मराठी सिनेसृष्टीला कर्णमधूर गीत-संगीताची परंपरा लाभली आहे. केवळ कथेच्या माध्यमातून प्रबोधन न करता त्याला गीत-संगीताची सोनेरी किनार जोडण्याची कला आजवर मराठी दिग्दर्शकांनी जपली आहे.
‘बुगडी माझी सांडली गं’चा संगीत प्रकाशन सोहळा संपन्न
मराठी सिनेसृष्टीला कर्णमधूर गीत-संगीताची परंपरा लाभली आहे. केवळ कथेच्या माध्यमातून प्रबोधन न करता त्याला गीत-संगीताची सोनेरी किनार जोडण्याची कला आजवर मराठी दिग्दर्शकांनी जपली आहे. हाच वारसा जपत ‘बुगडी माझी सांडली गं’ हा आगामी सिनेमा मराठी सिनेसृष्टीच्या सुवर्णयुगाची आठवण करून देण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात तब्बल ९ गीतांचा समावेश करण्यात आला आहे.
‘वॉन रायन्स एंटरटेनमेंट’ची प्रस्तुती आणि ‘तिकीट फिल्म्स’ची निर्मिती असलेल्या निर्माते श्याम सिंघानिया यांच्या ‘बुगडी माझी सांडली गं’ या सिनेमाचा संगीतप्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या प्रसंगी सिनेमाचे निर्माते श्याम सिंघानिया, दिग्दर्शक मानसिंग पवार, पद्म सिंघानिया, अभिनेता कश्यप परूळेकर, अभिनेत्री मानसी मोघे, दीपा चाफेकर, मेघा घाडगे, संगीतकार प्रवीण पुंवर, बब्रू भोसले, सचिन-दीपेश, गीतकार राजेश बामुगडे, संजाली रोडे, गायिका बेला शेंडे, भारती मढवी, गायक जसराज जोशी, झी म्युझिकचे मोहीत पोतदार, कार्यकारी निर्माते विवेक शाह तसेच इतर तंत्रज्ञ आणि सिनेसृष्टीतील मान्यवर मंडळीही उपस्थित होती.
दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून गीतकार बाबा चव्हाण, राजेश बामुगडे आणि संजली रोडे यांच्या साथीने गीतलेखनही केलं आहे. या गीतांना प्रवीण पुंवर, बब्रू भोसले, सचिन-दीपेश या मराठी सिनेसृष्टीत सध्या आघाडीवर असलेल्या तीन संगीतकारांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटातील पाच गीते गायिका बेला शेंडेने गायली आहेत. यापैकी ‘लुटा तुम्ही ऐवज इश्काचा..’, ‘बघून मला झाला पावना येडा..’, ‘हरवली माझी बुगडी..’ आणि ‘मला कळत नाही राजसा..’ या लावण्या मानसिंग पवार यांनी लिहिल्या असून संगीतकार बब्रू भोसले यांनी संगीतबद्ध केल्या आहेत. ‘मला कळत नाही राजसा..’ या लावणीला संगीतकार प्रवीण पुंवर यांनी संगीत दिलं आहे. याखेरीज ‘राया मला तुम्हावीन करमत नाही..’ ही बेला शेंडेने गायक विवेक नाईकसोबत गायलेली लावणी बाबा चव्हाण यांनी लिहिली असून सचिन-दीपेश या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केली आहे. ‘दाजीबा हो माझा दादला..’ हे राजेश बामुगडेंच्या लेखणीतून आकाराला आलेलं आयटम साँग गायिका भारती मढवी यांच्या आवाजात संगीतकार प्रवीण पुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘तुझे नाव आता..’ या संजली रोडे यांनी लिहिलेल्या प्रेमगीताला प्रवीण पुंवर यांनी संगीत दिलं असून ते जसराज जोशी यांनी गायलं आहे. उर्मिला धनगरच्या आवाजातील ‘ओ पावनं जरा दमानं काढा कडी..’ ही गीतकार बाबा चव्हाण यांनी लिहिलेली लावणी सचिन-दीपेश यांनी संगीतबद्ध केली आहे. बाबा चव्हाण यांनीच लिहिलेल्या ‘बाई गं आनंदाच्या खानी..’ या लग्नगीताला सचिन-दीपेश यांनी भारती मढवी आणि संचिता मोरजकर यांच्या आवाजात संगीतसाज चढवला आहे.
