ग्लोबल वॉर्मिगची नवनवी तथ्ये रोज आपल्यासमोर येत आहेत. पृथ्वीच्या तापमानाचा गेल्या ११ हजार वर्षापासून ते आतापर्यंतचा इतिहास सादर करण्यामध्ये अभ्यासकांना अलीकडेच यश आलं आहे. हे तापमान अशाच पद्धतीने वाढत राहिलं तर २१०० या वर्षापर्यंत जेवढं मागच्या ११,३०० वर्षामध्ये वाढलं नव्हतं तेवढं पृथ्वीचं तापमान वाढेल, असं वैज्ञानिकांनी सांगितलं आहे. ग्लोबल वॉर्मिग हे पृथ्वीचं तापमान इतकं वाढण्याचं मुख्य कारण आहे आणि त्याला मनुष्य आणि त्याच्या कारवायाच जबाबदार आहेत. या कारवाया थांबल्या नाहीत तर पोळलेल्या या वसुंधरेला कोणी वाली राहणार नाही आणि त्यामुळे मानवाच्या अस्तित्वाविषयी समस्या निर्माण होऊ शकतात.
बघता बघता थंडीच्या शीतल लाटा ओसरून त्यांची जागा कडक उन्हाच्या झळांनी घेतली. वाढत्या उन्हाने मानव आणि प्रत्येक सजीव अस्वस्थ होत आहे. उन्हाच्या या लाटा भविष्यात आणखी वाढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सजिवावर मोठं संकट आहे. पण ज्या पृथ्वीवर या सजिवांचं वास्तव्य आहे, त्या धरणीमातेचा जीव या वाढत्या तापमानाने किती व्याकूळ झाला असेल, याचा आपण विचारही करत नाही. जसजसं विज्ञानातील संशोधन अधिक सूक्ष्म आणि प्रभावी होत आहे तसतशी ग्लोबल वॉर्मिगच्या बाबतीत नवनवी तथ्ये समोर येत आहेत. ग्लोबल वॉर्मिग अशाच पद्धतीने वाढत राहिलं तर २१००मध्ये पृथ्वीचं तापमान इतकं वाढेल जेवढं मागच्या ११ हजार तीनशे वर्षात वाढलं नव्हतं असं आता वैज्ञानिकांनी व्यापक विश्लेषण करून सांगितलं आहे. धरणीमातेची स्थिती दिवसेंदिवस बिकटतेची पायरी गाठत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या ११ हजार तीनशे वर्षामध्ये पृथ्वीवरील तापमान नव्हतं इतकं उष्ण नोंदवलं गेल्याने आगामी काळात वाढता पारा ही मानवी जीवनासमोरील भीषण समस्या होण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.
जगभरातील सुमारे ७३ ठिकाणांवरील जीवाश्म आणि इतर ठिकाणांवरील दस्तावेजांधारे पृथ्वीच्या तापमानाचा गेल्या ११ हजार वर्षापासून ते आतापर्यंतचा इतिहास सादर करण्यामध्ये अभ्यासकांना यश आलं आहे. शीतयुगाच्या म्हणजे ११ हजार तीनशे वर्षापासून आतापर्यंतच्या इतिहासाची वर्गवारी या अभ्यासकांनी काढली असता गेल्या १० वर्षामध्ये वाढलेलं तापमान सर्वाधिक नोंदलं गेलं आहे. ११ हजार तीनशे वर्षामधील तापमानाच्या नोंदीहून ८० टक्के तापमानवाढ ही फक्त गेल्या १० वर्षामध्ये झाली आहे. ज्या ११ हजार तीनशे वर्षाचा अभ्यास करण्यात आला, त्या काळाला भू-वैज्ञानिक शब्दावलीमध्ये ‘होलोसीन’ असं नाव देण्यात आलं आहे. हा काळ यासाठी महत्त्वाचा आहे कारण यामध्ये मानवी सभ्यतेचा इतिहास दडलेला आहे. अभ्यासकांनी सांगितलेली ही माहिती यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण आतापर्यंत ग्लोबल वॉर्मिगच्या संदर्भात मागच्या सुमारे २ हजार वर्षाचंच अध्ययन करण्यात आलं आहे. आता वैज्ञानिकांना सुमारे साडेअकरा हजार वर्षातील पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागातील तापमानाची नोंद करता आली, हे पहिल्यांदाच होत आहे.
