सध्या टीव्हीवर एका पाठोपाठ एक मोठया मालिका येण्याचे दिवस आहेत. खास करुन हिंदी वाहिन्यांवर तर ते प्रकर्षानं दिसून येत आहे. झी वाहिनीने ‘बंधन’ ही हत्ती व एक छोटी मुलगी यांच्यातील मैत्रीवर आधारित मालिका आणली आहे.
सध्या टीव्हीवर एका पाठोपाठ एक मोठया मालिका येण्याचे दिवस आहेत. खास करुन हिंदी वाहिन्यांवर तर ते प्रकर्षानं दिसून येत आहे. झी वाहिनीने ‘बंधन’ ही हत्ती व एक छोटी मुलगी यांच्यातील मैत्रीवर आधारित मालिका आणली आहे. दुसरीकडे कलर्सवर बिग बॉसचा बिगुल वाजला आहे. आता त्यात स्टार प्लसही उतरणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतला बिग बॉस आशुतोष गोवारीकर याची निर्मिती व कथा कल्पना असलेली ‘एव्हरेस्ट’ ही मालिका लवकरच स्टार प्लसवर रुजू होत आहे. या मालिकेत आपल्या वडिलांचं एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न साकारण्यासाठी धडपडणा-या एका मुलीची कथा असून तिच्या एव्हरेस्ट मोहिमेत टीव्हीच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही सामील करुन घेतलं जाणार आहे.
या मालिकेची घोषणाही अभिनव पद्धतीनं नुकतीच करण्यात आली. नेहमी मालिकेच्या घोषणेला कलाकारांना पाचारण केलं जातं. आशुतोषनं मात्र या मालिकेच्या पहिल्याच पत्रकार परिषदेसाठी चक्क या मालिकेच्या तंत्रज्ञांनाच समोर आणलं. ही मालिका करतांना या तंत्रज्ञांचंही योगदान महत्त्वाचं असल्याचं आशुतोष यावेळी म्हणाला. मी टीव्ही माध्यमापासूनच माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली असली तरी मध्यंतरीच्या काळात माझ्या व्यस्ततेमुळे मला छोटया पडद्यासाठी काही करता आलं नव्हतं. आता मात्र माझ्या मनासारखा विषय मला मिळालेला आहे. या मालिकेची कथाच ही या मालिकेच्या प्रमुख आर्कषणाचा भाग असून या निमित्तानं टीव्हीच्या छोटया पडद्यावरही काही तरी भव्यदिव्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या मालिकेसाठी आशुतोषच्या चमुने प्रचंड मेहनत केल्याचं दिसून येत आहे. त्यांनी एव्हरेस्टच्या बेस कँपवर उणे सहा अंश तापमानात चित्रीकरण केलं. त्यासाठी खास पर्वतारोहणाचं प्रशिक्षण घेतलं. या मालिकेची पहिली झलक पाहिल्यानंतर अशा प्रकारची मालिका आतापर्यंत भारतीय टीव्ही आली नव्हती याची मात्र साक्ष पटते. ही मालिका भारतीय टीव्हीच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात करेल एवढं मात्र आता नक्की वाटत आहे.
काही काही कार्यक्रमांची चांगलीच हवा तयार होत असते. गेले सात सीझन्स यशस्वी ठरलेल्या बिग बॉसचीही हवा नेहमीच नव्या सीझनपूर्वी होत असतेच. ती अधिक व्हावी या हेतूनं कलर्स वाहिनीने या आठव्या सत्राविषयी जबरदस्त उत्सुकता निर्माण केली आहे. हा नवा सीझनही हवेत चित्रीत झाला आहे की काय अशी शंका येण्यासारखी वातावरण निर्मिती त्यांनी केली आहे. नुकत्याच बिग बॉसच्या आठव्या सीझनच्या तारखेची घोषणा कलर्सतर्फे करण्यात आली. या शोचा खरा बिग बॉस सलमान खानही यावेळी हजर होताच. ही घोषणाही एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी खास जेट एअरवेजच्या हँगरमध्येच पत्रकारांना नेण्यात आलं. एका विमानाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला रंगमंचही यावेळी अतिशय देखणा दिसत होता.
