आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण आपल्यामध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी, यासाठीच तयार केले आहेत. अंगण आणि रांगोळी यांच्यातील सहजीवन, एकत्रित फराळाची मजा, किल्ले करतानाचे संघटन हे सर्व संस्कार दिवाळीमुळेच झाले आहेत.. निष्पाप आनंद बाजूला राहिला असला तरी बालपणाचे बोट धरून मी तितक्याच उत्साहाने आजही दिवाळी साजरी करतो..
माझे बालपण एकत्र कुटुंबात गेले.. त्यावेळच्या आनंदाचे मला आजही महत्त्व वाटते. माझ्या आसपास सगळे नातेवाईक, चुलत भावंडे, काका, काकू होते.. आतासारखी ‘हम दो हमारे दो’अशी चौकोनी बंदिस्त कुटुंबे नव्हती.. दर दिवाळीत सुट्टय़ा पडल्या की, आम्हा बच्चे कंपनीचे पहिले काम म्हणजे घरासमोरचे अंगण साफ करायचे.. आधी तिथले खडे वेचून बाजूला करायचे, नंतर झाडू मारायचा.. आणि मग सर्वानी मिळून शेजारच्या गोठय़ातून शेण आणायचे.. आम्ही सर्व मिळून मोठय़ा उत्साहाने अंगण सारवायचो.. शेणाने सारवलेले अंगण सुकल्यानंतर आई, काकी अशा सर्वजण मिळून त्यावर सुंदर रांगोळी काढायच्या.. खरे तर स्वप्नवत वाटेल आता हे सर्व पण हे सर्व मी प्रत्यक्षात जगलो आहे.. आणि म्हणूनच मी स्वत:ला भाग्यवान समजतो. आज ज्याचे मी वर्णन करू शकतो.. असे अनुभव मी त्या वयात घेतले जेव्हा असे काही वर्णन करण्याची, साहित्यिक वगैरे असण्याची क्षमता नव्हती.. खरे तर या परंपरेमुळेच मला अंगण आणि रांगोळी यांच्यातील सहजीवन कळलं..
दिवाळीपूर्वीच दिवाळी आली आहे.. हे कसं कळायचं. तर आमच्या सत्र परीक्षेच्या शेवटच्या एक-दोन पेपरच्या आधी आजोबा लगबगीने वाण सामानाची यादी करायचे अन् मग दुकानातून हा मोठा वाण सामानाच्या पिशव्यांचा ढीग स्वयंपाक घरात आई, काकी, आजीच्या ताब्यात दिला जायचा.. एकीकडे परीक्षा संपत यायच्या तर दुसरीकडे रवा बेसण भाजल्याचा तुपातला खमंग वास दरवळत राहायचा.. आम्हाला सुट्टय़ा लागल्या तरी सुट्टीतला अभ्यास असायचाच.. पण तो अभ्यास करण्यातही मजा होती.. या अनुभवातूनच एकत्रित फराळ करण्याची, एकत्रित खाण्यापिण्याची मजा कळली अन् सवयही लागली.. दिवाळीत आम्हा मुलांना झेपतील असेच फटाके दिले जायचे.. त्यातल्या त्यात भुईचक्र मला आवडायचे.. जरा मोठा झाल्यावर मला वाचनाची आवड असल्याने दिवाळीत हमखास घरी येणारे दिवाळी अंक वाचण्याची आवड जोपासली..
त्याकाळी जरी आमच्या घरी एकच दिवाळी अंक येत असला तरी.. आमच्या शेजारी, ग्रंथालयात, मित्रांकडे येणारे अनेक दिवाळी अंक आवर्जून वाचले जायचे.. पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, अरविंद गोखले असे अनेकजण माझे आवडते साहित्यिक होते. दिवाळी अंकात विनोदी कथांना माझे प्राधान्य असायचे.. कोणताही दिवाळी अंक वाचताना मी आधी शब्दांच्या कंदिलाप्रमाणे प्रकाशित होणारी अणुक्रमणिका वाचून काढायचो.. खरे तर दिवाळी अंकाद्वारेच तर माझ्या संस्कारात शब्दांच्या बिया पेरणारी अशी दिवाळी असायची.. हा अनुभव खरोखरंच समृद्ध करणारा होता.. मला वाटते आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सण त्यात करावयाच्या पारंपरिक गोष्टी या आपल्यामध्ये संवेदनशीलता निर्माण व्हावी यासाठीच तयार केल्या आहेत, असे प्रकर्षाने जाणवायचे ते किल्ला बनवताना..
