लोकलनंतर मुंबई शहराच्या वाहतुकीचा कणा समजल्या जाणा-या बेस्ट परिवहन उपक्रमाला प्रवाशांअभावी सध्या उतरती कळा लागली आहे.
मुंबई- लोकलनंतर मुंबई शहराच्या वाहतुकीचा कणा समजल्या जाणा-या बेस्ट परिवहन उपक्रमाला प्रवाशांअभावी सध्या उतरती कळा लागली आहे. उत्तम सेवा मिळत नसल्याने प्रवाशांनी इतर वाहतुकीच्या सुविधांचा वापर करत बेस्टकडे पाठ फिरवली.
यामुळे बेस्ट प्रशासनाचे चाक आर्थिक गर्तेत सापडल्याने बेस्ट प्रशासनाने प्रवाशांना भावनिक साद घातली आहे. मात्र प्रवाशांना आवाहन केल्यानंतरही बेस्ट बसच्या सेवेत वक्तशीरपणाचा अभाव असल्याने प्रवाशांनी पुन्हा बेस्ट बसने प्रवास करण्यास लाल कंदील दर्शविला आहे.
मागील १० वर्षापूर्वी बेस्ट बसने प्रवास करणा-यांची संख्या ४५ लाखांच्या घरात होती, मात्र सध्या बेस्टची प्रवासी संख्या ३० लाखांवर आली आहे. प्रवाशांच्या माध्यमातून बेस्ट परिवहन विभागाच्या तिजोरीत ३ कोटी ७६ लाख १९ हजार इतका महसूल मिळत असे. मात्र आता प्रवाशांची संख्या १५ लाखाने कमी झाल्याने बेस्ट परिवहन विभागाला आर्थिक नुकसानीलाही समोरे जावे लागत आहे.
यामागील असलेल्या कारणांचा आढावा न घेता बेस्ट प्रशासनाने थेट प्रवाशांना बेस्ट बसने प्रवास करण्याचे भावनिक आवाहन केले आहे. तर काही बस स्थानकांत प्रवाशांनी रिक्षा-टॅक्सीचा वापर न करता बेस्टचा प्रवास करावा अशा उद्घोषणा सुरू करण्यात आल्या अहेत. त्यामुळे बेस्ट परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती अधिकच केविलवाणी झाल्याचे उघड झाले आहे.
मात्र, बेस्टने प्रवास करण्याचे भावनिक आवाहन मुंबईकरांना करत असताना बेस्ट बस सेवेचा अभूतपूर्व गोंधळ अद्यापही सुरूच असल्याचे समोर येत आहे. अनेक बस स्थानकात बस वेळेत येत नसल्याने २५ ते ३० मिनिटे प्रवाशांना वाट पाहावी लागत आहे. एखादी बस आल्यास गर्दी असल्याने अनेकदा चालक बस थांब्यावर बस थांबवणे टाळतात. तर काही वेळा एका मागून एक बसच्या रांगा लागतात. त्यामुळे अनेक बस रिकाम्या धावतात. याकरता बेस्ट प्रशासनाने योग्य ते नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.
त्यातच मेट्रो व मोनोरेल सुरू झाल्यानंतर बेस्ट परिवहन विभागाची डोकेदुखी अधिकच वाढणार आहे. त्यामुळे भविष्याचा विचार करीत बेस्ट उपक्रमाने आतापासूनच योग्य ते नियोजन करावे, अन्यथा भविष्यात बेस्ट इतिहासात जमा होण्यास वेळ लागणार नाही, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत.
वक्तशीरपणामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे, यामुळे बेस्टचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, याची जाणीव आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका बेस्टला सहन करावा लागत आहे, गर्दीच्या वेळी बस वाहतूक कोंडीत अडकतात. याकरता सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी विशेष बस मार्गिकेची गरज आहे. त्यासाठी मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांवरील शेवटच्या मार्गिकेची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना वेळेत सेवा देणे शक्य होईल.
– जगदीश पाटील (बेस्ट महाव्यवस्थापक )