शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची झोप उडाली आहे.
मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंतप्रधानपदासाठी भाजपमध्ये सुषमा स्वराज या एकमेव लायक उमेदवार असल्याचे मत व्यक्त केल्यामुळे राष्ट्रपतीपदाप्रमाणेच पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरूनही भाजप आणि शिवसेना यांच्यात आलबेल नसल्याची बाब उघड झाली आहे. ठाकरे यांनी टाकलेल्या या गुगलीमुळे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची झोप उडाली आहे.
या सर्वच नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पंतप्रधानपदासाठी इच्छुक असल्याचे संकेत दिले आहेत. मात्र, बाळासाहेबांनी सुषमा स्वराज यांना पाठिंबा देत नव्या वादाला तोंड फोडले आहे. गेल्या चार महिन्यांत दोन वेळा मुंबई भेटीवर आले असताना आवर्जून ‘मातोश्री’वारी करणा-या स्वराज यांच्या हेतूविषयी आता भाजपमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.