मोफत व वेळीच उपचार मिळतो, या विश्वासाने मुंबई महापालिका रुग्णालयांत मोठय़ा आशेने रुग्ण धाव घेतात; परंतु रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील मनमानी कारभाराचे वास्तव रुग्णांसमोर येताच रुग्णांच्या पायाखालची जमीनच सरकते, हे कटु सत्य आहे. उपचारांसाठी मोठय़ा आशेने येणा-या रुग्णांचा पालिका रुग्णालयातील भ्रष्ट कारभार पाहून रुग्ण कायमचाच निद्रावस्थेत जातो. मोफत उपचार हे नियमात असतानाही रुग्णांकडून बाहेरून औषध मागवणे हे चुकीचे असून, बाहेरून औषधे आणण्यास सांगणा-या संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत वाचकांनी आपल्या पत्रांतून व्यक्त केले. महापालिका रुग्णालयात लागलेली भ्रष्टाचाराची कीड याला आरोग्य विभाग व संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केला. जगभरात महापालिका रुग्णालयांचे नाव असून, ते जपण्यासाठी आरोग्य विभागाने व प्रशासनातील जबाबदार अधिका-यांनी पुढाकार घेतला पाहिजे. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असली, तरी येणारे रुग्ण उपचाराअभावी घरी जाणार नाहीत, याची काळजी आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. रुग्णांच्या सोयीसाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. एकूणच महापालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळतो, हे मिळवलेले नाव टिकवण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलले पाहिजे, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला.
मनमानी कारभार
मुंबई महापालिका रुग्णालयात योग्य औषधोपचार व शस्त्रक्रिया सामुग्री मोफत पुरवली जाते, विश्वासाने रुग्ण महापालिका रुग्णालयात धाव घेतात. रुग्णांच्या सेवेसाठी महापालिकेने १५ अनुसूची बनवल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ १२ अनुसूचींवरील औषधे खरेदी करून रुग्णांना मोफत पुरवली जातात, व प्रत्यक्षात महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन उपचार घेणा-या रुग्णांना याचा लाभ मिळताना दिसत नाही. खरेतर, औषधांचा पुरवठा करणा-या कंपन्यांची पाठराखण करणारी महापालिका मोफत औषधांच्या नावावर रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. पैशाच्या नावाखाली रुग्णांना वेठीस धरणे याला रुग्णालय प्रशासन जबाबदार असू शकते. काहीही असले तरी अपुरा कर्मचारी वर्ग, औषधांचा तुटवडा, डॉक्टरांचा मनमानी कारभार, यामुळे महापालिकेच्या रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
– पुष्पा ढवळे, नविन पनवेल
पैशांसाठी रुग्णांना वेठीस धरणे योग्य नाही
प्रत्येक मानवाच्या जीवनात अनेक शारीरिक त्रासदायक रोग होत असतात. तो त्रास कमी होण्यासाठी रुग्ण तातडीने औषधोपचारासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात धाव घेतात, कारण सर्व महापालिका रुग्णालयात योग्य वेळी रुग्णाला उपचार मिळतो. त्या विश्वासाने महापालिकेच्या रुग्णालयात रुग्ण धाव घेतात. त्यासाठी अनेक रुग्णालयांना महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने गोरगरीब व सामान्य रुग्णांना अनेक प्रकारच्या शस्त्रक्रियांचे व मेडिकल औषधे उपचार मोफत मिळावी यासाठी राजीव गांधी विमासारख्या अनेक योजनेच्या मार्फत मदत देऊ केली होती. परंतु दारिद्रय़ रेषेखाली गोरगरीब व सामान्य रुग्णाला विम्याचे संरक्षण मिळणे अवघड असते. त्यामुळे काही रुग्णाला डॉक्टर औषधे बाहेरून आणण्यास सांगतात. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळेच रुग्ण व नातेवाईक त्रस्त झाले आहेत. रुग्णालयात औषध उपलब्ध असूनही तातडीने रुग्णाला विमायोजनेप्रमाणे औषध देत नसतील तर संबंधित डॉक्टर व कर्मचा-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. पैशाच्या नावाखाली रुग्णाला वेठीस धरणे योग्य नाही.
