एखाद्या कुटुंबात होणारा बाळाचा जन्म हा त्या कुटुंबासाठी अतिशय आनंददायी अनुभव असतो. पण हा आनंद हिरावून घेणा-या, जन्माला आलेलं बाळ पळवून नेणा-या प्रवृत्ती समाजात वाढत चालल्या आहेत. या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रसूत मातेने दक्ष राहण्याची, रुग्णालयातील सुरक्षा प्रणालीत काही सुधारणा करण्याची आणि बाळचोरी करणा-यांवर कठोर कारवाई करण्याची गरज तर आहेच. पण त्याचबरोबर रुग्णाच्या नातेवाइकांनीही रुग्णालयातील अनावश्यक गर्दी टाळली तर ब-याच प्रमाणात सुरक्षा यंत्रणांवरचा ताण कमी होऊन या प्रकारांना आळा बसेल.
रुग्णालयात अनावश्यक गर्दी नको
राज्यात मुंबई, पुणे, कल्याण यांसह विविध ठिकाणी बाळचोरीची प्रकरणे वाढत चालली आहेत. या प्रकरणांचा विचार करता गुन्हे करण्यासाठी रुग्णालय सॉफ्ट टार्गेट ठरत असून, हे प्रकार रोखण्यासाठी आता प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. या बाळचोरी प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर, बाळचोरी करणा-यांची कार्यपद्धती, रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था आणि बाळचोरी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता आणि पद्मश्री डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक यांच्याशी आमचे प्रतिनिधी सचिन धानजी यांनी केलेली ही बातचीत..
बाळाची चोरी होण्यामागची कोणती कारणे आहेत, असं आपल्याला वाटतं?
मुंबईत रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर विविध सरकारी रुग्णालयात प्रचंड गर्दी असते. रुग्णालयातील विविध कक्षांत रुग्णांसोबत असलेल्या नातेवाइकांबरोबरच रुग्णाला पाहायला येणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. त्यातच प्रसूतिगृहात दाखल झालेली महिला प्रसूत झाली की, तिला व तिच्या बाळाला पाहायला येणा-या नातेवाइकांचं प्रमाण तर खूपच जास्त असतं. यामुळे महापालिकेसह सर्वच रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था कोलमडून पडते. बाळ झाल्याची बातमी ऐकून शेजारी-पाजारीही रुग्णालयात प्रसूत महिलेची विचारपूस करायला येत असतात. लहान बाळाला हाताळत असतात. मात्र, अशा प्रकारच्या वाढत्या रुग्ण संख्येवर आणि त्यांच्या नातेवाइकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. त्यामुळेच काही वेळा असे चोरीचे प्रकार घडतात.
बाळ चोरणा-यांची कार्यपद्धती साधारणत: कशी असते?
रुग्णालयात बाळचोरी करण्यापूर्वी, संबंधित महिला या प्रसूत झालेल्या महिलांना हेरतात. जसे की, ती एकटी आहे, गरीब आहे. जन्मलेले बाळ मुलगा आहे. एकदा चोरी करणा-या महिलेला प्रसूत झालेल्या महिलेची पूर्ण माहिती मिळाली की, मग ती बाळाच्या आईशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते. मग ती तिला तिच्या विविध कामांत मदत करते. तिला बाथरूमला घेऊन जाते. तिचे कपडे धुते. त्यामुळे बाळाच्या आईचाही त्या महिलेवर विश्वास बसतो. हा विश्वास बसल्यामुळे अशी प्रसूत माता स्वत:च्या बाळाला तिच्या जबाबदारीवर सोपवून बाथरूमला जाते किंवा झोपून जाते. याचाच फायदा उठवून चोरी करणारी महिला बाळाला घेऊन पळून जाते. बाळचोरी होण्याचे प्रकार हे पहाटे किंवा रात्रीच्या वेळी होत असतात. ज्या काळात नर्सिग सुपरिटेंडंट स्टाफही कमी असतो.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये असलेली सुरक्षा व्यवस्थेबाबत तुम्ही समाधानी आहात का?
रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे ही उपाययोजना आहे. केईएम रुग्णालयात बाळाची चोरी झाल्यानंतर, हे मूल चोरणा-या महिलेला कॅमे-यात टिपून पकडण्यात आले होते. त्यामुळे कॅमेरे बसवल्यानंतर त्यावर २४ तास देखरेख ठेवायला हवी. सुरक्षा प्रणालीचा एक भाग म्हणून या व्यवस्थेची पातळी उंचावण्याची गरज आहे. ज्याप्रमाणे रुग्णालय किंवा प्रसूतिगृह यांच्यातील विभागांकडे लक्ष केंद्रित केले जाते, त्याप्रमाणे सुरक्षा विभागाकडेही लक्ष वेधणे आवश्यक आहे. त्यामुळे केईएम रुग्णालयात सर्व विभागप्रमुखांसोबत होणा-या बैठकीमध्ये सुरक्षा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यालाही सहभागी करून घेतलं जात होतं. त्यामुळे डॉक्टरांच्या काही समस्या सुरक्षा अधिका-यांना समजू शकतात आणि त्यातून निश्चित, असा परिणाम आम्हाला केईएम रुग्णालयात पाहायला मिळाला होता. शीवमध्ये मोहिनी नेरुरकर यांचे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर प्रसूतिगृहांच्या कक्षात आणि लहान मुलांच्या आयसीयूमध्ये महिला सुरक्षारक्षक तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रसूतिगृहातील बाळ नेताना, त्यावर विशेष लक्ष ठेवलं जायचं. या सर्व खबरदारीमुळे केईएम रुग्णालयात अशा घटना टाळता आल्या होत्या.
बाळचोरी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे, असं वाटतं?
बाळचोरी हे आता सॉफ्ट टार्गेट होऊ लागलं आहे. मुंबई, पुणे, कल्याण यांसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा घटना घडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या असो वा सरकारी रुग्णालयात दोन्ही ठिकाणी खासगी सुरक्षारक्षक ‘आउटसोर्स’ करण्याची गरज आहे. कदाचित या निर्णयाला कामगार संघटनांकडून विरोध होईल. परंतु अशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था ही काळाजी गरज होऊन बसली आहे. मात्र, या सुरक्षा योजनेबरोबरच रुग्णालयात किंवा विशिष्ट कक्षात जाण्यासाठी ‘पास’ बनवून त्याआधारेच रुग्णालयातील कक्षात प्रवेश दिला जावा.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता बाळचोरीच्या या प्रकरणामुळे जन्मानंतर अर्भकाची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. बाळाला त्याच्या आईजवळ ठेवणेच बंद करायला हवे. नुकतीच जन्मलेली बाळे त्यांच्या मातांच्या जवळ न ठेवता दुस-या कक्षात नर्सरीमध्ये ठेवण्याची व्यवस्था असली पाहिजे. त्यांची ओळख पटण्यासाठी बाळाच्या पायात आणि आईच्या हातात ब्रेसलेट घालता येणे शक्य आहे. जेणेकरून आईला बाळाची अचूक ओळख पटवणे शक्य होईल. जेव्हा बाळाला दूध पाजायचे असेल तेव्हा ती आई नर्सरीमध्ये जाईल आणि दूध पाजेल. मात्र, मातेव्यतिरिक्त इतर कोणाच्याही संपर्कात हे बाळ येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. अशा व्यवस्थेमुळे नातेवाइकांना बाळ पाहता येणार नसल्यामुळे आपोआपच रुग्णालयातील नातेवाइकांची गर्दी कमी होऊन सुरक्षा व्यवस्थाही उत्तम राखली जाईल
पण या अशा प्रकारच्या, बाळाला वेगळे ठेवणा-या ‘नर्सरी’ला विरोध होणार नाही का?
आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, बाळ जन्मल्यानंतर पहिले ३० दिवस हे महत्त्वाचे असतात. या कालावधीत आई, आजी यांव्यतिरिक्त कोणीही बाळाला हात लावू नये. नाहीतर आपण पाहत असाल रुग्णालयात बाळाला पाहण्यासाठी नातेवाइकांसह शेजारी-पाजारीही येत असतात आणि अतिशय नाजूक असलेल्या त्या बाळाला अयोग्य पद्धतीने हाताळत असतात. ओंजारून, गोंजारून गालाला हात लावत मुके घेत असतात. यामुळे बाळाला संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे बाळ आणि माता यांना स्वतंत्र ठेवणे ही गरज आहे. मुळात एक लक्षात घ्यायला हवं की, यामुळे रुग्णालयातील अनावश्यक रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी कमी होऊन त्यांच्यामुळे होणा-या अस्वच्छतेचे प्रमाण कमी होईल. शिवाय सुरक्षा व्यवस्थेवरचा ताणही यामुळे कमी होऊ शकेल. शेवटी बाळ आणि माता यांच्या सुरक्षेबरोबरच आरोग्याचा प्रश्न असल्यामुळे अशी उपाययोजना राबविणे अतिशय आवश्यक आहे.