्धा कारणीभूत आहे. त्यांचं खाणंपिणं व स्टेट्स जपण्याचं तंत्र नॉर्वेतून बाळकडूच्या स्वरूपात मिळालं होतं, जे परंपरेतून ते आपल्या मुलांना, नातवंडांना देत होते. नॉर्वेत वासराला अतिशय महत्त्व दिलं जातं. ते तिथे एक स्टेट्स सिंबल आहे. हे दर्जात्मक प्रतीक जपण्याचा कसोशीने वायकिंग लोक प्रयत्न करत होते. त्यांच्यावर हल्ले करणा-या इनुईट लोकांवर असले काही बंधन नव्हते. या इनुईट लोकांकडे आधुनिक तंत्रज्ञान होते व बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची जाणही होती. त्यामुळे ते या स्टेट्स सिंबलच्या मागे न लागता आपल्या स्वत:च्या जगण्याकडे व प्रगतीकडे लक्ष देत राहिले. त्यांनी बर्फात प्रवास करण्यासाठी खास बर्फावर चालणा-या गाड्या तयार केल्या. खाण्यासाठी वॉलरस, शिकार करण्याचे तंत्र विकसित केले. व्हेलसारखे मोठे मासे मारण्यासाठी मत्स्य भाले तयार केले. यापैकी कोणतेच शस्त्र किंवा तंत्र वायकिंग लोकांनी विकसित केले नव्हते. ते तर मासेमारी करून मासेसुद्धा खात नव्हते. ते त्यांच्या दर्जात्मक प्रतिकाला हानिकारक होते. आपली अधोगती होते आहे याची जाणीव होऊनही ईनुईट लोकांबरोबर लोखंडाच्या बदल्यात खाण्यापिण्याचे सामान घेण्याची युक्ती त्यांना आठवली नाही. परिणाम असा झाला की १४४० सालानंतर वायकिंग लोकं संपले पण इनुईट राहिले.