आमच्याकडे अभ्यंगस्नानाचा एक सोहळा असायचा.. आपण राजकुमार वगैरे आहोत, असे फिल देणारा हा अनुभव होता.. सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक तरंगता देणारे अभ्यंगस्नान वाडय़ातल्या चौथ-यावर सर्वासमोर व्हायचे.. आत्तासारखे दार बंद करून अभ्यंगस्नान होत नव्हते.. अभ्यंगस्नानानंतर फराळाचे ताट मधोमध ठेवून आम्ही सगळे एकत्रित फराळ करायला बसायचो.. आणि हमखास शेजारचे कुणीही काय वहिनी कानवले झालेत ना.. वहिनींच्या हातचे कानवले म्हणजे बेस्टच असे म्हणत सुगरणपणाची पावती देऊन जायचा.. यासाठी खूप जिव्हाळय़ाची ओळख असलीच पाहिजे असे काही नव्हते.. माझ्याकरिता हा वैभवाचा काळ होता..
७०-८० च्या दशकांत यातला आनंद काही प्रमाणात कमी होऊ लागला.. पण तरीही हल्लीची आपल्या पुढची पिढी आपले संस्कार जपताना पाहणे हा आनंद सोहळाच वाटतो मला. दिवाळी अंकाचे म्हणाल तर आत्ताशा मीच किमान ५०-६० अंकाकरिता साहित्य पाठवतो.. त्यामुळे अगदी पूर्वीसारखे साहित्य वाचनाची उत्सुकता असण्यापेक्षा, कुरिअरने माझ्याकडे आलेल्या दिवाळी अंकात मी पाठवलेले साहित्य कुठे, कसे, योग्य की अयोग्य, चुका किती.. आदी तपासण्यातच माझा वेळ जातो.. हे झाले की, मग मी इतरांनी काय लिहिले आहे, याची नोंद घेतो.. दिवाळीचे रंग सर्वार्थाने बदलत असले तरीही साहित्याचे स्त्रोत निर्माण होणारे वर्तमानाचे लेखन त्यानिमित्ताने होत असते..
मी स्वत:ला भाग्यशाली मानतो, याचे आणखी एक कारण म्हणजे माझे ८८ वर्षाचे बाबा अन् ८० वर्षाची आई आजही माझ्यासोबत आहे, अन् आजही माझी आई सर्वासाठी उटणं घरीच तयार करते, सर्वाना उटण्याची आंघोळ, औक्षण असे साग्रसंगीत दिवाळीचे क्षण तिच्यासोबतीने मी साजरे करतो. मला औक्षण करण्याचा पहिला मान आईला, तर दुसरा पत्नी प्रज्ञा अन् तिसरा लेक वेदश्रीला असतो.. यानिमित्ताने आम्ही बाप-लेक धम्माल करू शकतो..
माझा लेक आदित्यनेही नुकताच गीत लेखन क्षेत्रात प्रवेश केला आहे.. आजही आमच्या छोटय़ाशा फ्लॅटमध्ये फुलबाजा उडवण्याची गंमत मी अनुभवतो.. माझी पत्नी सुगरण आहे आणि अजून तरी आमच्याकडे पार्सल संस्कृती आलेली नाही.. त्यामुळे ती तिच्या पाककलेच्या गुरू अर्थातच तिच्या सासूच्या मदतीने दिवाळीचे अत्यंत खमंग पदार्थ घरीच बनवले जातात..
दिवाळीचे चार दिवस आम्ही सगळे घरीच असतो.. या काळात आम्ही आदिवासी पाडे, अनाथालयात जाऊन या ठिकाणच्या मुलांना मिठाईसोबतच नवे कोरे दिवाळी अंकाचेही वाटप करतो, शाळांनाही अंक भेट देतो..मला वाटते दिवाळीतला निष्पाप आनंद बाजूला राहिला असला तरी आजही जेव्हा दिवाळीनिमित्त माझे विद्यार्थी माझ्याकडे येतात, तेव्हा मला माझ्या विस्तारलेल्या कुंटुबांचा प्रमुख म्हणून सगळय़ांच्या आनंदामध्ये आनंदी होत, गाण्याच्या, काव्यवाचनांची मस्त मैफल आम्ही जमवतोच.. शेवटी मला असे वाटते की, बालपणाचे बोट धरून येणारी दिवाळी अजूनही मी तितक्याच उत्साहाने साजरे करतो. वाचकांकडून मिळणारा भरभरून प्रतिसाद हीच माझी दिवाळी असते..
[EPSB]
दिवाळी शब्दांची अन् कलेची..
दिवाळी मग ती सामान्यांची असो वा संपादकांची, राजकीय नेत्यांची असो वा कलाकारांची, साहित्यिकांची असो वा खेळाडूंची.. प्रत्येकाच्या सेलिब्रेशनची एक खासियत असते.. आणि ही खासियत जाणून घेताना कलाकारांची अन् साहित्यिकांची दिवाळी कशी साजरी होते.. याची ही दिवाळी भेट खास दै. प्रहारच्या वाचकांकरिता..
[/EPSB]