लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, अभिनेता अमन वर्मा (बिग बॉस फेम ९) व सिद्धी फिल्मचा नवीन संगीत अल्बम ‘झनकार’(दी साउंड ऑफ सोल)चे नुकतेच अनावरण करण्यात आले.
गणेश आचार्य आणि अमन वर्मा यांचा नवीन अल्बम ‘झनकार’
लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य, अभिनेता अमन वर्मा (बिग बॉस फेम ९) व सिद्धी फिल्मचा नवीन संगीत अल्बम ‘झनकार’(दी साउंड ऑफ सोल)चे नुकतेच अनावरण करण्यात आले. या अल्बमचे निर्माते संदीप इंगळे असून या अल्बमला रवी त्रिपाठी, ए स्टार एम्मी व मेघा भारद्वाज यांचा आवाज लाभला आहे. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘झनकार’ या अल्बममध्ये सुमधुर गीते असून ही गीते संदीप इंगळे, राज जतानिओ व अमिता कुलाल यांच्यावर चित्रित करण्यात आली आहेत. यावेळी सिद्धी फिल्म्सने युवी फिल्म्सबरोबर ‘पी जी नॉट अलावुड’ या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली. याचे दिग्दर्शन राजेश नायर हे करणार आहेत.
हा अल्बम ‘फॅशन वेव्स ट्रेडिंग’ आणि मुहम्मद अस्लम यांची प्रस्तुती आहे. नृत्य दिग्दर्शक राहुल, संजीव हवालदार व देव थापे यांचे आहे. तर छायाचित्रण अरुण प्रसाद, गीते व संगीत संदीप इंगळे, तर वेशभूषा जिमी, संपादन प्रशांत, वी एफ एक्स आश्विन पाटील आणि लाईन-प्रॉडक्शन हितेन झा यांचे आहे.
‘तालिम’च्या शीर्षकगीताचे प्रकाशन
५९वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नुकतीच नागपूरमधील चिटणीस पार्क येथे पार पडली. ‘तालिम’ या मराठी चित्रपटाची सध्या निर्मिती प्रक्रिया सुरू असून हा चित्रपट कुस्तीशी निगडित आहे. ‘तालिम’ या चित्रपटाच्या निमित्ताने कुस्ती पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. एनएमआर फिल्म्सची प्रस्तुती तसेच कमल शहा यांची सहनिर्मिती असलेल्या ‘तालिम’ या चित्रपटातील ‘तालिम रंगू दे ..’ या शीर्षकगीताचे प्रकाशन महाराष्ट्र केसरी स्पध्रेदरम्यान मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी चित्रपटाचे सहनिर्माते कमल शहा, दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे, प्रमुख कलाकार अभिजीत श्वेतचंद्र आणि प्रशांत मोहिते, लेखक सिब्तेन शाहिदी, कॅमेरामन सईद लायक अली, कास्टिंग डायरेक्टर तसेच कॉस्च्युम डिझायनर चैत्राली डोंगरे उपस्थित होते. ‘तालिम’ या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट कुस्तीशी निगडित असल्याचं जाणवतं. ‘तालिम रंगू दे..’ हे शीर्षकगीत ‘तालिम’च्या कथेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं असून हे गीत स्फूर्तिदायक आणि प्रेरणा देणारे असे आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
आपण प्रेमाने ज्यांना ‘अब्बाजी’ म्हणतो त्या उस्ताद अल्लारखाँ यांची ३ फेब्रुवारी २०१६ ही सोळावी पुण्यतिथी आहे. पुन्हा एकदा या निमित्ताने संपूर्ण भारतातून आणि जगभरातून कलाकार षण्मुखानंद हॉलमध्ये या गुरू आणि तबलानवाजाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येत आहेत.
अब्बाजींनी जगभरातील अक्षरश: लाखो संगीत रसिकांना आपल्या संगीताने मंत्रमुग्ध केले होते. अब्बाजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणा-या ‘होमेज टू अब्बाजी’ला गेल्या सोळा वर्षामध्ये शास्त्रीय संगीत विश्वामध्ये एक महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. तो जगातील एक महत्त्वाचा लोकप्रिय तंतुवाद्य सोहळा म्हणून नावारूपाला आला आहे.