मिस युनिव्हर्स २०१३ या सौंदर्यस्पध्रेत भारताचं प्रतिनिधित्व करीत अंतिम सात स्पर्धकांमध्ये पोहोचलेली मानसी मोघे ‘बुगडी माझी सांडली गं’ सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे. या सिनेमात मानसी मोघे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमातील सर्व लावण्या मानसीवर चित्रित करण्यात आल्या असून आयटम साँगच्या ठेक्यावर नृत्यांगना मेघा घाडगेने ताल धरला आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचं दर्शन घडवत रसिकांना पुन्हा एकदा लावणीच्या सुवर्णयुगात घेऊन जाणा-या या सिनेमात मानसी मोघे, कश्यप परुळेकर, मोहन जोशी, दीपा चाफेकर, रमेश भाटकर, इला भाटे आदी कलाकार आहेत. ‘बुगडी माझी सांडली गं’ हा चित्रपट एक संगीतमय प्रेमकथा असून दिग्दर्शनासोबत याची कथा-पटकथा-संवादही मानसिंग पवार यांनीच लिहिले आहेत. राजा फडतरे या सिनेमाचे कॅमेरामन असून नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे. विवेक शाह कार्यकारी निर्माते असून पवन अहिवळे सहाय्यक दिग्दर्शक आहेत. दीपा चाफेकर ड्रेस डिझाईनर आहेत, तर अनिरुद्ध दुभाषी आणि वैभव रणसिंग यांनी प्रॉडक्शनची बाजू सांभाळली आहे.
उत्कट प्रेमाचा आविष्कार ‘चंद्रकोर’
‘प्रेम’ या एका शब्दातच संपूर्ण जग सामावून गेलेलं आहे. प्रेमकथा वाचणे, पाहणे आणि ऐकणे ही मानवी स्वभावाची आवड आहे. प्रेमकथेवर आधारित असाच एक नवाकोरा सिनेमा आपल्या भेटीला येत आहे. चितशक्ती पिक्चर्सच्या मीना खंडाळे, राजेश विठ्लानी यांची पहिलीच निर्मिती असलेला आणि अशोक विठ्लानी यांची प्रस्तुती असलेला ’चंद्रकोर’ हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदíशत होत आहे. काव्यमय आणि उत्कट प्रेमकथा असलेल्या या ’चंद्रकोर’ सिनेमाचे दिग्दर्शन राजेश बाळकृष्ण जाधव यांचे आहे.
लहानपणापासून मला स्वत:ला वाचनाची खूप आवड आहे. आजवर अनेक कादंब-या मी वाचल्या आहेत. ‘लावण्याची चंद्रकोर’ ही कादंबरी काही वर्षापूर्वी माझ्या वाचनात आली. सरळ-साधी अशी असलेली प्रेमकथा मला खूप आवडली. या कथेवर आपण एखादी कलाकृती तयार करावी असे मी ठरविले आणि त्यातूनच ‘चंद्रकोर’ सिनेमाची निर्मिती झाली असे सिनेमाच्या निर्माती मीना खंडाळे यांनी सांगितले.
‘चंद्रकोर’ सिनेमाची कथा िनबाजी हिवरकर यांची आहे तर पटकथा आणि संवाद शरद बजरंग दोरके यांचे असून काही दिवसांपूर्वीच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. या सिनेमात अभिनेत्री मनीषा केळकर, जितू गोस्वामी, उदय सबनीस, जयराज नायर, गणेश यादव, प्राजक्ता केळकर, होनाजी चव्हाण, अशोक पाडवे, मीना सोनावणे, राजेश उबाळे आदी कलाकारांच्या भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. राजा फडतरे यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून सुदर्शन सातपुते यांनी संकलन केले आहे.
