मुंबईतील कलादालनांमध्ये प्रदर्शन भरवणे ही साधीसोपी गोष्ट नव्हे. अनेक रंगलेखक, शिल्पकार, छायाचित्रकारांना त्यासाठी लागणारा खर्च पेलवत नसल्याने त्यांना कलादालनात पोहोचण्याचा प्रवास करणे डोईजड होत असते. अशा परिस्थितीत काही कलादालने वेगवेगळे उपक्रम राबवून, कलावंतांसाठी सहकार्याचा हात पुढे करत असतात. त्यांच्या कलाकृती रसिकांसमोर आणत असतात. अशाच उपक्रमांचा भाग असलेल्या प्रदर्शनांमधून कलावंत प्रोत्साहन कमवत असतात. असेच एक समूह कलाप्रदर्शन वरळी येथील आर्ट अॅण्ड सोल आर्ट गॅलरीत सुरू असून, त्यात रत्नागिरीच्या सहयाद्री स्कूल ऑफ आर्ट्सच्या नऊ विद्यार्थी कलावंतांच्या कलाकृतींची ओळख करून दिली आहे. पुढच्या आठवडयात सिमरोझा आर्ट गॅलरीत सहा प्रथितयश कलावंतांचे प्रदर्शन भरणार असून, हे कलादालनही कलावंतांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम अनेक वर्षापासून राबवत आहे. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केलेच पाहिजे.
कोकणातील रत्नागिरीच्या सहयाद्री स्कूल ऑफ आर्ट्सच्या नऊ विद्यार्थ्यांमधील रंगलेखनाची पारख करून त्यांच्या कलाकृतींचे ‘रायझिंग होरायझन’ हे चित्रप्रदर्शन वरळी येथील आर्ट अॅण्ड सोल कलादालनात १३ जुलैपासून सुरू झाले. वर्षा कराळे यांनी आयोजित केलेले हे प्रदर्शन १८ जुलै अर्थात आज सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे.
रंगलेखक करण शेटय़े, आरती होडे, कश्मिरी राऊळ, मकरंद राणे, श्रीकांत कांबळे, श्वेता उरणे, सूरज दहिवलकर, वैभव निर्मल आणि विक्रांत बोठारे या कलाकारांनी आपल्या रंगलेखनाची जादू या प्रदर्शनाद्वारे पेश केली असून, प्रत्येकाची व्यक्त होण्याची शैली स्वतंत्र आहे. त्यामुळे एकाच कलादालनात वेगवेगळे रंगानुभव घेण्याची संधी कलारसिकांना आहे.
खरे तर हे प्रदर्शन बघून रत्नागिरीच्या सहयाद्री स्कूल ऑफ आर्टमध्ये गुणवान कलावंतांची खाण असावी, याची प्रचिती येते. त्या खाणीतील निवडक ‘नवरत्न’ वेचून त्यांनी साकारलेल्या कलाकृतींची ओळख या प्रदर्शनाने करून दिली आहे. या नऊ विद्यार्थ्यांनी विविध रंगछटांनी युक्त अशी मूर्त, अमूर्त आणि अर्धमूर्त शैलीमधील विविध रंगांतील अनेक चित्रे या प्रदर्शनात मांडली आहेत. या उभरत्या कलाकारांनी साकारलेल्या चित्रांमध्ये कमालीचे रंगवैविध्य आणि नवकल्पनांनी हे प्रदर्शन सजलेले जाणवते.
कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले आहे. या सौंदर्याकित प्रदेशात रंगलेखनाचे प्रशिक्षण घेताना आपोआपच एक सौंदर्य न्याहळण्याची आणि ते अंतर्मनात साठवून ठेवण्याची दृष्टीही मिळत असते. या नऊही रंगलेखकांच्या कलाकृती पाहताना त्याची प्रकर्षाने जाणीव होते. त्यांच्या कलागुणांचा खजिना मुंबईतील रसिकांसमोर सादर करण्याचे आणि त्यांच्या रंगलेखनाचा गौरव करण्याचे व्रत आर्ट अॅण्ड सोल गॅलरीने स्वीकारले आहे.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मुलुखात अशा कलावंतांच्या खाणी आहेत. आर्ट अॅण्ड सोल कलादालन हे अशा खाणींतील रत्नांची पारख करणारे आणि त्यांना रसिकांसमोर पेश करणारे महत्त्वाचे केंद्र ठरते आहे. अशी प्रदर्शने पाहण्याची संधी मुंबईकरांना वारंवार उपलब्ध व्हावी, यासाठी या कलादालनाच्या संचालिका तराना खुबचंदानी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
वेगवेगळ्या गावांतील सहा सुप्रसिद्ध शिल्पकार आणि चित्रकारांचे ‘मेटाफोरफोसिस’ हे चित्रप्रदर्शन मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयानजीकच्या सिमरोझा आर्ट गॅलरीत २० जुलैपासून सुरू होणार असून ते ३१ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहणा-या या प्रदर्शनाचे आयोजन सिमरोझा आर्ट गॅलरी आणि आर्टक्वेस्ट आर्ट गॅलरी यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. सुकुमार के, स्टॅलिन जोसेफ, के.वी. एस. प्रसाद, रमेश थोरात, सुमंतो चौधरी आणि आसीफ हुसेन या सहा प्रथितयश कलाकारांचा ‘षटकार’ या प्रदर्शनातून अनुभवायला मिळणार आहे.
आंध्र प्रदेशचे सुकुमार के यांनी भारतीय महाकाव्यातील व्यक्तिरेखा आपल्या कुंचल्याच्या सहाय्याने जिवंत केल्या आहेत. स्टॅलिन जोसेफ हेसुद्धा आंध्र प्रदेशचे असून, त्यांच्या कलाकृतींमध्ये मूळ डिझाईन आणि त्याचे रूप, रंग आणि संरचना यांचा प्रमुख रंगसिद्धांताबरोबर झालेला विकास पाहायला मिळतो. के. वी. एस. प्रसाद आंध्रच्या एका गावातून उदयाला आले असून, भारतीय ग्रामीण जीवनाचे संवेदनशील आणि सुखद निसर्गचित्र, त्याचे प्रतीक म्हणून चित्रित केलेली सुंदर तरुणी हे त्यांच्या चित्रांचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
पुण्याचे रमेश थोरात मुंबईत सेटवरची चित्रं चित्रित करायला लागले आणि त्याच माध्यमातून त्यांनी आपले काम सुरू केले, पण कलेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा पुण्याला जाऊन चित्रकारीतेला वाहून घेतले. विवाहाच्या चालीरितीमध्ये असलेल्या गोंधळ आणि जागरणाची पूर्ण मालिका चारकोल आणि अॅक्रिलिकच्या सहाय्याने साकारून त्यांनी तो माहोल उभा केला आहे.
सुमंतो चौधरी हे हैदराबाद येथील असून, निसर्ग आणि खेडेगावाच्या स्थापत्यकलेने त्यांना आकृष्ट केले आहे. रंगीत पेन्सिल, पेन, जलरंग, अॅक्रिलिक रंग आणि मिश्र माध्यमांचा उपयोग करून त्यांनी आपली चित्रं साकार केली आहेत. आसीफ हुसेन कोलकाताचे रहिवासी आहेत. त्यांच्या चित्रांमधून मुख्यत: जीवन आणि भारतीय संस्कृती यांवर लक्ष केंद्रित केले आहे. कॅनव्हासवर चित्रित केलेली त्यांच्या कलाकृती भारतीय संस्कृती आणि एकात्मकतेचा संदेश देणा-या आहेत.
गेली ४४ र्वष सिमरोझा आर्ट गॅलरी विविध कलाकृतींची प्रदर्शने मांडत असून, गॅलरीने चित्रकला, छायाचित्रं, शिल्पकला, िपट्र आणि मातीची भांडी बनवणा-या कलाकारांना सतत प्रोत्साहन दिले आहे. वेगवेगळ्या गावांतील सहा कलावंतांच्या कलाकृती एका कलादालनात ठेवून कलावंतांची मैत्री घट्ट करण्याचा उपक्रम कौतुकास्पदच म्हणावा लागेल.