आपल्या आदरणीय गुरूला श्रद्धांजली अर्पण करणे हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. त्यातही भारतीय संगीत क्षेत्रात या परंपरेला अतुल्य असे महत्त्व आहे. ताज महल चहा, रिलायन्स फाऊंडेशन यांचे सह-सादरीकरण या कार्यक्रमाला लाभले असून कोटक महिंद्रा एएमसी लिमिटेड, बँक ऑफ इंडिया या कंपन्यांनी सह-प्रायोजकत्व दिले आहे. ऑíकड हॉटेलने या सोहळ्यामध्ये आदरातिथ्य प्रायोजकत्व स्वीकारले आहे.
‘होमेज टू अब्बाजी’ या दिवसभर चालणा-या कार्यक्रमाला ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.३० वाजता ‘तालप्रणाम’ने सुरुवात होणार आहे. उस्ताद शुजात खान (सितार), श्रीमती आरती अंकलीकर-टिकेकर (गायन) आणि नामधारी सुखविंदर सिंग यांच्यासह नामधारी बळवंत सिंग (धृपद पद्धतीचे पंजाबी गायन) हे आघाडीचे कलाकार त्यात आपली कला सादर करतील. दुपारी सादर होणा-या ‘तालतपस्या’ची सुरुवात ११.३० वाजता होईल. त्यात बिक्रम घोष (तबला), मन्नरगुडी एम आर वासुदेवन (थविल) आणि नामधारी सुखविंदर सिंग (जोरी) सहभागी होतील.
संध्याकाळच्या ‘सेलिब्रेटिंग अब्बाजी’ या सत्राची सुरुवात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. पाश्चिमात्य ड्रमवादक विन्नी कोलायटा आणि तुनीशियाचे संगीतकार धाफर युसेफ त्यात सहभागी होणार आहेत. या सोहळ्याची भव्य अंतिम सांगता झाकीर हुसेन यांच्या नेतृत्वाखालील सत्राने होणार आहे. त्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमाच्या प्रत्येक सत्राच्या मोफत प्रवेशिका कार्यक्रमाच्या एक तास अगोदर षण्मुखानंद सभागृहात मिळतील.
बाडरे चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
उत्तम चित्रपट निर्मितीच्या ध्यासाने पछाडलेली तरुणाई वेगवेगळ्या वाटा धुंडाळू लागली आहे. यातूनच नावीन्यपूर्ण विषयावरचे सिनेमे मराठी चित्रपटसृष्टीत दिसू लागले आहेत. रितू फिल्म्स कट प्रॉडक्शन व पांचजन्य प्रॉडक्शन प्रा.लि.चा बाडरे हा असाच वेगळ्या विषयावरचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गीत ध्वनिमुद्रणाने या सिनेमाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. जीवनमूल्यांचा वेध घेणा-या बाडरे या सिनेमाचं दिग्दर्शन भीमराव मुडे करीत आहेत. ‘बांधरे, आशेची शिदोरी. तोड रे, भीतीची तिजोरी’ असे सकारात्मक बोल असलेल्या गीताने बाडरेचा मुहूर्त झाला असून हाच दृष्टिकोन बाडरे चित्रपट प्रेक्षकांना देईल,अशी आशा दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी व्यक्त केली.
जीवनाच्या प्रवासात इच्छितस्थळी पोहोचेपर्यंत मधल्या प्रवासाची जी गंमत असते ती गंमत म्हणजेच.बाडरे हाचित्रपट, असं सांगत हा चित्रपट प्रेक्षकांना कलात्मक आनंद देईल, असा विश्वास अभिनेते मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केला. दिग्दर्शकाने केलेला हा वेगळा प्रयोग दाद देण्यासारखा असून एक आव्हानात्मक व वेगळी भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेते अशोक समर्थ यांनी बोलून दाखवला.
चित्रपटाचं लेखन भीमराव मुडे व श्वेता पेंडसे यांनी केलं आहे. मनोज यादव, गणेश चंदनशिवे यांच्या गीतांना संगीतकार रोहन-रोहन यांचा संगीतसाज लाभला आहे. चित्रपटाचे छायांकन विनायक जाधव यांचे असून कला-दिग्दर्शन तृप्ती ताम्हाणे याचं आहे. वेशभूषा महेश शेरला व रंगभूषा नीलेश सोनावणे यांनी सांभाळली आहे.
