कैलाश खेरने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षात त्याच्या आवाजाचा कस लोकांनी अनुभवलेला आहे. आता कैलाश खेरचा आवाज कलर्स वाहिनीवरच्या ‘उडान’ या मालिकेच्या शीर्षकगीताच्या रुपाने भारतातल्या घराघरात पोहोचणार आहे.
कैलाश खेरने आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. गेल्या काही वर्षात त्याच्या आवाजाचा कस लोकांनी अनुभवलेला आहे. आता कैलाश खेरचा आवाज कलर्स वाहिनीवरच्या ‘उडान’ या मालिकेच्या शीर्षकगीताच्या रुपाने भारतातल्या घराघरात पोहोचणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत गाऊन त्याने आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचाही प्रयत्न केलेला दिसून येत आहे. ही मालिका खास मुलींसाठी, त्यांच्या जीवनाविषयी, त्यांच्या समाजातल्या स्थानाविषयी भाष्य करणारी आहे. ही कथा एका सात वर्षाच्या मुलीच्या जीवनाची आहे. आपल्या जीवनातील प्रतिकुलतेवर मात करून ती जी झेप घेते त्याचे कथानक या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेची संकल्पना गीतातून प्रेक्षकांपर्यत पोहोचावी म्हणूनच या शीर्षकगीताचे गायन कैलाश खेर यांच्याकडून करून घेतल्याचे कलर्स वाहिनीचे मुख्य कार्यक्रम अधिकारी सांगतात. या शीर्षकगीतात त्यांना साथ दिली आहे ती महालक्ष्मी अय्यर हिने. या दोघांच्या आवाजातली खोली या मालिकेची संवेदना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. कोणत्याही मालिकेच्या यशात त्या मालिकेच्या शीर्षकगीताचा मोठा वाटा असतो. कैलाश खेरचा आवाज या मालिकेलाही एक वेगळे महत्त्व मिळवून देईल असा विश्वास आता व्यक्त होत आहे. ही मालिका दर रोज रात्री साडे आठ वाजता पाहता येणार आहे.
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभमुहूर्तावर प्रसिद्ध गायिका अपर्णा बिवलकर यांच्या ‘कृष्ण कन्हैया’ या पहिल्या अल्बमचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या अल्बममधील गीते श्रीकृष्ण सावंत यांनी लिहिली असून संगीतही त्यांनीच दिले आहे. या गीतांचे संगीतसंयोजन प्रथितयश संगीतसंयोजक अप्पा वढावकर यांनी केले आहे. अल्ट्रा-कृणाल म्युझिक कंपनीचे डायरेक्टर जयेश वीरा यांनी या सीडीचे वितरण केले आहे. या सोहळ्याला ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव, संगीत संयोजक अप्पा वढावकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री नेहा जोशी व दीप्ती भागवत, अल्ट्रा-कृणाल म्युझिकचे बद्रिक वीरा, गीतकार व संगीतकार श्रीकृष्ण सावंत, गायिका अपर्णा बिवलकर, निर्माते शेखर बिवलकर तसेच संगीतक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित काकडे यांनी केले. याप्रसंगी तपस्या कला फाऊंडेशनच्या कलाकारांनी यातील काही गाण्यांवर नृत्याविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
मराठी चित्रपटात हिंदी गायक