या सिनेमात एकूण पाच गाणी असून पाचही गाणी वेगळ्या पठडीतील आहेत. निर्मात्या मीना खंडाळे यांनीच या सिनेमातील गाणी लिहिली असून विजय गटलेवार यांचे संगीत लाभले आहे. सुप्रसिद्ध गायिका उत्तरा केळकर, साधना सरगम, जयश्री करंबेळकर, विजय गटलेवार आणि मििलद िशदे यांच्या आवाजात सिनेमातील गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.
कवी राम कदम फाऊंडेशनतर्फे उत्कृष्ट गीतकार म्हणून प्रदान करण्यात येणारा ‘तापी-पूर्णा पुरस्कार’ मीना खंडाळे यांना मिळाला असून ५४व्या अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनतही उत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांना या सिनेमासाठी मिळाला आहे.
मकरंद देशपांडेचे छोटया पडद्यावर पुनरागमन
याआधी ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मध्ये दिसून आलेला नावाजलेला अभिनेता मकरंद देशपांडे ९ वर्षानंतर छोटया पडद्यावर पुनरागमन करत असून तो लाईफ ओकेवरील पुकार-कॉल फॉर दि हीरोमध्ये लवकरच दिसून येणार आहे. ही खलनायकी भूमिका साकारण्यासाठी मला विपुल शाह यांचा कॉल आला. या शोमधील माझा लूक मला आवडला. छोटे केस, टाय, सूट-बूट आणि उंची ग्लेअर्स घालून मी असणार आहे. मी विदेशातून माफिया ऑपरेट करतो. ही भूमिका मला रोचक वाटली आणि कथानकही चांगले आहे. असे मकरंद देशपांडे म्हणाला.
मकरंद हा माफियाच्या रूपात दिसून येणार असून तो रस्तोगी ऊर्फ प्रशांत नारायणचा बॉस आहे. पुकार ही मालिका लाईफ ओक वाहिनीवर दर सोमवारी व मंगळवारी रात्री साडेआठ वाजता पाहता येणार आहे.
‘जी चाहता है’ लवकरच
निर्माता गणेश कुमार यांची निर्मिती असलेला दिल चाहता है हा चित्रपट येत्या २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणजे जुन्या काळातल्या काही उदाहरणाप्रमाणे गणेश कुमार या निर्मात्याने आपले चार बंगले व एक महागडी कार या चित्रपटासाठी विकून टाकली. त्याने या चित्रपटाची सुरुवात केली होती तेव्हा त्याला आर्थिक मदत करण्याचं आश्वासन अनेकांनी दिलं होतं. मात्र चित्रपट अर्धा झाल्यावर त्यांनी गणेश कुमार यांची साथ सोडली. त्याने न डगमगता गणेश कुमार यांनी आपल्याकडची संपत्ती विकून हा चित्रपट पूर्ण केला आहे.
या चित्रपटाची कथा छत्तीसगढमध्ये घडते. एक प्रेमीयुगूल प्रेमात विफल झाल्यानंतर कशा पद्धतीने हताश होतात, हे या चित्रपटातून दाखवले आहे. व्यसनांच्या मागे लागणा-या या तरुण पिढीला त्यातून बाहेर कसं पडायचं याचा एक संदेशही या चित्रपटातून देण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद व संगीत हे गणेश कुमार यांचेच असून या चित्रपटात तरुण आनंद व प्रियांका बर्मन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तरुणांना एक चांगला संदेश देणारा हा चित्रपट नक्कीच यशस्वी होईल अशी गणेश कुमार यांना खात्री आहे.
५ वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिवंगत संगीतकार आनंद मोडक यांना समíपत
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणारा यंदाचा ५वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दिवंगत ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांना समíपत करण्यात येत आहे. त्यांनी दहा नाटके, ३६ चित्रपट, सात हिंदी आणि आठ मराठी मालिकांना संगीत दिले होते. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या ऑस्करसाठी नामांकन झालेल्या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले होते.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि कलाप्रेमी म्हणून सर्वपरिचित असलेले कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारलेला ‘यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची’, या चित्रपटालाही मोडक यांनी संगीत दिले होते. दुर्दैवाने हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. चित्रपटाला संगीत दिल्यानंतर २३ मे २०१४ रोजी त्यांचे निधन झाले. म्हणूनच यंदाचा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आनंद मोडक यांना समíपत करण्यात येत आहे.
