मराठी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत विविध विषयांवर चित्रपट निर्मिती होत असतांनाच आता मराठीतला पहिला सायफाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
मुंबई- मराठी चित्रपट सृष्टीत आतापर्यंत विविध विषयांवर चित्रपट निर्मिती होत असतांनाच आता मराठीतला पहिला सायफाय चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आजोबा’ व ‘शाळा’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्यांचा ‘पुंतरु’ हा नवा चित्रपट येत्या ३ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात एका तरुण शिकाऊ इंजिनिअरने निर्माण केलेल्या ‘स्वप्ना’ची कथा मांडण्यात आली असून आतापर्यत कधीही न आलेले कथानक हे या चित्रपटाचे वैशिष्टय आहे.
मला अनेक दिवसांपासून अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करायचा होता. आपल्याच आधीच्या कामापेक्षा काहीतरी कठिण काम आपण केलं पाहिजे अशी माझी विचारसरणी असून त्या नुसारच आपण या चित्रपटाची कथा लिहिल्याचं या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके यांनी म्हटलं आहे. मंगळवारी या चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉंचिंग करण्यात आले त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना या चित्रपटाची थोडक्यात कल्पना दिली.
या चित्रपटाचे अध्र्याहून अधिक काम हे व्हीएफएक्स तंत्राच्या सहाय्याने करण्यात आले असून या चित्रपटाच्या निर्मितीला जवळजवळ दोन वर्षाचा कालावधी लागल्याचंही ते म्हणाले. या चित्रपटात एक तरुण इंजिनिअर आपल्या प्रेमाला मिळवण्याकरता कोणतं साहसं करतो व त्यातून त्याच्यापुढे कोणते प्रश्न निर्माण होतात हे दाखवण्यात आले आहे.
अर्थात चित्रपटाच्या एकंदरीत कथानकाविषयी जरी गुप्तता पाळण्यात आली असली तरी त्याच्या ट्रेलरवरुन एक अत्यंत संवेदनशील अशा व्यक्तीच्या मानसिकतेत कसा काय बदल घडवला जाऊ शकतो हे दाखवण्यात आलं आहे.
पुंतरु या चित्रपटाची निर्मिती इरॉस इंटरनॅशनल यांनी केली असून या चित्रपटात केतकी माटेगावकर आपल्याला एका वेगळयाच अशा भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आतापर्यतच्या माझ्या भूमिका या माझ्या व्यक्तीमत्त्वाशी सुसंगत अशा होत्या. ही भूमिका मात्र माझ्या व्यक्तीमत्त्वापेक्षा अगदी वेगळीचं असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.
या चित्रपटातल्या तरुण इंजिनिअरची भूमिका मदन देवधर करत असून या चित्रपटाने मराठीत एक वेगळया चित्रपटांची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या चित्रपटाचे छायांकन हे अर्चना बो-हाडे यांनी केले आहे. संगीत सौरभ भालेराव, ऋषिकेश दातार व जसराज जोशी यांचे असून या चित्रपटात केतकी माटेगावकर हिनेही एक गाणं गायले आहे.