शाहूनगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीचा भाग रविवारी सकाळी अकराच्या सुमारास कोसळल्यामुळे सहा जण जखमी झाले.
मुंबई- शाहूनगर येथील जुन्या पाण्याच्या टाकीचा भाग रविवारी कोसळल्यामुळे सहा जण जखमी झाले. त्यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाहूनगर येथील अमृतनगर येथे रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाण्याची टाकीतून पूर्वी परिसरातील नागरिकांना पाण्याचा पुरवठा केला जायचा. पण ही टाकी जुनी असल्यामुळे मोडकळीस आली होती. त्यामुळे इमारतीच्या खाली भुयारी टाकी बांधण्यात आली होती व ही टाकी तोडण्याचे कंत्राटही देण्यात आले होते.
मात्र रविवारी सकाळी अचानक टाकीचा भाग कोसळून शेजारच्या झोपडीवर पडला. पण सुदैवाने झोपडीत कोणीच नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. पण या दुर्घटनेमुळे सहा जण जखमी झाले.
त्यात रामनाथ भोईर (४३), रुपाली लोखंडे (२०), पूनम जासूल (१६), भीमाबानू जासूल (४५), सुरक्षा नाजटी (१३) व राहुल पाटील (१७) यांचा समावेश आहे.
त्यातील भोईर याला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत असून कंत्राटदारावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.