– प्रविण पाटील, भोईवाडा
चोख व्यवस्था हवी
मोफत औषधांबाबत रुग्णालयात तपशील फलक असतात. तरीही पालिका रुग्णालयात सर्रास बाहेरून औषधे आणण्यास सांगतात. रुग्णांचा गोंधळ होणार नाही, यासाठी महापालिकेतील प्रशासन व्यवस्था पूर्ण कारभारावर नियंत्रण बरोबर ठेवते का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ब-याचदा डॉक्टर सिरियस केस घेतात. उपचारही देतात. पालिका रुग्णालयात नियोजनबद्ध व्यवस्था असते. प्रहार ब्रेकिंग हा प्रकार निदंनीय नव्हे तर बेफिकीर प्रवृत्तीला चाप लावण्यासाठी असून, निष्काळजीपणा करणा-यांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. पूर्वी प्रत्येक रुग्णालयात समाज कल्याण अधिकारी होते. रुग्णालय प्रशासन त्वरित तक्रारीचे निवारण करीत असे. परंतु आता पैशांच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरु असून, या परिस्थितीवर नियंत्रण करणारी व्यवस्था हवीच.
– हरिष बडेकर, मुंबई.
आरोग्याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे
कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात एका गर्भवती महिलेच्या उपचाराकडे लक्ष न देता उलट तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यापेक्षा तिला बाहेरचा रस्ता दाखवणा-या रुग्णालयातील कर्मचा-यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. मोफत औषध व वेळेवर उपचार यासाठी मुंबई महापालिकेची रुग्णालये आहेत, याचे भान प्रशासनाला हवे! काहीवेळा रुग्णांना बाहेरून औषधे आणण्याची सक्ती केली जाते हेही चुकीचं आहे. सध्या मुंबापुरीत परप्रांतियांच्या लोकसंख्येमुळे सर्व योजनांचा व रुग्णालयाचा बोजवारा उडाला आहे. शेवटी सर्वानी समजून उमजून वागायला हवे. प्रशासनानेही आरोग्याकडे मनापासून लक्ष द्यायला हवे.
– सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी
त्वरित निलंबित करा
शासनाने आतापर्यंतच्या रुग्णांसाठी राबविलेल्या मोफत आरोग्य सेवा, राजीव गांधी जीवनदायी सेवा फक्त बोलण्यापुरतीच आहे. मुंबई महापालिकेवर सत्तेत असणारे पक्ष यांनीही कधीच कामचोर, आळशीवृत्तीच्या रुग्णालयात काम करणा-या डॉक्टर व अधिकारी कर्मचा-यांच्या कामाचा आढावा घेतला नाही. त्यामुळे आज महापालिका रुग्णालयात डॉक्टर माजलेले आहेत. रुग्णालयात काम करणारे कर्मचारी (वॉर्डबॉय) रुग्णांकडून शुल्लक कामासाठी पैशांची मागणी करतात. डॉक्टरसुद्धा रुग्णांच्या तपासणीत रुग्णांना मोठय़ा आजाराचे कारण दाखवून खाजगी मेडिकल दुकानातून जास्त किमतीची औषधे मागवतात. कित्येक गरीब, कष्टी, असाहय्यी कुटुंबे मुंबईसारख्या पालिकाच्या रुग्णालयात दूरवरून उपचारासाठी येतात. परंतु पालिकाच्या ढसाळ व लाच्छनास्पद कारभारामुळे महानगरपालिकेचे नाव धुळीस मिळालेले आहे. डॉक्टरांनी निष्काळीपणा दाखवू नये, गैरवर्तन करणा-यांना सेवकांना तुरुंगात पाठवावे, अशा पद्धतीचे पालिकेच्या रुग्णालयात कामाचे व बदलांचे नियोजन केल्यास कोणत्याही रुग्णालयात रुग्णांना वेठीस धरले जाणार नाही किंवा उपचारात व्यत्यय येणार नाही.