ऋतुजा गायकवाड-बजाज व अनिल गायकवाड निर्मित या चित्रपटात मकरंद देशपांडे, अशोक समर्थ,अंजली पाटील, गौतम जोगळेकर, गिरीश परदेशी, संदेश जाधव, प्रणव रावराणे, श्वेता पेंडसे, रुपेश बने, सुयश शिर्के, वर्षा दांदळे, जगन्नाथ निवंगुणे, रमेश वाणी, पूर्णिमा अहिरे, अतुल महाजन, अगस्त्य मुडे, भूमी प्रधान यांच्या भूमिका आहेत. बाडरेच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.
नगर जिल्ह्यात आता अनेक चित्रपटांचे शूटिंग होत आहे. त्यात आणखी मोलाची भर म्हणजे न्यू टॅलेंट सर्च मूव्हीज व वस्तुस्थिती फिल्म्स यांच्या सहयोगाने निर्मिती असलेल्या ‘रायरंद’ चित्रपटाचे शूटिंग पुणतांबा (ता. राहाता) येथे अवघ्या १२ दिवसांत पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश पोपट ननावरे यांनी केले असून कथा-पटकथा-संवाद आशीष निनगुरकर यांची आहे. चित्रपटाचे कॅमेरामन राजेश वाव्हळ आहेत तर सिनेमाचे कार्यकारी निर्माते भावेश लोंढे असून कलादिग्दर्शन सुभाष कदम यांनी केले आहे.
बहुरूपी व बालमजुरीवर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट असून खरं तर लहान मुलांच्या हातात पाटी आणि पेन्सील असायला हवी; पण त्यांना मजबुरीमुळे काम करावे लागते. या चित्रपटात एका लोककलावंत बहुरूपी माणसाची गोष्ट मांडण्यात आलेली आहे. एक बहुरूपी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो; पण त्याने भोगलेल्या यातना,त्याचा संघर्ष हा अभूतपूर्व असतो. एक सामान्य माणूस जेव्हा लहानपणापासून ‘बालमजूर’ म्हणून काम करतो तेव्हा त्याची वाढ ही मजबुरीमुळेच होत असते. पण जेव्हा हा बालमजूर मोठा होतो; तेव्हा तो या लहान मुलांसाठी काहीतरी करण्यासाठी धडपडतो. तेव्हा गावातील एक प्रस्थ आमदारांचा कार्यकर्ता त्याची झोपडी जाळतो आणि त्याला रस्त्यावर आणतो. मग हा बहुरूपी या सगळ्या गोष्टींचा बदला कसा घेईल? त्या आमदाराच्या कार्यकर्त्यांला शिक्षा होईल का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सिनेमा बघितल्यावरच मिळतील.
पुणतांबा (ता.राहाता) गावातील चांगदेव मंदिर, खंडोबा मंदिर, आदर्श शाळा,जैन धर्म स्थानक,आशा केंद्र, इंदिरानगर,दाभाडे टपरी,गावातील चावडी,वेस आणि वाकडी रोड अशा ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग झाले आहे. यासाठी गावातील संतोष चोरडिया व सुरेश दाभाडे यांचे अनमोल सहकार्य मिळाले. या चित्रपटात दिग्गज अभिनेते अनंत जोग यांच्यासहित रणजीत कांबळे,आशीष निनगुरकर,श्यामभाई श्रीवास्तव,करण कदम,आनंद वाघ,झाकीर खान,नाना शिंदे,अनुराग निनगुरकर,अजित पवार,प्रवीण भाबळ,सुनील जैन,रेखा निर्मल,नाना कíडले व गावातील अनेक कलावंत काम करत आहेत.
