श्रावण हा मराठी माणसासाठी पवित्र आध्यात्मिक आणि धार्मिक कृत्यांसाठी असलेला महिना असला तरी बॉलिवूड अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीत श्रावण म्हणजे सावन हा प्रणयाराधनेसाठी वापरलेला महिना किंवा हंगाम आहे. त्यामुळे एकीकडे भक्ती, पूजा यांचा जोर असताना बॉलिवूडमध्ये प्रेमाची तपस्या होताना दिसते. त्यामुळे सावन किंवा श्रावणाचा उल्लेख बॉलिवूडमधील गाण्यांमधून प्रणयासाठीच केलेला दिसून येतो.
सावन हा शब्द जरी तोंडावर आला तरी आपल्याला आठवतो तो होडीतून नूतनला घेऊन जाणारा सुनील दत्त. ‘सावन का महिना, पवन करे सोर..’ लता मंगेशकर आणि मुकेश यांचे अतिशय लोकप्रिय गीत मीलन या चित्रपटातील आहे. एक मूक प्रेम या गाण्यातून जाणवते. श्रावणाचा महिना हा अव्यक्त प्रेमासाठी असल्याचा भास या ठिकाणी होतो आणि निरागस प्रेमाची अनुभूती यातून दिसून येते. एल. व्ही. प्रसाद यांचे चित्रपट हे प्रेमावर आधारितच असतात आणि त्यातील गीतेही नेहमीच अजरामर असतात. अर्थात लक्ष्मीकांत-प्यारेलालच्या १९६७ साली दिलेल्या संगीताची अवीट गोडी आजही तितकीच चाखली जाते.
१९६९ साली आलेला धर्मेद्र आशा पारेखचा ‘आया सावन झुमके’ हा पण सुपरहीट चित्रपट होता. जे. ओमप्रकाश यांच्या अ अक्षराने सुरू होणा-या चित्रपट मालिकेतील अतिशय लोकप्रिय चित्रपट. यातील आया सावन झूम के हे लता मंगेशकर आणि मोहंमद रफी यांचे गीत आजही ओठावरील गाणे असते. बॉक्स ऑफिसवर सुपरहीट ठरलेल्या या चित्रपटाचे संगीतही लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनीच दिलेले होते. पावसातील होणारा वर्षाव हा प्रेम घेऊन येतो आणि माणसाला आंतरबाह्य भिजवून टाकतो. त्यामुळेच हिंदी चित्रपटसृष्टीने पावसाला समानार्थी शब्द म्हणूनच सावन हा शब्द वापरलेला आहे. त्याचप्रमाणे पाऊस, प्रेम आणि सावन अर्थात श्रावणाचा संबंध जोडलेला आहे.
गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित शक्ती सामंता यांनी काढलेला एक सुपरहिट चित्रपट म्हणजे मेहबुबा. १९७६ साली सुपरस्टारपदाला ओहोटी लागत असताना, राजेश खन्नाच्या नावावर जमा झालेला हा अखेरचा चित्रपट म्हणावा लागेल, कारण यानंतर सुपरस्टारपद हे अमिताभ बच्चनकडे गेले होते. या मेहबुबा चित्रपटात ड्रीम गर्ल हेमा मालिनी आणि राजेश खन्ना यांचे किशोर कुमार यांनी गायलेले गीत म्हणजे, ‘मेरे नयना.. सावन भादो.. फिर भी मेरा मन प्यासा..’ हे प्रेमगीत असले तरी विरहगीत आहे. यात प्रेमाची झालेली ताटातूट आहे. पुनर्जन्मावर आधारित असलेल्या या चित्रपटात गायलेले हे गीत किशोरकुमार यांच्या उत्कृष्ठ गीतांपैकी एक आहे. यात आर. डी. बर्मन अर्थात पंचमदा यांच्या संगीताची कमाल असलेला हा चित्रपट असला तरी यातील हे गीत सर्वाधिक लोकप्रिय झाले.
