म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे येत्या जून महिन्यात ९७० घरांची सोडत काढण्यात येणार असून त्याची जाहिरात पुढील आठवडयात काढली जाणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी सांगितले.
मुंबई- म्हाडाच्या मुंबई मंडळाद्वारे येत्या जून महिन्यात ९७० घरांची सोडत काढण्यात येणार असून त्याची जाहिरात पुढील आठवडयात काढली जाणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी सांगितले. तर ऑगस्ट महिन्यात गिरणी कामगारांसाठी एमएमआरडीएच्या २ हजार ४१८ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी सोडतीदरम्यान केली.
त्यामुळे सोमवारी म्हाडाद्वारे काढण्यात आलेल्या सोडतीत ज्यांचे गृहस्वप्न पूर्ण झाले नाही त्यांना येत्या काही महिन्यांत निघणा-या बंपर लॉटरीत पुन्हा आपले नशीब अजमावता येणार आहे. यंदा एप्रिल आणि मे महिन्यात गिरणी कामगारांच्या सोडतीचे नियोजन चालू राहिल्याने त्याचा परिणाम म्हाडाच्या नेहमीच्या सोडतीवर पडला.
परिणामी यंदाची सोडत जूनमध्ये काढण्यात येणार असून सोडतीत प्रतीक्षानगर, सायन, मुलुंड, मानखुर्द, गोरेगाव, बोरिवली, दहिसर आदी ठिकाणांतील घरांचा समावेश असेल. सोडतीत विखुरलेल्या घरांचा समावेश असल्याने त्यांची किंमत परवडणारी राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एमएमआरडीएद्वारे भाडेतत्त्वावरील योजनेअंतर्गत बनवण्यात आलेली ५० टक्के घरे कामगारांना सोडत पद्धतीने देण्यात येणार आहेत. या घरांचे वितरण म्हाडामार्फत केले जाणार असल्याचा अंदाज उपाध्यक्ष झेंडे यांनी वर्तवला. ही सोडत म्हाडाच्या जनरल सोडत पद्धतीने काढली जाणार असून आतापर्यंत ज्या गिरण्यांच्या जागेवरील घरांची सोडत काढण्यात आली आहे, त्यांची नावे या सोडतीतून वगळण्यात येणार असल्याचे झेंडे पुढे म्हणाले.
भाजपाद्वारे सोडत हायजॅक.. सेनेचा एकही झेंडा नाही
‘गिरणगावची संस्कृती, देवेंद्र फडणवीस शासनाची वचनपूर्ती’, ‘भाजपची वचनपूर्ती, तुमची स्वप्नपूर्ती’ असा संदेश असणारे भलेमोठे बॅनर रंगशारदा सभागृहाबाहेर लावण्यात आले होते. गृहस्वप्नपूर्तीचा संदेश देण्यासाठी बनवण्यात आलेल्या चिन्हात घराच्या चित्रासोबत केवळ भाजपाचे कमळाचे चिन्ह होते.
सोडत परिसरात सर्वत्र भाजपाचे झेंडे लावण्यात आले असताना या सर्व चित्रात शिवसेनेचा एकही झेंडा लावण्यात आला नाही. भाजपा-शिवसेनेत चालू असणा-या शीतयुद्धाची प्रचिती सोडतीनिमित्ताने आली. सोडतप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातूनही भाजपा सरकारच्या घराबाबतच्या धोरणावर भर दिला.
आमचे सरकार सत्तेत आल्यापासून कामगारांच्या गृहस्वप्नपूर्तीसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. म्हाडाच्या यंदाच्या सोडतीत ज्यांना घर लागले नाही त्यांनाही नक्की घर देणार हे आमचे वचन आहे. नवीन विकास आराखडयात परवडणा-या घरांसाठी योजना बनवण्यात येत असून तिथे कामगारांचाही विचार करू. शेवटच्या कामगाराला घर मिळेपर्यंत आमचे सरकार कार्यरत राहील, असे नवे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
कुठे स्वप्नपूर्ती.. तर कुठे निराशा
९ तारीख महत्त्वाची ठरली
माझे वडील नारायण पवार सेंच्युरी मिलमध्ये होते. दर महिन्याच्या ९ तारखेला खारी, बिस्किटे, बटर मिळायचे. यंदाही ९ तारीख महत्त्वाची ठरली असून याच तारखेला गृहस्वप्नपूर्ती झाल्याने वेगळाच आनंद मिळाला. मी स्वत: वृत्तपत्रविक्रेता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहता शहरात हक्काचे घर घेण्याचा विचारही मनात आला नव्हता. मात्र वडिलांच्या आशीर्वादाने त्यांचा वारसदार म्हणून यंदाच्या सोडतीत घर लागल्याने आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
– अरुण पवार, सेंच्युरी मिल
कष्टाचे फळ
गिरण्या बंद झाल्या तेव्हापासून कुटुंबीयांसोबत कष्टाचे जीवन जगत आहोत. वडील सोबत नसल्याने त्यांची कमतरता नेहमी जाणवत असते. अशा परिस्थितीत आज त्यांच्यामुळे मला आणि आईला हक्काचे घर मिळाले. वडील असते तर हलाखीच्या परिस्थितीवर मात करत आता स्वत:च्या हक्काचे घर मिळाल्याचा आनंद त्यांनाही निश्चितच झाला असता.
– संदेश गावडे, वेस्टर्न इंडिया मिल
प्रत्येक कामगाराला घर मिळायला हवे
गिरण्या बंद पडल्यापासून आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आता माझे वय ७० वर्षे आहे. यंदाच्या म्हाडाच्या सोडतीतून घर लागेल, अशी आशा होती. पण ती फोल ठरली. ज्यांना सोडतीत घर लागले त्यांचे काय? हक्काच्या घरासाठी लढण्याची आता ताकद उरली नाही. सरकारने सर्व गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांना घर दिले पाहिजे. हा प्रत्येक कामगाराचा अधिकार आहे.
– नारायण ताम्हणकर, प्रकाश कॉटन मिल
आनंद मावळला..
गिरण्या बंद पडल्यापासून आम्ही परळ येथे भाडयाने राहात आहोत. शिक्षणाअभावी चांगली नोकरी नसल्याने आर्थिक टंचाई आहे. मुंबईतला गिरणी कामगार आता लोप पावत आहे आणि सरकारला याची जाणीवही नाही. इतक्या वर्षानी हक्काचे घर मिळणार, म्हणून अपेक्षा बाळगून होतो. कुटुंबातही आनंदाचे वातावरण होते. पण सोडतीत घर न लागल्याने आनंद मावळला आहे.
– वसंत चव्हाण, प्रकाश कॉटन मिल
केवळ आश्वासने
हक्काच्या घराचे स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगून आहे, पण प्रत्येक कामगाराला घर मिळेल याच्याबाबतीत शासनाच्या केवळ घोषणाच ऐकत आहोत. यंदाच्या सोडतीत पदरी निराशाच पडली आहे.
– सिद्धपा मनोळी, प्रकाश कॉटन मिल