मूळचे अकोल्याच्या असणा-या मोडक यांनी आपल्या गावातील शाळेत शिक्षण घेतले. तेथेच ते संगीताचे धडे घेत होते. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट धरली. पीडीएच्या ‘घाशिराम कोतवाल’मधून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. १९७२मध्ये भास्कर चंदावरकर यांच्यासोबत त्यांनी आपल्या संगीतप्रवासाला सुरुवात केली. १९७४मध्ये सतीश आळेकरांच्या ‘महानिर्वाण’ या नाटकाने त्यांना संगीतकार बनवले. हे नाटक पुण्यातल्या थिएटर अकादमीसाठी बसवलेले होते, ज्याचे स्वत: ते संस्थापक सदस्य होते. या नाटकामुळे त्यांच्या संगीतप्रवासाला उजाळा मिळाला आणि नाटक, नभोवाणी, दूरचित्रवाणी आणि नंतर पुढे चित्रपट असा त्यांचा संगीतप्रवास बहरत गेला. हे सारे सुरू असताना त्यांनी महाराष्ट्र बँकेतील आपली नोकरीही प्रामाणिकपणे पूर्ण केली.
पारंपरिकतेला छेद देत त्यांच्या संगीताने नवे मार्ग चोखाळले. शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्त्य संगीताचा ठेका यांचा सुरेख मिलाप त्यांच्या संगीतात होता. त्यांच्या अनेक रचना पुरस्काराने गौरवल्या गेल्या. ज्यात ‘चौकट राजा’ (१९९१), ‘तू तिथे मी’ (१९९८), ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ (२००९) हे चित्रपट तर ‘खेळीया’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘बेगम बर्वे’ अशा काही नाटकांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या ‘मुक्ता’ (१९९३), ‘दोघी’ (१९९४), ‘रावसाहेब’ (१९९५) आणि ‘धूसर’ (२०१०) या चित्रपटांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार चित्रपट पुरस्काराकडून उत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाले. लागोपाठ तीन र्वष महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारातर्फे उत्कृष्ट संगीतकाराचा बहुमान मिळालेले मोडक हे मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव संगीतकार.
कुमार गंधर्वाच्या गायकीचा आपल्यावर प्रभाव असल्याचे ते मान्य करत. गंधर्वाना आपण दैवतच मानतो. हे सांगताना त्यांचे गाणे, त्यांचे विचार, आपल्याला नेहमी बोट धरून नेत असतात, असे मोडक नेहमी सांगत. काळाच्या पुढचे संगीत देणारा संगीतकार म्हणून मराठीत आनंद मोडक हे नाव सुपरिचित आहे. म्हणूनच ५वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मोडक यांना समíपत करणे समयोचित आहे.
या चित्रपट महोत्सवाची सुरुवात १७ जानेवारी रोजी यशवंत सेंटरमध्ये झाली. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार हे होते. कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, उपाध्यक्ष अरुण गुजराथी, आदी मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन सोहळयाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रथम पारितोषिक पटकावलेला इटलीच्या लाईफ द वडी या चित्रपटाचे दिग्दर्शक मारको पुकओनी हे यांचीही उपस्थिती लाभली. महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना यावेळी एका विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. हा उद्घाटन सोहळा लक्षात राहिला तो तौफिक कुरेशी यांच्या ड्रमवादनाने. यंदाच्या महोत्सवात इजिप्त, फ्रान्स, अरेबिक, ऑस्ट्रेलिया, इटली या देशातले चित्रपट दाखवले जात आहेत. हा चित्रपट महोत्सव १८ ते २३ जानेवारी दरम्यान मुंबईत रंगला. याला रसिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या महोत्सवात जगातील काही उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळाले.