गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणा-या मनसेला या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
मुंबई- गेल्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करणा-या मनसेला या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या मनसेचे १३ आमदार पराभूत झाले आहेत. या निवडणुकीत शरद सोनावणे हे एकमेव उमेदवार जुन्नरमधून निवडून आले आहे. राज्यातील मतदारांनीच राज ठाकरेंच्या इंजिनला कारशेडचा रस्ता दाखवला आहे. मात्र, यावेळी मतांची टक्केवारी ९ टक्क्यांनी घसरल्याने इंजिन हे पक्षाचे निवडणूक चिन्ह आता रद्द होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी मार्च २००६ मध्ये मनसेनेची स्थापना केल्यानंतर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत १३ आमदार निवडून आले होते. या निवडणुकीत मुंबईबरोबरच,नाशिक,पुण्यात पक्षाचा सफाया झाला. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे, नाशिकमधील वसंत गिते यांच्यासह सर्वच विद्यमान आमदारांचा पराभव झाला. जुन्नरमधून मनसेचे उमेदवार शरद सोनावणे हे ६० हजार ३०० मते मिळवून विजयी झाले. मनसेचे पूर्वीचे आमदार राम कदम आणि हर्षवर्धन पाटील हे भाजप आणि शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत.
मनसेला केवळ ३ टक्केच मतदान
या निवडणुकीत मनसेला यावेळी फारच कमी मतदान झाले. गेल्या विधानसभा निवडणुकीत ११.८८ टक्के अर्थात २५ लाख ८५हजार ५९७ मते घेणा-या मनसेला यंदा केवळ ३.१ टक्के अर्थात १६ लाख ६४ हजार ९१६ मते मिळवता आली. प्रत्यक्ष झालेल्या मतदानाच्या एक तृतीयांश मतदान न झाल्यास निवडणूक चिन्ह रद्द केले जाते. त्यामुळे मनसेचे इंजिन चिन्हही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या अधिका-यांनी सध्या यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
कल्याण-डोंबिवलीत मनसेचे इंजिन फेल!
कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या दोन विद्यमान आमदारांचा दणकून पराभव झाला असून त्यांना अनामत रक्कमही वाचवता आलेली नाही. कल्याण, डोंबिवलीत भाजपने दोन जागांवर तर शिवसेना व अपक्षाने प्रत्येकी एका जागावर विजय मिळवला आहे.
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी भाजपचा गड राखला आहे. चव्हाण ४४ हजार मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना ८३ हजार ८४४ तर शिवसेनेच्या दीपेश म्हात्रे यांना ३७६२४ मते मिळाली. मनसेच्या हरिश्चंद्र पाटील यांना ११हजार ९७० मतांवर समाधान मानावे लागल्याने त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. मनसेचे नगरसेवक असलेल्या प्रभागात पाटील यांना अवघी ३०० ते ४०० मते मिळाली आहेत.
कल्याण पश्चिमेत भाजपच्या नरेंद्र पवार यांना ४७ हजार २३८ तर मनसेचे विद्यमान आमदार प्रकाश भोईर यांना अवघी १६ हजार ९७७ मते मिळाली. मनसे तिस-या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेचे विजय साळवी यांना ४३ हजार ६०४ तर मनसेला सपाटून मार खावा लागला आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये शिवसेनेचे सुभाष भोईर यांना ८४ हजार ७४ तर मनसेचे आमदार रमेश पाटील यांना ३९ हजार ८८८ मते मिळवत शिवसेनेने मनसेकडील जागा हिसकावून घेतली आहे. लोकसभा निवडणुकीतही रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. कल्याण पूर्वेतून अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांनी आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले. गायकवाड यांना ३६ हजार ३०२ मते मिळाली. शिवसेनेच्या गोपाळा लांडगे यांना ३५ हजार ५६१ मते मिळाली.
मनसेच्या पराभवात चुकीचा ‘संदेश’
कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेचे २८ नगरसेवक आहेत. मनसेचे काही नगरसेवक सोडले तर काहींचा परफॉर्मन्स शून्य आहे. मनसेत अंतर्गत गटबाजी मोठी आहे. याच गटबाजीचा‘संदेश’ मनसैनिकांत सर्वदूर पसरला आहे. मनसे जिल्हाध्यक्ष काहींना जवळ करत असल्याने निष्ठावंत मनसैनिक दुरावले आहेत. हाच ‘संदेश’ मनसैनिकांना दूर ठेवत आहे. चुकीच्या ‘संदेशा’मुळेच लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीत मनसेचा दणकून पराभव झाल्याची चर्चा मनसैनिकांत आहे. पक्षातील ही गटबाजी रोखण्यासाठी व मनसैनिकांतील चुकीचा ‘संदेश’ दूर करण्यासाठी राज ठाकरे येतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.