– राजेंद्र सावंत, टीटवाळा
रुग्णांचे दुदैवच
मुंबई महापालिका रुग्णालयात योग्य व मोफत उपचार मिळता, ही समज आता चुकीची ठरत आहे. सध्या पालिका रुग्णालयात पैशांच्या जोरावर उपचार होऊ शकतो, अथवा वशिला. मात्र काही कर्मचा-यांच्या भ्रष्टाचारामुळे सर्वच रुग्णालये बदनाम होत असून, पालिका प्रशासनाने जातीने लक्ष देऊन रुग्णांची होणारी गैरसोय दूर केली पाहिजे. डॉक्टर म्हणजे देव हा समज आता दूर होत असून, पैशांसाठी काहीही असा कारभार सध्या पालिका रुग्णालयात सुरु आहे. एकेकाळी गरिबांचे विश्वासाचे रुग्णालय असा नावलौकिक असलेली महापालिका रुग्णालये आता मात्र कमालीची अविश्वासाची झाली आहेत. संबंधित डॉक्टर व कर्मचारी वर्गच प्रामुख्याने जबाबदार असून, प्रशासकीय गलथान कारभाराची त्यात भर पडत असल्याने आपण त्यापेक्षा घरी होतो तेच बरे होते असे रुग्णाला वाटणे ही बाब दुर्दैवीच होय.
– प्रदीप थोरात, घाटकोपर
आरोग्य खात्याचा सावळा गोंधळ
मोफत औषध व त्वरीत उपचार यासाठी मुंबई व मुंबई बाहेरून येणा-या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डॉक्टर व कर्मचारी यांच्या दिरंगाईने उपचार व औषधे वेळेवर मिळत नाहीत. याला मुख्य कारण म्हणजे रुग्णालयातील अपुरा कर्मचारी वर्ग. रिक्त जागा लवकरात लवकर भरल्या पाहिजे व भरती करून त्यांचे मानधन वाढवले पाहिजे. डॉक्टर व कर्मचारी यांच्या सोयीसुविधांकडे लक्ष दिल्यास ते खाजगी रुग्णालयाकडे वळणार नाही. डॉक्टर व कर्मचा-यांना सोयी सुविधा मिळाल्यास रुग्णांना वेळीच उपचार मिळतील. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक सेवा देणे आरोग्य खात्याचे प्रथम कर्तव्य आहे.
– महेश पाटील, विद्याविहार
रुग्णांचे हाल नको
कांदिवली शताब्दी रुग्णालयात गर्भवती महिलेकडे उपचारासाठी लक्ष न देता तिला दाखल न करून घेण्याची ब्रेकिंग बातमी प्रहारने प्रकाशीत केली. औषधोपचार वेळेवर उपचार असा नियम असतानाही रुग्णांना बाहेरून औषध आणण्यास सांगतात, हे फक्त पैसे कमवण्यासाठी असून, औषधांच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळणेच आहे. पैशाच्या अभावी रुग्णाला दाखल न करणा-या संबंधितांवर त्वरित कारवाई झाली पाहिजे. कर्मचा-यांची मनमानी आणि कायदा असताना कायद्याची पायमल्ली करणे याला प्रशासन जबाबदार ठरेल. यांची निटशी चौकशी झाली पाहिजे आणि असे प्रकार कधी रुग्णाला पैशावरून वेठीस धरू नये कृपया बेपर्वाई करून हाल करू नका.