तसेच स्वप्नील पवार, युवराज कुंभार, अमृता पाटील, सुनील लांबदाडे, उत्कर्षा चोरडिया, सिद्धेश दळवी, राजू ईश्वरकट्टी, उद्धव देवकाते, फिरोज खान,अशोक निनगुरकर,अनिल गोसावी, नारायण पवार, अजित पवार, अनुज गोसावी, प्रवीण भाबळ, स्वप्नील निंबाळकर, सागर कांबळे, वृषभ निकम, सागर भोसले, रेखा निर्मळ, दर्शना गोरे, सुनील जाधव व गोरख पाठारे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
हिंदी चित्रपट दाखवणारे भारतातील प्रीमियम चॅनेल म्हणून ओळखल्या जाणा-या सोनी मॅक्सने आपल्या दर्शकांकरिता आजच्या युगातील तरुण मुला-मुलींच्या प्रेमसंबंधातील गुंतागुंत सांगणा-या ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटाचे वर्ल्ड प्रीमियर सादर करणार आहे. येत्या रविवारी २४ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. निखिल अडवाणीद्वारा दिग्दर्शित या चित्रपटात कंगना रनौत आणि इमरान खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात मॅडी (इमरान खान) आणि पायल (कंगना रनौत) यांच्यातील प्रेमकथा सांगण्यात आली आहे. हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असतात. अचानक काही घटना अशा घडतात की, त्यांच्यातील नाते संपते. हा चित्रपट एखाद्या रहस्यपटासारखा पुढे सरकत मॅडी आणि पायलची कथा सांगतो.
बेळगाव सीमाप्रश्न रुपेरी पडद्यावर
भारतात भाषावार प्रांतरचना झाल्यानंतर काही काही ठिकाणांच्या भौगोलिक व भाषिक संदर्भात दोन राज्यांमध्ये काही वाद उभे राहिले. असाच एक अनेक वर्षापासूनचा वाद म्हणजे बेळगाव सीमाप्रश्न. महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातला हा सीमाप्रश्न केवळ राजकीयच नाही तर तो भावनिकही आहे. या सीमाप्रश्नाचा विविध स्तरावर ऊहापोह होत असतो. या भागात राहणा-या मंडळींसाठी तर हा प्रश्न फारच जिव्हाळय़ाचा. याच पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेला मराठा टायगर्स हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात मुख्य भूमिका ही डॉ. अमोल कोल्हे करत आहे. राजा शिवछत्रपती या मालिकेतील शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर डॉ. अमोल कोल्हे यांचे दोन्ही राज्यात अनेक चाहते निर्माण झाले आहेत. या चित्रपटातली त्यांची भूमिका जरी एका सर्वसाधारण तरुणाची असली तरी या चित्रपटाच्या पार्श्वभूमीमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनात कर्नाटक सरकारकडून अनेक अडचणी येत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
वास्तविक पाहता ही एक प्रेमकहानी आहे. त्यातली पार्श्वभूमी जरी सीमाभागाची असली तरी अशा पद्धतीने कोणत्याही कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता कामा नये असं ते म्हणतात. या चित्रपटाला आधीच सेन्सॉरने प्रमाणपत्र दिलेले आहे. त्यांनाही हा प्रश्न माहीत आहे. त्यांनाही हा प्रश्न चित्रपटात कशा पद्धतीने आणला आहे याची जाणीव आहे. त्यामुळे हा चित्रपट न पाहता त्याला अशा पद्धतीने प्रदर्शनाला नकार देण्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. यातून वास्तविक पाहता कर्नाटक सरकार त्यांच्यावर होत असलेल्या मुस्कटदाबीच्या आरोपाला पुष्टीच देत असल्याचंही ते म्हणतात.
आपल्याला शिवाजी महाराजांच्या भूमिकेनंतर बेळगावात येण्यास बराच त्रास झाल्याचंही ते म्हणतात. मी जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो तेव्हाच अगदी सकाळी सकाळी तिथल्या उच्च श्रेणीच्या अधिका-यांनी मला येऊन तुम्ही या प्रश्नावर काहीही बोलायचे नाही अशी सूचना केली होती. त्यावर मी जरी काही बोललो नसलो तरी माझ्या कार्यक्रमांना होत असलेली गर्दी पाहून या मंडळींमध्ये शिवाजी महाराजांविषयीचा आदर पाहून मीही भारावलो होतो. हा प्रश्न जरी वेगवेगळय़ा पातळींवर लढला जात असला तरी कलेच्या माध्यमातून कलावंतांना व्यक्त होण्यापासून रोखणं हे लोकशाही मूल्यांमध्ये बसत नसल्याचंही ते म्हणतात.
