पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्या आणि मुंबईतील रस्ते वाहतूकही मंदावली.
मुंबई- मुंबईत शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे रेल्वेच्या मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाल्या. मुंबईतील रस्ते वाहतूकही मंदावली. ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. काही गाड्या रद्द केल्याने सर्व स्थानकांवर मोठी गर्दी पहायला मिळाली.
मुंबईतल्या परळ, दादर, वरळी, अंधेरी आणि बोरीवली येथील मागाठाणे परिसरात पाणी साचले होते.
गेले काही दिवस रिपरिप पडणा-या पावसाने शनिवारपासून धुवाँधार पडायला सुरुवात केली. या पावसामुळे दहिसर, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे, दादर, परळ, हिंदमाता, विक्रोळी, मुलूंड, कुर्ला आदी भागात पाणी साचले. यामुळे रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला असताना रेल्वे सेवाही उशीराने सुरू होती. येते २४ तास मुंबईसह राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेतर्फे देण्यात आला आहे. वेधशाळेचा इशारा पाहता महानगरपालिकेद्वारे नियोजन करण्यात आले असल्याचे पालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत नाल्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला असून दुस-या मुलावर उपचार सुरू आहेत.
ढगांच्या गडगडाटासह जोरदार बरसणा-या पावसाने प्रत्येकाची तारांबळ उडवली. साचलेल्या पाण्यातून वाट काढताना प्रत्येकजण जाताना दिसत असतानाच दुसरीकडे साचलेल्या पाण्याचा निचरा करणारा महापालिका कर्मचारीवर्ग दिसत आहे. पावसाचा आनंद लुटणा-या मंडळींनी मरीन ड्राईव्ह, गिरगाव, जुहू चौपाटीवर हजेरी लावली होती. पावसाचा हा आनंद प्रत्येकजण सेल्फीमध्ये कैद करत होते. पावसाची तुफानी बरसात कायम राहिल्याने कमाल तापमानाचा पारा घसरत वातावरणात गारवा निर्माण झाला.
कुलाबा येथे कमाल २६.८ अंश सेल्सिअस, किमान २५ अंश सेल्सिअस, ९५.८ मि.मी. पावसाची नोंद तर सांताक्रूझ येथे कमाल २७.२ अंश सेल्सिअस, किमान २४.३ अंश सेल्सिअस आणि ३४.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. मुंबई, नवी मुंबई, पुणेसह रायगड, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाचे बरसणे कायम आहे. येते २४ तास महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर वादळी वा-यांचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा मारा कायम राहिल्याने झाडे पडण्याच्या दुर्घटनाही घडत आहे. शनिवारी शहर, उपनगरासह एकूण ३६ ठिकाणी झाडे कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या. मुलुंड (प.) हायलँड पार्क येथे दोन मुले पाण्यात खेळत असताना नाल्यात बुडल्याची दुर्घटना घडली. यापैकी अफताब इरफान खान (१५ वर्षे) मुलाचा मृत्यू झाला असून अरबाज हसन अन्सारी (१२वर्षे) सायन रुग्णालयात उपचार घेत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलीस निरीक्षक निलवे यांनी सांगितले. तर शहर, उपनगरात एकूण ८ ठिकाणी घराचा काही भाग, भिंत कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या.
[EPSB]
वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू
मुसळधार पावसामुळे मुलुंडमध्ये शुक्रवारी रात्री दोन मुले गटारात वाहून गेली तर शनिवारी भांडूप येथील एक महिला नाल्यात वाहून गेल्याचे वृत्त आहे.
पावसाने मुंबईला झोडपले
रिमझीम करत शुक्रवारी सकाळी काही वेळासाठी बरसलेल्या पावसाने दडी मारली आणि ‘पाऊस अचानक गेला कुठे?’ अशी चर्चा चाकरमान्यांमध्ये होते तोच दुपारी पावसाने जोरदार एन्ट्री केली.
[/EPSB]