मराठी चित्रपटांमध्ये हिंदी निर्माते आताशा मोठय़ा संख्येने येत आहेत. त्या पाठोपाठ हिंदी चित्रपटात गाजलेल्या अनेक गोष्टीही हळूच मराठी चित्रपटात येत आहेत. मात्र मराठी गाण्यांसाठी हिंदी चित्रपटसृष्टीतल्या गायक गायिकांचा आवाज वापरण्याचीही एक नवी पद्धत आता रुढ होऊ लागलेली दिसतेय. अनेक मराठी चित्रपटांमध्ये हिंदी गायकांचे एखादे गाणे असायला हवे असा निर्मात्यांचाही समज व दिग्दर्शकांची गरज झाली आहे. आपल्या चित्रपटाचा बाज व त्याचा दर्जा वाढवण्यासाठी मराठी चित्रपटातल्या सर्वच गाण्यांसाठी हिंदी गायकांचे आवाज वापरण्याचा एक प्रयोग नुकताच निर्माते सागर पंडित व रजनी पंडित यांनी केला आहे. त्यांच्या आगामी ‘आशियाना’ या चित्रपटातल्या चार गाण्यांसाठी त्यांनी हिंदीतल्या चार आघाडीच्या गायकांचा आवाज घेतला आहे. या चित्रपटाची कथा व त्यातून येणा-या प्रसंगांसाठी आम्हाला विशेष आवाजांची आवश्यकता होती. त्यामुळे बजेटचा वगैरे विचार न करता आम्ही हा निर्णय घेतल्याचे ते सागर व रजनी पंडित म्हणतात. या चित्रपटात लेडिज बार बंद झाल्यानंतर त्या बारमध्ये काम करणा-या तीन मुलींच्या जीवनात काय घडतं ही कथा दाखवली असून, समाजात मानाने जगण्यासाठी त्या काय काय कष्ट करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजित देवळे यांनी केले असून चित्रपटात ममता शर्मा या गायिकेने एक गीत गायले आहे. ‘मुन्नी बदनाम हुई..’ व ‘चिपकालो सैंया फेविकोलसे..’ यासारख्या गाण्यांनी ती सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. या चित्रपटाचे संगीत प्रभाकर नरवडे यांनी दिले आहे. या चित्रपटातली इतर गाणी ही शंकर महादेवन, श्रेया घोषाल, कविता कृष्णमुर्ती यांनी गायलेली आहेत.
आता संस्कारी जावईही !
लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तींचंच नव्हे तर दोन कुटुंबांचं मिलन असं आपण नेहमी म्हणतो. आजच्या काळात ही उक्ती काहीशी कालबाह्य झाली असली तरी त्याचं महत्त्व आजही अबाधित आहे. आतापर्यंत लग्नानंतर सासरी जाणा-या मुलीच्या कर्तव्याविषयी नेहमीच अनेक गोष्टी सांगितल्या जातात. या सुनेवर अनेक जबाबदा-या असतात. मात्र या जबाबदा-या पार पाडत असतानाच जावयाला मात्र सर्वच जबाबदा-यांपासून दूर ठेवले जाते. जावई म्हणजे ज्याने सासरकडून केवळ मान मिळवायचा असंच एक समीकरण गेले कित्येक वर्ष सुरू आहे. आताच्या काळात मात्र जावयांवरही आपल्या सासरची काही जबाबदारी यावी असा विचार पुढे येत आहे. याच संकल्पनेभोवती फिरणारी नवी मालिका लवकरच झी वाहिनीवर सुरू होत आहे. ‘जमाईराजा’ या मालिकेत आपल्या सासरची सर्व जबाबदारी घेणारा एक जावई पाहायला मिळणार असून त्यात आपली पत्नी व सासुमधील गैरसमजही दूर करण्याचं काम तो करणार आहे. या मालिकेची निर्मिती अश्विनी यार्दी यांनी केली असून आपण एक नवा ट्रेंड आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. या मालिकेत नायकाच्या भूमिकेत रवि दुबे हा असून त्याच्या पत्नीच्या भूमिकेत निया शर्मा ही चमकणार आहे. ही मालिका खास दक्षिण मुंबईतल्या एका उच्चभ्रु वसाहतीत घडताना दाखवली असून या ठिकाणी बदललेल्या नात्यांच्या जाणीवा व भारतीय संस्कृती यातला मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून हिंदी मालिका एका वेगळ्या वळणावर जातील व अधिक र्सवकषपणे नात्यांचा वेध घेतील अशी अपेक्षा या मालिकेच्या संबंधित कलाकारांनी व्यक्त केली आहे. या मालिकेत सासूची भूमिका अंचित कौर ही करणार आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर एक मोठी फॅशन डिझायनर झालेल्या या सासूसाठी पैसाच सगळं काही आहे. तिचा जावई तिचा हा गैरसमज दूर कसा करतो हे पाहणं खरोखरचं औत्सुक्याचं ठरेल. येत्या सोमवार पासून ही मालिका दररोज रात्री साडेआठ वाजता पाहता येणार आहे.