थकीत रक्कम आणि इतर कारणांमुळे आर्थिक गणित बिघडलेल्या बेस्ट प्रशासनाची स्थिती सुधारण्यासाठी बेस्टकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
मुंबई – थकीत रक्कम आणि इतर कारणांमुळे आर्थिक गणित बिघडलेल्या बेस्ट प्रशासनाची स्थिती सुधारण्यासाठी बेस्टकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
[poll id=”1167″]
बेस्टला विजेमधून काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळत असताना डिसेंबरपासून २०० कोटी वीज ग्राहकांनी थकवल्याचे समोर आले आहे. ही थकीत रक्कम वसूल करण्यासाठी बेस्टकडून विशेष उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बेस्ट प्रशासनाने केलेल्या कारवाईमध्ये अद्याप ६० कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली असून उर्वरित १४० कोटींची थकबाकी लवकरच वसूल केली जाईल, असा दावा बेस्टने केला आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान बेस्टने थकबाकी असलेल्या १० हजार ८९२ ग्राहकांचे वीजमीटर काढले.
त्यापैकी ६ हजार १६७ मीटर वीजबिल भरल्यानंतर पुन्हा लावण्यात आले. शासकीय आस्थापने, कार्यालयांची थकीत वीजबिले मार्च अखेपर्यंत ६१ कोटी २४ लाख होती. या थकीत रकमेपैकी ५० टक्क्यांहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
शिवाय, खासगी ग्राहकांकडूनही वीज थकबाकी वसूल करण्यात येत आहे. वसूल करण्यात येणा-या थकबाकीदारांमध्ये तीन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत वीज थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. पाच ते दहा लाख रुपयांदरम्यान थकबाकी असलेले दोन ग्राहक आहेत.
तर, एक लाख ते पाच लाखांपर्यंत थकबाकी असलेल्यांची संख्या २६१च्या घरात आहे. दरम्यान, वसूल करण्यात येणा-या बिलांमध्ये मोठय़ा रकमेची वीजबिले वसूल करण्यास अधिक प्राधान्य दिले जात असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी सांगितले.