आपल्यासाठी हजारो वष्रे हा फार मोठा काळ आहे. पण, पृथ्वीच्या वयाच्या हिशेबाने हा काळ म्हणजे काही क्षणही नाहीत. पृथ्वीवर आतापर्यंत पाच मोठी हिमयुगं येऊन गेली आहेत, यावरून याचा अंदाज बांधता येऊ शकतो. आताही आपण एका हिमयुगातून जात आहोत. आता हिमयुगाचा ‘इंटर ग्लॅशिअर’ काळ आहे. त्यामध्ये ग्लॅशिअर आकुंचित होतात. सध्याचं हिमयुग सुमारे २५ लाख वर्षापूर्वी सुरू झालं होतं. पहिलं हिमयुग सुमारे दोन ते अडीच अब्ज वर्षापूर्वी झालं होतं. यावरून अंदाज बांधता येतो की, पृथ्वीच्या वयापुढे मानवी सभ्यतेचं वय काय आहे आणि थोडयाच काळात आपण अशा कारवाया केल्या की त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढू लागलं, हेदेखील आपल्या लक्षात येईल. या कारवाया आणखी योग्य दृष्टिकोनातून समजण्यासाठी आपल्याला आणखी स्पष्ट करावं लागेल की ग्लोबल वॉर्मिग ही सा-या मानवी सभ्यतेची नाही तर ती फक्त गेल्या शंभर वर्षाची देणगी आहे.
वास्तविक, मागच्या पाच हजार वर्षात पृथ्वीचं तापमान कमी होत आहे. पण गेल्या पाच हजार वर्षात तिच्या तापमानात जेवढी घट झाली तेवढीच वाढ गेल्या शंभर वर्षात झाली आहे. ग्रीन हाऊस गॅस कमी करण्याचं जे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे ते साध्य झालं तर पृथ्वीचं तापमान इतकं वाढेल जेवढं मानवी सभ्यतेच्या इतिहासात केव्हाच वाढलं नव्हतं. तापमानाच्या या वाढीचे दुष्परिणाम अनेक समुद्रकिना-यांवर दिसून येतील. ज्या मालदीवची चर्चा सध्या राजकीय षड्यंत्रामध्ये जोरात होत आहे ते संपूर्ण बेट समुद्रात बुडू शकतं.
सध्याच्या काळात आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, अर्थव्यवस्थेमध्ये जी मंदी आली आहे ती पर्यावरणाला सुधारण्याच्या प्रयत्नांना झटका देणारी आहे. याचं कारण संपूर्ण जगात मंदीबरोबरच बेरोजगारीही वाढली आहे. अशा वेळी पर्यावरणाचा मुद्दा बाजूला ठेवून आर्थिक विकास वेगाने धावण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा सरकारला होईल. वेगवान आणि किफायती आर्थिक विकासासाठी पारंपरिक फॉसिल इंधनांवर आधारित ऊर्जाच सध्या सर्वात उपयुक्त आहे. बिगर पारंपरिक आणि पर्यावरणासाठी फायदेशीर ऊर्जेकडे लक्ष देण्यासाठी सध्या कोणाकडे वेळही नाही आणि पैसाही नाही. ज्यावेळी पर्यायी स्वस्त इंधन हाती लागेल त्यावेळीच कोळसा आणि खाणतेलाच्या वापरावर निर्बंध येऊ शकतील.
ग्लोबल वॉर्मिगसाठी सर्वात जास्त जबाबदार माणूस आणि त्याच्या हालचाली (अॅक्टिव्हिटीज) आहेत. स्वत:ला पृथ्वीवरील सर्वात बुद्धिमान समजणारा मनुष्य अज्ञानामुळे किंवा जाणूनबुजून आपलं राहण्याचंच ठिकाण नष्ट करण्यास निघाला आहे. मानवनिर्मित या कारवायांनी कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रोजन ऑक्साइड इत्यादी ग्रीन हाऊस गॅसचं प्रमाण वाढत आहे. त्यातून या गॅसचं आवरण सघन होत जात आहे. हेच आवरण सूर्याच्या परावíतत किरणांना थांबवत आहे आणि त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होत आहे. वाहने, विमाने, वीजनिर्मितीचे प्रकल्प, उद्योग यातून अंदाधुंद गॅसचं उत्सर्जन होऊन कार्बन डायऑक्साईडमध्ये वाढ होत आहे. त्याचं दुसरं कारण जंगलांचा मोठया प्रमाणार होत असणारा नाश हे आहे. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण नसर्गिकपणे नियंत्रित करण्यामध्ये जंगलाची भूमिका महत्त्वाची असते. पण, त्यांचं मोठया प्रमाणावर दहन होत असल्यामुळे कार्बन डायऑक्साइडच्या नियंत्रणाचं माध्यम आपल्या हातून सुटत आहे.
ही सारी परिस्थिती लक्षात घेता, वेळीच योग्य उपाययोजना आखल्या नाहीत तर येणा-या काळात ग्लोबल वॉर्मिगमध्ये आणखी वाढ होत जाईल आणि पृथ्वी आणखी पोळत राहील. पृथ्वीचं हे पोळणं अखेर तिच्यावर वास्तव्य करणा-या सजिवांसाठी घातक ठरेल. यामुळे पाण्याचे प्रवाह आटत जातील. मुक्या जनावरांची दुर्दशा होईल. पृथ्वीवरील वनस्पतींचं प्रमाणही कमी होत जाईल. मानवाला दिलासा देणारा निसर्ग केवळ चित्रांपुरता मर्यादित राहील. हे संकट ओळखून समाजातील प्रत्येकाने वेळीच जागं होऊन ग्लोबल वॉर्मिगपासून बचावासाठी पावलं उचलायला हवीत.