भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी २२ जून रोजी महापालिका आरोग्य सेवा आणि आकारण्यात येणा-या करप्रणालीच्या वैधतेबाबत भाजपाच्या वतीने स्वतंत्र श्वेतपत्रिका काढली जाईल, असे जाहीर केले होते.
मुंबई- महापालिकेच्या वतीने राबवण्यात येणा-या आरोग्य यंत्रणेबाबत समाधान व्यक्त करावे अशी परिस्थिती नाही, असे यांनी सांगत भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार यांनी २२ जून रोजी महापालिका आरोग्य सेवा आणि आकारण्यात येणा-या करप्रणालीच्या वैधतेबाबत भाजपाच्या वतीने स्वतंत्र श्वेतपत्रिका काढली जाईल, असे जाहीर केले होते.
यावर एक महिन्यात अभ्यास करून या श्वेतपत्रिका सादर करण्याची वल्गना करणा-या भाजपाच्या श्वेतपत्रिकांचा दोन महिने उलटत आले तरी पत्ता नाही. त्यामुळे भाजपाच्या श्वेतपत्रिका गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई महापालिकेतील सुधार समिती सभागृह आणि अध्यक्षांच्या दालनाचे उद्घाटन २२ जून २०१५ रोजी भाजपाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशीष शेलार आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते पार पडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य सेवेची श्वेतपत्रिका काढण्यात येईल, असे जाहीर केले होते.
प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये, दवाखाने, आरोग्य केंद्रं आदींमधील डॉक्टरांची रिक्त पदे, निष्णांत डॉक्टरांची सेवा, औषधांचा पुरवठा, आरोग्यासाठी आरक्षण असलेला भूखंड, आरक्षण समायोजनांतर्गत प्राप्त झालेल्या इमारती आणि आरोग्य यंत्रणांतील त्रुटी यासंदर्भात ही श्वेतपत्रिका असेल.
भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समिती अध्यक्ष सुनीता यादव, राम बारोट, विनोद शेलार, राजेश्री शिरवाडकर आणि अश्विन व्यास आदींची एक समिती बनवण्यात आली आहे. ही समिती एक महिन्यात याचा अभ्यास करून श्वेतपत्रिका तयार करील. ती श्वेतपत्रिका महापालिका आयुक्तांना सादर करून अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या जातील, असे अॅड. शेलार यांनी सांगितले होते.
याबरोबरच मालमत्ता करप्रणालीमध्ये आकारण्यात आलेल्या करामुळे मुंबईकरांचे एक हजार कोटी रुपये अधिक घेण्यात आले. हे पैसे त्यांना देण्यात यावेत, अशी मागणी करत हे परत केले पाहिजेत. तसेच ज्या ४९ टक्के जनतेला मलवाहिनीची सेवा पुरवली जात नाही, अशा लोकांना पाण्याच्या बिलातून आकारण्यात येणारा मलनिस्सारण कर आकारू नये.
याबरोबरच मालमत्ता कराच्या बिलातून आकारण्यात येणारा अन्य कर मुंबईकरांच्या खिशातून घेतला जातो. याची वैधता समजून घेऊन त्याबाबतही श्वेतपत्रिका काढली जाईल. यासाठी कोटक यांच्या अध्यक्षतेखाली मोहन मिठबावकर, ज्ञानमूर्ती शर्मा, महेश पारकर, जोत्स्ना मेहता यांची समिती बनवण्यात आली. ही समितीही एक महिन्यात आपला अहवाल देईल.
दोन्हींबाबत र्सवकष भूमिका भाजपाची राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु जून महिन्यात ही घोषणा केल्यानंतर २२ जुलैला एक महिना पूर्ण होऊन आता २२ ऑगस्टला दोन महिने पूर्ण होत आहेत. परंतु अद्याप भाजपाच्या श्वेतपत्रिकांचा पत्ता नसून प्रशासनाकडे श्वेतपत्रिकांची मागणी करणा-या भाजपाला दिलेल्या वेळेत श्वेतपत्रिका काढता आलेली नाही.
स्मार्ट सिटीबाबत तसेच अन्य प्रश्नांसंबंधी अॅड. शेलार यांनी आयुक्तांची चार दिवसांपूूर्वी भेट घेतली, पण याच महापालिकेत येऊन आपण श्वेतपत्रिकेची घोषणा केली होती, हेही ते विसरून गेल्याचे दिसून येते.