– प्रमोद पेडणेकर, भांडुप
विश्वास सार्थकी लावा
आरोग्य सेवा ही गोष्टच मुळात पूर्णपणे डॉक्टरांच्या अधिपत्याखाली येते. आरोग्य विभागाने सर्वप्रथम पालिका, राज्य शासनाच्या रुग्णालयांच्या प्रयोग शाळा अत्याधुनिक व यंत्र सामग्रींनी सुसज्ज कराव्यात. कारण बहुतांशप्रसंगी डॉक्टर सरळ खासगी प्रयोगशाळेतून विविध तपासण्या करून घेण्यास सांगतात आणि त्या खूप खíचक असतात. डॉक्टर व सदर लॅबची मिलीभगत जगजाहीर आहे. सामान्य माणसाचे शोषण करणारी ही घातकी परंपरा मोडीत काढण्यासाठी लवकरात लवकर पालिका रुग्णालयांतील प्रयोगशाळांचे अत्याधुनिकीकरण होणे गरजेचेच आहे. महापालिका रुग्णालयात महागडी व सातत्याने लागणारी औषधे वेळीच उपलब्ध नसतात. गरजेपोटी रुग्णास आपला खिसा खासगी मेडिकलच्या दरबारी नाखुशीने रिकामा करावा लागतो. परिणामी रुग्णाची जी परवड होते त्यास कोणीच वाली नाही, असे चित्र आहे. डॉक्टर, परिचारिका यांची संख्या वाढवणे अनिवार्य आहे. आरोग्य सुविधा वेगवान, उत्तम व रुग्णास मानसिक, शारीरिक त्रास होणार नाही, याकडे पालिकेने लक्ष द्यावे. पदरचे चार पैसे वाचतील, या भाबडय़ा आशेने सामान्य रुग्ण आíथक स्थिती नसल्याने सर्वप्रथम पसंती ही पालिका रुग्णालयांना देतो. हा विश्वास सार्थकी लावण्याची जबाबदारी उचलणारे रुग्ण देवदूतच असतात.
– जयेश राणे, भांडुप
निरोगी जीवन – गरिबांचा हक्क
आर्थिकदृष्टय़ा निर्बल असणा-यांचा आधार मोफत औषधे व उपचार मिळू शकणारी पालिका रुग्णालयेच असतात. परंतु पालिका रुग्णालयातील गलथान कारभारामुळे त्यांचा हा हक्क हिरावला जातो. बाहेरून औषध मागवणे, रक्तचाचणी व इतर चाचण्या रुग्णालयाबाहेरील पॅथॉलॉजी लॅबमध्ये करण्यास सांगणे, काही ठिकाणी तर पालिका डॉक्टरांच्या स्वत:च्याच खासगी दवाखान्यात पुढील उपचार करून घेण्याची सक्ती, असे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यामुळे पालिका रुग्णालयाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो. कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील प्रकार उजेडात आला तरी हे हिमनगाचे एक टोक आहे. वर उल्लेखलेल्या प्रकारांची वाच्यता होत नसल्यामुळे असे प्रकार करणा-यांचे फावते. गरीब रुग्णांकडून तक्रार होण्याची शक्यता कमी असते कारण त्यामुळे पुढील उपचार थांबण्याची भीती त्यांना वाटत असते. आरोग्य विभागाने जातीने यात लक्ष घालून गरप्रकारांना आळा घालावा आणि मोफत औषध व वेळेवर उपचार हा नावलौकिक कायम ठेवावा. निरोगी जीवन हा गरीबांचा सुध्दा हक्क आहे आणि तो त्यांना मिळायलाच हवा.
– दीपक गुंडये, वरळी
कारवाई व्हावी
देशातील सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबई महानगर पालिकेचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईची सातत्याने वाढणारी लोकसंख्या पाहता मुंबईकरां ज्या प्रमाणात नागरी सुविधा मिळायला हव्यात त्याप्रमाणात सुविधा मिळत नाही. मोफत व वेळेवर उपचार पालिका रुग्णालयात होत असल्याने मोठय़ा संख्येने रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. डॉक्टर व कर्मचा-यांची संख्या रुग्णांच्या तुलनेत अपुरी आहे. याचा ताण रुग्णालय प्रशासनावर पडत असल्याने आरोग्यसेवेचा दर्जा खालावला आहे. कामाच्या बोज्याखाली काही वेळेला पैशाच्या नावाखाली रुग्णांना वेठीस धरल्याच्या घटना घडल्या आहेत. पैसे घेणा-यांवर कारवाई केली पाहिजे, कारवाई केली नाही तर असे गरव्यवहार वाढीस लागतील. शासकीय वैद्यकीय सेवेतील त्रुटी, अत्याधुनिक सेवेची वानवा, माणुसकीचा अभाव यामुळे परवडत नसले तरी गरिबाला चांगली सुविधा मिळवण्यासाठी खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागते, त्यामुळे शासनाने सर्वसामान्य माणसाला उत्कृष्ट आरोग्य सुविधा मिळतील असे धोरण राबवावे.
