पाऊस सुरू झाला की पोलादपूरवासीयांच्या मनात राहिलेली दरड कोसळण्याची भीती पुन्हा जागी होते. ९ वर्षापूर्वी म्हणजे २५ व ६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुका उद्ध्वस्त झाला होता.
पोलादपूर- पाऊस सुरू झाला की पोलादपूरवासीयांच्या मनात राहिलेली दरड कोसळण्याची भीती पुन्हा जागी होते. ९ वर्षापूर्वी म्हणजे २५ व ६ जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीने संपूर्ण तालुका उद्ध्वस्त झाला होता. अनेक कुटुंबे दरडीखाली गडप झाली होती. सावित्री नदीला आलेल्या महापुरामुळे पोलादपूर ठप्प झाले होते. यंदाही पोलादपूर दरड व पुराच्या भीतीच्या सावटाखाली आहे.
भू-वैज्ञानिकांच्या अहवालानुसार पोलादपूर तालुक्यातील २६ गावे व डोंगरमाथ्यावर, मध्यभागी तसेच डोंगरकुशीत वसलेल्या अनेक आदिवासी, बौद्ध व धनगर वस्त्या दरडींच्या दहशतीखाली जीव मुठीत धरून दिवस ढकलत आहेत. प्रतापगाडाच्या पायथ्याशी असलेल्या कापडे बुद्रुक, चांभारगणी, कुंभळवणे, पितळवाडी, मोरगिरी, ओंबळी, कुडपण या गावांसह तसेच आजूबाजूच्या गावांच्या परिसरात डोंगराळ भागात मागील पाच वर्षामध्ये मोठय़ा प्रमाणावर फार्म हाऊस, रो-हाऊस, घरे, बंगले उभे राहिले असून अशी कामे अजूनही सुरूच आहेत. यासाठी सपाटीकरणाच्या नावाखाली रस्त्यांच्या डोंगरांचे, टेकडय़ा भुईसपाट झाल्या आहेत. यात प्रचंड प्रमाणात वनसंपत्तीही नष्ट होत आहे. विकासकामांसाठी भूगर्भामध्ये सुरुंगस्फोट घडवले जात आहेत. दगड फोडले जात आहेत. मोठय़ा क्षमतेच्या सुरुंगस्फोटांमुळे डोंगर खिळखिळा व कमकुवत होत आहेत. सावित्रीनदी सारख्या मुख्य नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण होत आहे. या धनदांडग्यांच्या उभ्या राहाणा-या बांधकामांमुळे नदीचा प्रवाह बदलण्याची दाट शक्यता असून त्यामुळे सावित्री नदीच्या काठावर वसलेल्या चरई, लोहारे, पोलादपूर सवाद यासारख्या गावांवर नदीच्या पाण्याच्या धोक्याच्या टांगती तलवार लटकत आहे.
तालुक्यात दरवर्षी सरासरींच्या साडेचार हजार मिलीमीटर पाऊस पडतो. मुबलक व प्रचंड प्रमाणावर पडणा-या पावसामुळे आधीच खिळखिळा झालेल्या व भेगा पडलेल्या डोंगराच्या पायथ्याशी, मध्यावर वसलेल्या या गावपाडय़ांवर दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. मात्र, पोलादपूरमधील केवळ पायटा व तुटवली या गावांमध्ये बिनतारी संदेश यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्याव्यतिरिक्त कोणतीही उपाययोजना प्रशासनाकडून होत नाही. तालुक्यातून कशेडी घाट व आंबेनळी घाटरस्ते जातात या रस्त्यांच्या रुंदीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोंगरांचे उत्खनन मोठय़ा प्रमाणात करण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. वाहतूक कित्येक तास बंद असते. नऊ वर्षापूर्वी २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टी व भूस्खलनामुळे पोलादपूरचे होत्याचे नव्हते झाले. या काळरात्री मुसळधार झालेल्या पावासामुळे सावित्री नदीला पूर आला. या पुराचे पाणी शहराच्या नदीकाठच्या सिद्धेश्वरनगर, भैरवनाथनगर, शिवाजीनगर या भागात शिरले.
महापुराच्या पाण्याने मासळीबाजार, गंगामाता हॉल, सिद्धेश्वर मंदिर, सुंदरराव मोरे महाविद्यालय, सार्वजनिक वाचनालय, वीज मंडळाचे ठिकाण, गोदाचित्रे घाट, बंडू चित्रे चाळ या इमारतींना धक्का देत अनेक वाडय़ा व घरे पावासाने जलमय केली. पावसाचे हे तांडव सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास पोलादपूर, सैनिकनगर, पार्ले, काळवळी, तुटवली, गोळेगणी, कुडपण, लोहारे, पवारवाडी, भोगाव, साळवीकोंडे, धामणदेवी, केवनाळे, किनेश्वर, बोरावळे, गाळेदरा, पळचिळ, महादेवचा मुरा, कातळी कोकणची वाडी, कोतवाल, कोंढवी या हद्दीतील डोंगरांना भेगा पडणे, घरांना तडे जाण्याचे प्रकार घडले. तसेच काही ठिकाणी दरडीही कोसळल्या. लोहारे, चव्हाणवाडी, कोतवाल खुर्द, कोतवाल बुद्रुक या तीन गावांमध्ये दरडी कोसळल्याने त्याखाली १३ जण गाडले गेले होते.
महापुरामध्ये त्यावेळी अनेक जनावरे वाहून गेली. दोन महिलाही वाहून गेल्या होत्या. संपूर्ण तालुक्यातील विजेचे खांब कोसळून पडले होते. त्यामुळे या भागात पुढे अनेक दिवस अंधारच होता. दिवीळ येथील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा व कोतवाल येथील मोठे पूल कोसळले. मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदेवी हद्दीत सव्वाशे मीटर लांब व ५० फूट उंचीचा डोंगराला तडा गेला. गावोगावचे रस्ते, साकव, बंधारे, संरक्षण भिंती, नळपाणी योजना नेस्तनाबूत झाल्या. यात शेतीचेही मोठे नुकसान झाले. मात्र, आज ९ वर्षानंतरही केवळ जुजबी उपाययोजना म्हणजे संदेश यंत्रणा आपत्ती निवारण समिती या पलीकडे कुठलेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात दरडींचा धोका कायम आहे.