आता सलमान या विमानावरून चालत येणार आहे की काय अशी अनेकांची अपेक्षा होती. सलमानने मात्र ती फोल ठरवत कॉकपिटच्या दारातून रंगमंचावर प्रवेश केला. पायलटच्या वेषात आलेल्या सलमानने मी कधी टीव्हीवर पायलट एपिसोड केला नाही त्यामुळे हे पायलटचे कपडे घातले आहेत. असं सांगून एकच हशा मिळवला. त्याच्या बोलण्याचा रोख हा कदाचित शाहरुखकडे असावा अशी चर्चा त्यानंतर सुरु होती. कलर्सचे कार्यकारी प्रमुख राज नायक यांनीही या कार्यक्रमाच्या तारखेविषयीची माहिती दिली.
या सगळया प्रश्नोत्तरांनंतरही यंदाच्या बिग बॉसचं स्वरुप कसं असणार आहे, त्याच बरोबर यंदाच्या बिग बॉसमध्ये कोणकोण सहभागी होणार आहे याची माहिती तर त्यांनी कुणाला दिली नाहीच. त्याचबरोबर ती कुणाला कळू नये याचीही दक्षता बाळगली. त्यामुळे कार्यक्रम कंटाळवाणा झाला तरी चालेल मात्र माहिती देणार नाही. अशीच त्यांची भूमिका दिसून आली. ही सारी माहिती आम्ही बिग बॉसचा नवा सीझन ज्या दिवशी सुरू होणार आहे त्याच दिवशी म्हणजेच येत्या २१ सप्टेंबरला देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या या कार्यक्रमाची हवा तयार करण्याची त्यांची युक्ती मात्र यशस्वी झालेली पाहायला मिळत आहे. एकीकडे बिग बॉसचे जे प्रोमो सध्या टीव्हीवर दाखवले जात आहेत, त्यात सतत विमान दाखवून यंदाचं बिग बॉस हवेत शूट केलं आहे की परदेशात याची उत्सुकता त्यांनी ताणली आहे. शेवटी यंदाचं बिग बॉस हे एखाद्या अपहरणातल्या घटनेत सापडलेल्या प्रवाशांच्या स्थितीसारखं तर दाखवणार नाहीत ना? अशी शंका घेण्यासही त्यांनी भाग पाडलं आहे. आता या बिग बॉसची पुढची घोषणा होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय आपल्याकडे गत्यंतर नाही हेच खरं !
बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट ‘हॅपी जर्नी’ येत्या नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाची पहिली झलक मुंबईत दाखवण्यात आली. चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया यांच्या एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटने केली असून, सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. प्रख्यात मराठी अभिनेता आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता कलाकार अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. हे दोघं पहिल्यांदाच रूपेरी पडद्यावर एकत्र येत आहेत. या दोघांबरोबरच पल्लवी सुभाष आणि सिद्धार्थ मेनन यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.
‘हॅपी जर्नी’ हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मी मराठी चित्रपटाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचा आणि शहरी चकाकी प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व जगानं या चित्रपटाकडे पाहावं आणि त्याची दखल घ्यावी, असेच प्रयत्न आम्ही केले आहेत. आज प्रत्येक चित्रपटाला विविध प्रकारांमध्ये टाकून त्यांची तुलना केली जाते. या पार्श्वभूमीवर असामान्य आणि काल्पनिक अशा एका वेगळ्या पद्धतीचा मिलाफ यात साधला गेला आहे. असे चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी सांगितले.
विविध क्षेत्रातील अनेक युवक या चित्रपटाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या चित्रपटाला एक फ्रेश लूक मिळाला आहे. अत्याधुनिक असं प्रॉडक्शन डिझाइन, संगीत आणि कपडेपट यांमुळे या चित्रपटाला अनोखा एक लूक प्राप्त झाला, असं एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी सांगितलं.
या चित्रपटातील गीतं करण कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत. शाल्मली खोलगडे हिने ‘हॅपी जर्नी’मधील दोन नवीकोरी गाणी गायली आहेत. ‘पेश’ हे या चित्रपटातील एक पाय थिरकवायला लावणारे गीत असून, ते प्रिया बापटवर चित्रीत करण्यात आले आहे. हे गाणे म्हणजे रॉक, पॉप आणि जॅझ यांचा संगम असून, शाल्मलीने ते आपल्या अनोख्या आवाजाच्या पट्टीने टीपेला नेले आहे. प्रिया बापटवरच चित्रीत करण्यात आलेलं दुसरं गाणं हे एक अंगाईगीत आहे.