साधारण सतरा वर्षापूर्वी भांडुप पूर्वेला हायवेजवळच्या तलावातलं पाणी अचानक चमकू लागलं. तेव्हा मोबाइल फोन नव्हते, तरी ही खबर वा-यासारखी पसरली.
साधारण सतरा वर्षापूर्वी भांडुप पूर्वेला हायवेजवळच्या तलावातलं पाणी अचानक चमकू लागलं. तेव्हा मोबाइल फोन नव्हते, तरी ही खबर वा-यासारखी पसरली. लांबून लांबून लोक या चमकत्या पाण्याचा चमत्कार बघायला रात्री तलावाच्या काठी येऊन थडकू लागले. दगड घेऊन पाण्यात टाकला की, जिथे दगड पडायचा तेवढं पाणी हिरव्या-निळ्या फ्लुरोसण्ट रंगाने उजळून निघायचं. डोळ्यांना तो रंग सुखावून जायचा. पाणी चमकतंय म्हणून लोकांनी उठून मिळेल तो दगड तलावात टाकायला सुरुवात केली.
कसाबसा हजार चौरस मीटरचा तो तलाव लोकांच्या इच्छाही पूर्ण करू लागला. कुणी चकत्यांसारखे दगड आडवे फेकून रंगांची आडवी तुडतुडी धाव बघू लागले. बघता बघता आसपासचे सगळे दगड संपले. मग लोक येताना दगड घेऊन येऊ लागले. या चमत्काराच्या कथा दूर दूर पसरू लागल्या. साधारण दहा दिवसांनी मात्र पाणी चमकते रंग दाखवेनासं झालं. मग ही दगडफेक थांबली. त्यानंतर मग माध्यमांमधून या चमत्काराची वैज्ञानिक मीमांसा छापून येऊ लागली.
पाण्यातील कुठल्यातरी सूक्ष्म जीवाणूंमुळे ही अशी रंगांची उधळण होते हे सत्य पुढे आलं. पण मग कुणीतरी सांगितलं की, असे सूक्ष्म जीवाणू केवळ समुद्रातील पाण्यात असतात. गोडया पाण्याच्या तलावात असं काही घडत नाही. मग त्यावर पुन्हा असं एक सत्य पुढे आलं की भांडुपमधील तलाव हे खा-या पाण्याचेच आहेत.
या प्रकारच्या जीवाणूंना बायोल्युमिनेसेण्ट फायटोप्लँक्टन किंवा फॉस्फेरेसेन्स बॅक्टेरिया असंही म्हणतात. दरम्यानच्या काळात या खा-या पाण्यातील सूक्ष्म जीवाणूंवर खूप सारं संशोधन झालं. पाण्यातल्या या जीवाणूंची ही रंगपंचमी साजरी होण्यासाठी काही विशिष्ट परिस्थिती उद्भवावी लागते. तर ही रंगांची उधळण उसळते. थॉमस डिकोर्से या शिकागोतल्या रश विद्यापीठातील संशोधकाने यासंदर्भात असे स्पष्टीकरण दिले आहे की, ‘हे सगळं उद्भवतं समुद्रातील सूक्ष्म डायनोफ्लॅगलेट्समुळे.
हे डायनोफ्लॅगलेट्स तरंगू लागले की, त्यातून आसपासच्या पाण्यावर विद्युत तरंग पाठवले जातात. सूक्ष्म जीवाणूंच्या प्रोटॉनयुक्त केंद्रामध्ये हे तरंग शिरतात आणि विद्युत संवेदनशील प्रोटॉन चॅनेल उघडली जातात. त्यातून एक रासायनिक प्रतिसादाचीची मालिका तयार होते. त्यातून ल्युसिफेरास नावाचे प्रोटिन कार्यरत होते आणि न्यूऑन साइनप्रमाणे प्रकाश बाहेर पडतो. पाण्यात खळबळ निर्माण झाली की, ही प्रक्रिया अधिक वेगवान होते. त्यामुळेच दगड टाकला की तसेच किना-याजवळच्या लाटांवर ही जीवाणूंची रंगपंचमी अधिक प्रमाणात खेळली जाते.