मराठा समाजाची दिशाभूल केली असून त्यांच्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा रेंगाळत राहिला असल्याचा घणाघाती आरोप छावा युवा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी केला.
मुंबई – केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली असून त्यांच्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न हा रेंगाळत राहिला असल्याचा घणाघाती आरोप छावा युवा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मराठा समाजाला येत्या काळात आरक्षण मिळण्यासाठी आता कोणीही आडकाठी करत असेल त्याला मराठा समाज माफ करणार नाही, याची नोंद मराठा समाजातील नेत्यांनी घ्यावी, असेही पाटील यांनी सांगितले. मराठा समाजाला मिळणा-या आरक्षणासाठी ओबीसींमध्ये गैरसमज पसरवण्यात आले असून त्यांच्यातून आरक्षण मिळावे ही मागणी नाही.
मात्र तामिळनाडूप्रमाणे असलेल्या आरक्षणात वाढ करून ते दिले तर या समाजाला न्याय मिळेल असेही ते म्हणाले. या वेळी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आमदार विनायक मेटे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या अभिप्रायाचा जाहीर शब्दात निषेध नोंदवण्यात आला. मेटे यांनी मराठा समाजात दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान तत्काळ बंद करावे. अन्यथा छावा संघटना त्यांना त्यांच्याच शैलीत उत्तर देईल, असा इशाराही पाटील यांनी या वेळी दिला.