पवई तलावामध्ये मलवाहिन्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू असतानाच या तलावातील जलपर्णीसह अन्य उगवणारी वनस्पती तसेच कचरा उचलण्यासाठी तब्बल सव्वा सात कोटी रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मुंबई- पवई तलावामध्ये मलवाहिन्यांमधील सांडपाण्याचा प्रवाह अद्यापही सुरू असतानाच या तलावातील जलपर्णीसह अन्य उगवणारी वनस्पती तसेच कचरा उचलण्यासाठी तब्बल सव्वा सात कोटी रुपयांचा खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
तलाव स्वच्छ नसताना केवळ जलपर्णी काढण्यासाठी करण्यात येणारा खर्च म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा असल्याचे विरोधी पक्षाने प्रशासन आणि सत्ताधा-यांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, विरोधकांच्या विरोधानंतरही या प्रस्तावाला मंजुरी देत सत्ताधा-यांनी कंत्राटदारांना आता नालेसफाईपाठोपाठ तलावातील जलपर्णीच्या नावाखाली हातसफाई करण्याचा मार्ग खुला करून दिला आहे.
पवई तलावाची निगा राखून त्यांचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैवविविधता व जीवसृष्टीचे संगोपन आणि संवर्धन करत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी सव्वासात कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.
तलावातील जलपर्णी वनस्पती व कचरा उचलण्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला असता मनसेच्या नगरसेविका अनिषा माजगावकर यांनी हे तलाव अद्यापही ८० टक्क्यांहून अधिक प्रदूषित असल्याचे सांगत या तलावांमध्ये तारांकित हॉटेल्सचे सांडपाणी सोडले जात आहे.
यामध्ये मगरीने हल्ला केला तर त्याला जबाबदार कोण आणि सव्वासात कोटी रुपये खर्च करून मुळापासून ही जलपर्णी उपटून काढली जाणार आहे का, असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी पवईच्या धर्तीवर भातसा व तानसा तलावातील गाळ काढण्याची सूचना केली.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी घनमीटरचे प्रमाण प्रशासनाने कशा प्रकारे ठरवले, असा सवाल करत मगरी असलेल्या तलावांमध्ये वनस्पती काढण्याचा यांचा काही वेगळा अनुभव आहे का, याचा खुलासा मागितला.
पवई तलावातील वनस्पतींच्या नावाने करदात्यांच्या पैशांचा चुराडा केला जाणार आहे. आधी तलावातील प्रदूषण दूर करा. मग जलपर्णीचा विचार करा. एवढे मोठे तलाव असताना यातील पाण्याचा चांगल्याप्रकारे वापर करता येऊ शकतो.
प्रशासनाने याबाबतही विचार करावा, अशी सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. पवई तलाव प्रदूषित असतानाही त्यात गणेश विसर्जन केले जाते. तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी बंद करण्यात यावे. तसेच त्यांना नोटीस जारी करण्यात यावी, अशी सूचना सभागृहनेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली.
या वेळी अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी वनस्पती काढण्याचा हा प्रस्ताव असून आयआयटीने सर्व सर्वेक्षण केल्यानंतर यातील वनस्पती काढण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु गणेश विसर्जनासाठी या तलावात वेगळी व्यवस्था केली असून दीड दिवसांच्या गणेश विसर्जनापूर्वी ही व्यवस्था पूर्ण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.