प्रेमात ताटातूट आहे, भडकपणा आहे तसाच हलकाफुलकेपणा पण असतो. तसा हलकाफुलका प्रेमाचा वर्षाव करण्याची संधी अमिताभ बच्चन आणि मौसमी चटर्जी यांना आली ती मंझील चित्रपटातून. बासू चटर्जीच्या या चित्रपटालाही आर. डी. बर्मन यांचेच संगीत आहे. कवी योगेश यांचे ‘रिमझिम गिरे सावन’ हे लता आणि किशोर कुमार यांचे गीत अफलातून गीत आहे. तडफडणा-या प्रेमाची सुलभ अनुभूती आणि प्रियकराने प्रियतमेकडे पाठवण्याचा संदेश देणारे हे एक सर्वागसुंदर गीत. यात पावसाला समानअर्थी शब्द म्हणून सावन म्हटले आहे. सावन हा प्रेमाचा शब्द आहे, पण हे प्रेमही सावनप्रमाणे रिमझिम पडते आहे. अतिशय सुंदर शब्दरचना, सुंदर संगीत, लता आणि किशोर कुमार यांचा जीव ओतून म्हटलेला आवाज आणि पडद्यावर अभिनय करणारा अमिताभ बच्चन. तोही अँग्री यंग मॅन नाही, तर लव्हेरिया झालेला. अशावेळी सावन धावून येतो.
ऋषिकेश मुखर्जी यांचा १९७९ च्या सुमारास आलेला जुर्माना हा चित्रपटही सावन घेऊन येतो. सुपरस्टारपदावर स्थिरावत असलेल्या अमिताभ बच्चनला साथ देण्यासाठी सावन की साद देण्यासाठी इथे आहे राखी. आनंद बक्षी यांच्या सावनगीताला इथेही जबरदस्त संगीत दिले आहे ते आर. डी. बर्मन यांनी. यात ‘सावन के झुले पडे है’ हे गीत आनंदी आणि विरह अशा दोन्ही भावनांमध्ये लता मंगेशकर यांनी गायले आहे. लता मंगेशकरांचे विरहगीत ऐकायचे म्हणजे पोटात गोळाच येतो आणि ते सावन के झुले पोटात हेलकावे खाऊ लागतात. पण, इथेही प्रेमासाठी सावन धावून आलेला आहे.
ताराचंद बडजात्यांचे राजश्री प्रॉडक्शनचे चित्रपट म्हणजे लो बजेट पण, संगीतप्रधान चित्रपट. नवे चेहरे आणि चांगल्या गायक संगीतकारांची भट्टी जमली की, गाण्यांवर चित्रपट हिट करायचा आणि नवा चेहरा लोकांना द्यायचा हे तंत्र. यात अगदी सचिनपासून अरुण गोविल यांच्यापर्यंत अनेकांना नायक बनवणारा हा निर्माता. त्यांच्या संगीतप्रधान चित्रपटांपैकी एक गाजलेला १९७९चा चित्रपट म्हणजे ‘सावन को आने दो’. अरुण गोविल हा राम म्हणून ओळखला जाण्यापूर्वी ज्या सभ्य भूमिका करायचा त्यापैकी एक चित्रपट. यात त्याची नायिका झरिना वहाब आहे. राजकमल यांचे संगीत या चित्रपटाला आहे. यातील जसपाल सिंग यांचे सावन को आने दो हे गीत तुफान लोकप्रिय झाले होते. या प्रेमगीतातील हळुवारपणा प्रेक्षकांना भावला आणि या चित्रपटाला डोक्यावर घेतले. पण, सावन म्हणजे पाऊस, सावन म्हणजेच मान्सून, सावन का महिना म्हणजेच प्रेमाचा महिमा हा संदेश बॉलिवूडने देताना उत्तमोत्तम गीते दिलेली आहेत.
काळ बदलत गेला, तशी त्याची लय आणि चव बदलत गेली. हळुवार प्रेमाची जागा कामुक गीतांनी घेतली. त्यामुळे आमचा सावन कधी कामुक झाला हेही समजले नाही. असेच एक गीत अजय देवगण आणि काजोलचे. हलचल या चित्रपटातील. ‘सावन का महिना, शादी बिना मुश्किल है जीना’ हे गीतही गाजले. पण, ते प्रेमगीताऐवजी कामगीत म्हणून गाजले. प्रणयक्रीडेसाठी व्याकूळ झालेल्या नर मादीची भूकच या गाण्यातून स्पष्ट होते. त्यामुळे या गीतासाठी आवाजही तसेच वेगळय़ा गायकांचे आहेत. विनोद राठोड आणि आलिशा चिनॉय यांच्या या भडक पण लोकगीताप्रमाणे भासवलेल्या गीताचे संगीतकार आहेत, सुरींदर सोधी. चित्रपटात मर्यादित प्रेमापुरता श्रावण किंवा सावन ठीक वाटतो, पण तो जेव्हा कामुक होतो, तेव्हा श्वान हंगामाप्रमाणे सावन भादो हे महिने माणसे आणि श्वानांसाठी आहेत काय, असा संशय निर्माण केला जातो. त्यामुळे हळुवार प्रेमाचा सावन भावतो तितका कामुक नाकारला जातो.