मध्य रेल्वेच्या भायखळा, ठाणे आणि कळवा येथील १८ वसाहतींमधील २१६ सदनिका धोकादायक असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे.
मुंबई- मध्य रेल्वेच्या भायखळा, ठाणे आणि कळवा येथील १८ वसाहतींमधील २१६ सदनिका धोकादायक असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात समोर आली आहे. या घरांमध्ये १७५ कुटुंब राहत असून, त्यांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. मात्र, असे असले तरी या इमारती धोकादायक नसल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते समीर झवेरी यांनी माहितीच्या अधिकारात मध्य रेल्वेच्या वसाहतींची माहिती मागितली होती. त्यात त्यांनी किती इमारती आणि त्यातील किती सदनिका धोकादायक आहेत, याची विचारणा केली होती. त्यानुसार भायखळा, ठाणे आणि कळवा येथील एकूण १८ इमारतींमधील २१६ सदनिका धोकादायक असल्याचे उघड झाले आहे. या सदनिकांची पडझड झाली असून, त्यात राहणा-या १७५ कुटुंबांना आपला जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. यापैकी ४१ सदनिका रिकाम्या करण्यात आल्या आहेत. ही बाब मध्य रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाने या इमारती धोकादायक नसल्याचा दावा केला आहे.
या इमारती चांगल्या स्थितीत असून, त्या लगेच पडतील अशीही स्थिती नसल्याचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले. मात्र, ज्यांना पर्यायी जागा हव्या आहेत, त्यांना त्या दिल्या जात आहेत. शिवाय तेथे राहणारे कर्मचारीही सध्याची घरे सोडण्यास तयार नाहीत. तसेच जुईनगर, ठाणे या भागांत रेल्वे कर्मचा-यांसाठी नव्या इमारतींचे काम सुरू आहे. त्या तयार झाल्यानंतर ब-याच कर्मचा-यांना तेथे स्थलांतरित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.