– विवेक तवटे, कळवा
रुग्णालयांना भ्रष्टाचाराचा विळखा
मोफत व वेळीच उपचार मिळतो, या विश्वासाने मुंबई महापालिका रुग्णालयांत मोठय़ा आशेने रुग्ण धाव घेतात; परंतु रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील मनमानी कारभाराचे वास्तव रुग्णांसमोर येताच रुग्णांच्या पायाखालची जमीनच सरकते, हे कटू सत्य आहे. उपचारांसाठी मोठय़ा आशेने येणा-या रुग्णांचा पालिका रुग्णालयातील भ्रष्ट कारभार पाहून रुग्ण कायमचाच निद्रावस्थेत जातो. मोफत उपचार हे नियमात असतानाही रुग्णांकडून बाहेरून औषध मागवणे हे चुकीचे असून, बाहेरून औषधे आणण्यास सांगणा-या संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मत वाचकांनी आपल्या पत्रांतून व्यक्त केले. महापालिका रुग्णालयात लागलेली भ्रष्टाचाराची कीड याला आरोग्य विभाग व संबंधित अधिकारीच जबाबदार आहेत, असा आरोपही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केला. जगभरात महापालिका रुग्णालयांचे नाव असून, ते जपण्यासाठी आरोग्य विभागाने व प्रशासनातील जबाबदार अधिका-यांनी पुढाकार घेतला पाहिजे. क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या अधिक असली, तरी येणारे रुग्ण उपचाराअभावी घरी जाणार नाहीत, याची काळजी आरोग्य विभागाने घेतली पाहिजे, असे मत वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून व्यक्त केले. रुग्णांच्या सोयीसाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला. एकूणच महापालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळतो, हे मिळवलेले नाव टिकवण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलले पाहिजे, असा सल्लाही वाचकांनी पत्रांच्या माध्यमातून दिला.
गैरप्रकार वाढले
महापालिका रुग्णालयात वेळीच उपचार मिळतो म्हणून अशा सर्वसाधारण रुग्ण महापालिका रुग्णालयांना प्रथम प्राधान्य देतात. परंतु प्रत्यक्ष दाखल झाल्यानंतर मात्र त्यांचा भ्रमनिरास होतो. नुकतेच ऐन दिवाळीत कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल न केल्याने एका गर्भवती महिलेचा व तिच्या बाळाचा जीव धोक्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ‘प्रहार’ने उघडकीस आणल्यामुळे तेथील प्रशासनाला जाग आली, अन्यथा तेथील गैरप्रकार उघडकीस आला नसता! केवळ पैशाच्या अभावी गर्भवती महिलेला उपचारांऐवजी तेथील परिचारिकेने व कर्मचा-यांनी हाकलून लावल्यामुळे महापालिकेच्या इतर रुग्णालयांचीसुद्धा चौकशी करण्याची वेळ आलेली आहे. रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगणे, एक्स-रे मशिन बंद असल्याचे कारण सांगून बाहेरून एक्स-रे काढण्यास सांगणे. डॉक्टरांचे सहकार्य न मिळणे इ. प्रकार वाढत चाललेले आहेत. – मधुकर कुबल, बोरिवली, पूर्व
योग्य पाऊल उचलले पाहिजे
महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून महापालिका रुग्णालयात रुग्ण उपचारासाठी येतातच. महापालिका रुग्णालयासारखी रुग्णालये प्रत्येक मोठय़ा शहरांत असली तरी तेथील रुग्णालय प्रशासनावर कामाचा ताण येत नाही. काही परप्रांतीय रुग्णालयांची चर्चा केली असता, महापालिका रुग्णालयात योग्य उपचार मिळतो, तो अन्य भागातील रुग्णालयात हजारो रुपये मोजले, तरी सरकारी रुग्णालयात मिळत नाही. त्यामुळे आम्हाला मुंबईच्या पालिका रुग्णालयांची भटकंती परवडते. औषधे सर्वच रुग्णालयांना पुरतील, अशी दक्षता प्रशसनाने घेतली पाहिजे. यामध्ये ते स्वत:चा काही स्वार्थ पाहत असतील, अशी भ्रष्ट कामे करणा-यांना रोखले पाहिजे. खरं तर सर्व समाजाला वैद्यकीय सोयी पुरविल्या पाहिजेत. कारण ब-याच लोकांना बाहेरून औषधे खरेदी करणे शक्य नसते. त्यामुळे गरजू रुग्णांचा विचार करीत महापालिकेने रुग्णांसाठी योग्य पाऊल उचलले पाहिजे. – शंकर पानसरे, काळाचौकी
जनहित याचिका दाखल करा
मोफत औषधं व वेळेवर योग्य उपचार ही महानगरपालिका रुग्णालयांची पूर्वीची रुग्णांना दिलासा देणारी पारदर्शकतेची ओळख अलीकडच्या काळात पडद्याआड गेली आहे. डॉक्टर्स व निष्काळजी कर्मचारी (काही अपवाद वगळता) महापालिका रुग्णालयाचे नाव मातीत मिळवू पाहत आहेत. भ्रष्टाचाराच्या या कॅन्सरने रुग्णांना बेजार करून महापालिका रुग्णालयांना गिळंकृत केले असून, याला सर्वस्वी रुग्णालय प्रशासनच जबाबदार आहे, हे स्पष्ट दिसते. तेव्हा प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराला जनहित याचिका दाखल करून जाब विचारायलाच हवा. भ्रष्टचारी कर्मचारी पैशाच्या लालसेपोटी रुग्णांना वठीस धरून त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात धन्यता मानतात. – दिलीप अक्षेकर, माहीम
‘प्रहार ब्रेकिंग’चे अभिनंदन
सर्वात प्रथम ‘प्रहार ब्रेकिंग’ बातमी प्रकाशित करून अतिशय महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विषय निवडल्याबद्दल अभिनंदन. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका रुग्णालयात रुग्णांना आरोग्यविषयक सुविधांपासून वंचितच राहावे लागते. ही अतिशय अन्याय करणारी बाब असून रुग्णांना खाईत लोटले जात आहे. आरोग्य विभागाकडून उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा आरोग्याच्या बाबतीत गंभीरपणे विचार केला जात नाही. मोफत औषध व वेळेवर उपचार असा नियम असताना अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले दुर्लक्ष, म्हणजे कर्मचा-यांवर अंकुश राहिलेला नाही. प्रशासनाने कामचुकार कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारावा. महापालिका रुग्णांलयात आरोग्याच्या दृष्टीने नव्या धोरणात व्यवस्था, त्याची विशेष वा खास काळजी घेतली जाणे गरजेचे ठरेल. – कमलाकर जाधव, बोरिवली, पूर्व
प्रशासन जबाबदार
योग्य व मोफत उपचार या विश्वासाने रुग्ण मुंबई महापालिका रुग्णालयात धाव घेतात. मात्र पालिका रुग्णालयात पैशांच्या जोरावर उपचार होऊ शकतो, हे मुंबईकरांचे अथवा रुग्णांचे दुदैवच म्हणावे लागेल. ठराविक उपचारासाठी मोफत उपचार हे बंधनकारक असतानाही स्वस्त दरातील औषधेही बाहेरुन आणण्यास सांगितले जाते. काही कर्मचा-यांच्या भ्रष्टाचारामुळे महापालिका रुग्णालये बदनाम होत आहे. जगभरात नाव मिळवलेल्या पालिका प्रशासनाने जातीने लक्ष देऊन पालिका रुग्णालयांचे नाव धूळीत मिळवण्यापासून बचाव केला पाहिजे. रुग्णांना वेठीस धरणे योग्य नसून, रुग्णांकडून पैशांची मागणी करणा-यांवर कठोर कारवाई केली पाहिजे. रुग्णांची होणारी परवड याला प्रशासनच जबाबदार आहे. – संजय कांबळे, गोरेगाव
‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..
