मध्य रेल्वेच्या तुलनेत वेळ पाळणा-या पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्र मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाले.
मुंबई- मध्य रेल्वेच्या तुलनेत वेळ पाळणा-या पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचे वेळापत्र मागील काही दिवसांपासून विस्कळीत झाले आहे.
मागील आठवडयात विलेपार्ले येथे झालेल्या पेंटोग्राफ बिघाडानंतर शनिवारी अंधेरी स्थानकात दुपारी अडीजच्या सुमारास पेंटाग्राफ तुटल्याने डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिटे रखडली.
यापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल वेळेत चालत असल्याने प्रवाशांना चांगल्या सेवेची अपेक्षा असते. मात्र मागील काही दिवसांपासून वारंवार बिघाड होत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेकडे तक्रार किंवा विचारणा केल्यावर सर्व गाडया वेळेत सुरू आहेत असे काही झालेच नाही, अशी उत्तरे ऐकायला मिळतात. तर काही वेळा अर्धा तास उशिराने धावणा-या लोकल केवळ पाच मिनिटे उशिराने धावत असल्याची चुकीची माहिती पश्चिम रेल्वे अधिका-यांकडून दिली जात असल्याचा संताप प्रवाशांतून व्यक्त होत आहे.
अंधेरी स्थानकात पेंटोग्राफ तुटल्याची कोणतीही माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली नाही. मुंबई आणि उपनगरात अचानक झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूकही मंदावली होती. कल्याणजवळ मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाला होता.