शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रचारात केलेल्या कामांचा पाढा वाचला जात असला, तरी मुंबईतील खड्डय़ांनी दोघांचा जीव घेतल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली आहे.
मुंबई- शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून प्रचारात केलेल्या कामांचा पाढा वाचला जात असला, तरी मुंबईतील खड्डय़ांनी दोघांचा जीव घेतल्याची घटना मानखुर्दमध्ये घडली आहे. याप्रकरणी पालिकेच्या ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मानखुर्दमध्ये पालिकेच्या हायड्रोलिक विभागाने १५ दिवसांपूर्वी एक मोठा खड्डा खोदला होता. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास इकरार नावाचा व्यक्ती या खड्डय़ात पाय घसरून पडला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र जलालुद्दीन याने खड्डय़ात उडी घेतली.
मात्र या दोघांचाही खड्डय़ात साचलेल्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर खड्डय़ातील पाण्यात वीजेचा प्रवाह असल्याने त्या धक्क्याने या दोघांचा मृत्यू झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. घटनेनंतर तब्बल अडीच ते तीन तासांनी अग्निशमन दल आणि पोलिसांनी या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. ही घटना घडून २४ तास उलटूनही गुन्हा दाखल झालेल्या ठेकेदाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.