लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दहा मतदारसंघांचे मतदान झाल्यानंतर महायुतीने अगदी गुपचूप आपला ‘वचननामा’ जाहीर केला आहे.
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील दहा मतदारसंघांचे मतदान झाल्यानंतर महायुतीने अगदी गुपचूप आपला ‘वचननामा’ जाहीर केला आहे. या वचननाम्यातून दलित, अल्पसंख्याकांची तर उपेक्षा करण्यात आली आहे. शिवाय मराठा आरक्षणाबाबतही ठोस भूमिका घेतलेली नाही.
अरबी समुद्रातील शिवस्मारक, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि अन्न सुरक्षा यांसारखे काँग्रेस आघाडीचेच मुद्दे महायुतीने चोरल्याचेही या वचननाम्यातून स्पष्ट होत आहे. लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मोठमोठया घोषणा करणा-या महायुतीने वचननाम्यात मात्र सोयीचे मुद्दे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जनतेपुढे बिंग फुटेल या भीतीने हा वचननामा अगदी गुपचूप जाहीर करण्यात आला.
दलितांसाठी काहीतरी वेगळे पदरात पडेल, या उद्देशाने महायुतीत सहभागी झालेल्या रामदास आठवले यांच्या कोणत्याही मागणीचा वचननाम्यात समावेश करण्यात आला नाही. उलट आघाडी सरकारच्या प्रयत्नाने इंदू मिलमध्ये होत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात देशातील मदरशांचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र राज्यात महायुतीच्या वचननाम्यात त्याचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. मराठा आरक्षण देण्याची घोषणा भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली होती. मात्र या वचननाम्यात तशी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली दिसत नाही.
केंद्राने अन्न सुरक्षा योजना दिली असतानाही अशाच प्रकारची योजना देऊन पाच वर्षे जीवनावश्यक वस्तूंची किंमत स्थिर ठेवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्यात मुंबई-गोवासारख्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही ती कामे आम्ही पूर्ण करू, असे सांगत जनतेला भूलवण्याचा प्रयत्न यातून केला गेला.
शिवसेनेकडून नेहमीच मराठीचा मुद्दा उपस्थित केला जातो. मात्र वचननाम्यात त्याचे कोणतेही प्रतिबिंब दिसत नाही. मोनो, मेट्रो आणि मुंबईतील मोठमोठे प्रकल्प मार्गी लागले असतानाही ते मार्गाला लावण्याचे आश्वासन देऊन ‘आयत्यावर कोयता’ हीच भूमिका महायुतीने घेतलेली दिसते. म्हणूनच त्यांनी जाहीर केलेला वचननामा गुपचूप प्रदर्शित करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याची टीका काँग्रेसने केली आहे.