जीवघेण्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना केवळ तकलादू निर्णय घेऊन समाधान मानणा-या मध्य रेल्वेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे.
मुंबई – जीवघेण्या गर्दीमुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असताना केवळ तकलादू निर्णय घेऊन समाधान मानणा-या मध्य रेल्वेचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी तीन एक्स्प्रेसमधून लोकल प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय घेतल्यानंतरही जाचक अटींमुळे प्रवाशांनी या सेवेकडे दुर्लक्ष केले आहे.
त्यामुळे गाजावाजा करीत ही योजना सुरू केल्यानंतर फेब्रुवारी महिन्यापर्यंत छापण्यात आलेल्या ९०० बुकलेटपैकी फक्त आठ बुकलेटच विक्रीला गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडून जाहीर करण्यात येणा-या योजना कुचकामी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
सकाळी गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेवरील धोकादायक प्रवासामुळे होणा-या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मेल एक्स्प्रेसमधून महिला प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा दिली. त्यानुसार सकाळच्या वेळेस सीएसटीच्या दिशेने जाणा-या तीन एक्स्प्रेसमधून लोकल प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २६ जानेवारी २०१६पासून महालक्ष्मी एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेस आणि लातूर एक्स्प्रेसमधून प्रवासाची मुभा देत या सेवेला सुरुवात करण्यात आली. मात्र, याकरता पास असतानाही विशेष कुपन्स प्रवाशांना खरेदी करावे लागतात. याशिवाय असलेल्या जाचक अटींमुळे मेल एक्स्प्रेसचा प्रवास प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे.
ठाणे आणि कल्याण स्थानकातून या तीन एक्स्प्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना प्रवासाची मुभा दिली. त्याकरिता एकूण दहा आणि २५चे कुपन्स असलेले एक बुकलेट अशा प्रकारे जानेवारीत ४५० आणि फेब्रुवारीत ४५० बुकलेट छापण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यात ठाणे आणि कल्याणसाठी प्रत्येकी २२५ बुकलेटचे वाटप करण्यात आले. मात्र ही सेवा सुरू झाल्यापासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत एकूण ९०० बुकलेटपैकी अवघ्या आठ बुकलेटची विक्री झाल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. फेब्रुवारीत फक्त दोनच बुकलेटची विक्री झाली आहे. त्यामुळे रेल्वेला नुकसानीलाच सामोरे जावे लागत आहे.