या चित्रपटाची निर्मिती मिरजमध्ये व्यवसाय करणारे नावेद हंगड यांनी केली आहे. त्यांच्या दृष्टीने हे जरी एक आव्हान असलं तरी आमच्यासारख्यांना सीमाभागातल्या लोकांची दु:खं माहीत आहेत. ती किमान आपण व्यक्त करावीत या हेतूनेच या चित्रपटाची निर्मिती केल्याचं ते सांगतात. या चित्रपटावरून जरी राजकारण तापत असलं तरी हा चित्रपट प्रदर्शित करणार व प्रेक्षकही त्याला तितकीच भरभरून दाद देतील असा विश्वासही डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
आपल्या अवतीभवती घडणा-या अनेक घटनांचे प्रतिबिंब चित्रपटाच्या माध्यमातून उमटत असते. समाजाच्या रक्षणासाठी झटणा-या ‘पोलीस’ या महत्त्वपूर्ण घटकाची कथा आता मराठी रुपेरी पडद्यावर येऊ घातली आहे. नाण्याच्या एकाच बाजूचा विचार आपण अनेकदा करत असतो, दुसरी बाजू तशीच अंधारात राहते. या अंधारात राहिलेल्या बाजूवर प्रकाश टाकण्याचं काम दिग्दर्शक राजू पास्रेकर यांनी आपल्या आगामी ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटातून केलं आहे. साईश्री क्रिएशन प्रस्तुत जिजाऊ क्रिएशन निर्मित या मराठी चित्रपटातून पोलिसांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे.
नुकतंच या सिनेमाचं म्युझिक लाँच डॉ. पी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते संपन्न झालं. सिनेमाचा ट्रेलरही यावेळी दाखवण्यात आला. ज्येष्ठ गायक अनुप जलोटा यांच्यासह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. ‘सदरक्षणाय खलनिग्रणाय..’ आणि ‘आख्खा शिनेमा पाहून घे..’ ही दोन गीते या चित्रपटात आहेत. ही गीते कौतुक शिरोडकर, नितीन तेंडुलकर यांनी शब्दबद्ध केली असून प्रवीण कुवर, अभिषेक शिंदे यांचं संगीत आहे. ही गाणी आदर्श शिंदे, भारती मढवी, प्रवीण कुवर यांनी गायली आहेत. या चित्रपटाला कुवर, ओंकार टिकले यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे. नृत्यदिग्दर्शन संतोष पालवणकर यांचं आहे. यातल्या ‘आख्खा शिनेमा पाहून घे..’ हे गीत मानसी नाईकवर चित्रित करण्यात आलं आहे.
सामान्यांच्या सेवेला कायम तत्पर असणा-या पोलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वत:च्याही काही गरजा आहेत. अहोरात्र सामान्यांच्या सुरक्षिततेसाठी झटणा-या पोलिसांच्या या गरजांचा विचार व्हावा यासाठी ‘पोलीस लाईन’ एक पूर्ण सत्य या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. रंजनातून अंजनाची जाणीव करून देणारा हा सिनेमा २९ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. सतत ‘ऑन डय़ुटी’ असल्याने ढासळते आरोग्य, तणाव, निवासस्थानाची दुर्दशा, तुटपुंजा पगार अशा अनेक समस्यांमुळे पोलीस त्रस्त आहेत. पोलिसांना भेडसावणा-या या समस्यांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. हा चित्रपट सर्वसामान्यांना पोलिसांच्या वेदनेची नक्कीच जाणीव करून देईल, अशी निर्मात्यांची भावना आहे.
श्रीधर चारी, भारती शेट्टी व निक्षाबेन मोदी या चित्रपटाचे प्रस्तुतकत्रे आहेत. रुपाली पवार व वैशाली पवार या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा दीपक पवार यांची असून पटकथा, संवाद अमर पारखे, राजू पास्रेकर, संदेश लोकेगांवकर यांचे आहेत. दिग्दर्शन राजू पास्रेकर यांचे आहे. सतीश पाटील यांनी संकलनाची व नीलेश ढमाले यांनी छायांकनाची जबाबदारी सांभाळली आहे.
जयंत सावरकर, सतीश पुळेकर, प्रदीप पटवर्धन, विजय कदम, प्रदीप कबरे, प्रमोद पवार, जयवंत वाडकर, संतोष जुवेकर, मानसी नाईक,निशा परुळेकर, पूर्णिमा अहिरे-केंड, नूतन जयंत, प्रणव रावराणे, सतीश सलागरे, जयवंत पाटेकर, स्वप्नील राजशेखर आदींच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.