प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी घ्या!
मोफत औषध व वेळीच उपचार होणारे ठिकाण म्हणजे महापालिका रुग्णालय. ही सामान्य व गोरगरीब रुग्णांची भावना मोफत औषधांची सोय असूनही बरेच वेळा रुग्णालयातून रुग्णांना न परवडणारी महागडी औषधे बाहेरून आणायला सांगितले जाते. शेवटी हा खर्चही झेपत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक डिस्चार्ज घेऊन रुग्णाला घरी आणतात आणि मग मृत्यूची वाट पाहण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीही नसते. महापालिका व शासनाचा आरोग्य विभाग अशा रुग्णालयांतून मोफत औषधोपचारासाठी आवश्यक त्या निधीची सोय करीत असताना ती औषधे वा निधी जातो कुठे हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही अशा प्रकारांची गंभीरपणे चौकशी व्हायला हवी. उपचारासाठी आलेल्या गर्भवतीस दाखल करून न घेणे व उपचार न करता परत पाठवणे हा शताब्दी रुग्णालयातील प्रकार निंदनिय आहे, यावेळी डय़ुटीवर हजर असलेल्या संबंधित डॉक्टर व कर्मचा-यांवर कारवाई व्हायला हवी. रुग्णालयाची जनमानसातील प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. – मुरलीधर धंबा, डोंबिवली
प्रशासनाने खबरदारी घ्यावी!
मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य विभागावर सर्वात जास्त आर्थिक तरतूद केली जाते. सामान्य नागरिकांना मोफत व वेळेत उपचार मिळत असल्याने गरीब रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांकडे धाव घेतात. मात्र अस्वच्छता, औषधांची टंचाई, शिकाऊ डॉक्टरांची सदोष सेवा, अपुरं मनुष्यबळ, रुग्णांना मिळणारी अपमानास्पद वागणूक यामुळे त्रस्त झालेल्या रुग्णांसाठी आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. तसेच महापालिका रुग्णालयांना अद्ययावत करून, रुग्णांना मोफत व वेळेत औषध पुरवठा करण्यासाठी प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यायला हवी. रुग्णांकडून पैसे मागणारी, लाचखोर, कामचुकार कर्मचारी मंडळी तात्काळ निलंबित व्हायला हवीत. तसेच महापालिकेच्या रुग्णालयांत दिल्या जाणा-या रुग्णसेवेचा प्रशासनाकडून पाठपुरावा होणे गरजेचे आहे. – सिद्धेश सावंत, चेंबूर
गुन्हा दाखल केल्यास डेंग्यूवर आळा घालणे शक्य होईल का?
डेंग्यूने मुंबईत थैमान घातले असून, मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाला या आजारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले. अपयशानंतर आपले खापर मुंबईकरांच्या माथी फोडत घरात डेंग्यूची अळी अथवा उत्पत्ती आढळल्यास घरातील व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याचे फर्मान महापालिका आयुक्तांनी जारी केले. आयुक्तांच्या या फतव्यामुळे डेंग्यूवर खरोखर आळा घातला जाईल का? धूरफवारणी करणा-या विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या डेंग्यू पसरण्यास जबाबदार आहे का? आरोग्य विभागाच्या उदासीन कारभारामुळेच डेंग्यूने डोके वर काढले का? डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे का? भविष्यात डेंग्यू, मलेरिया या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे का? डेंग्यू पसरण्यास आरोग्य विभागाबरोबर मुंबईकरही जबाबदार आहेत का?
याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.
प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ, मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६
शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन
ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.
त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in
शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत