रेल्वे भाडेवाढीच्या धसक्यापोटी वार्षिक, सहामाही, तिमाही पास खरेदी केलेल्या प्रवाशांवर आता ते जपून ठेवण्याची मोठी जबाबदारी आली आहे.
मुंबई- रेल्वे भाडेवाढीच्या धसक्यापोटी अवघ्या तीन-चार दिवसांत लाखो वार्षिक, सहामाही, तिमाही पासांची विक्री होऊन रेल्वेने कोटय़वधी रुपयांची कमाई केली असली, तरी आता या पासांना जपून ठेवण्याची मोठी जबाबदारी प्रवाशांवर आली आहे.
एक रकमी काही हजारो रुपये रेल्वेला दिल्यानंतर हा पास हरवला तर काय, याबाबत रेल्वे प्रशासनाने काहीच स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे, पास हरवल्यास पासाचा संकेत क्रमांक तसेच प्रवाशाची ओळख पटवून त्यास डुप्लिकेट पास उपलब्ध करून देण्याची मागणी कर्जत-कसारा रेल्वे प्रवासी संघटना करणार असल्याची माहिती या संघटनेचे सल्लागार राजेश घनघाव यांनी ‘प्रहार’ला दिली.
सध्याच्या नियमानुसार, पास हरवला तर पुन्हा नव्याने पास काढण्याशिवाय पर्याय नसून डुप्लिकेट पास देण्याची पद्धत नाही. तसेच, पासाची झेरॉक्स प्रतही मान्य होत नाही. त्यामुळे, प्रवाशांना हजारो रुपये किंमतीचा पास पाकिटमारांपासून वाचवण्यासह स्वत:च्या चुकीने हरवू न देण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. मेल एक्स्प्रेसच्या तिकिटांची नोंद असल्याने ते हरवल्यास डुप्लिकेट तिकीट दिले जाते. मात्र उपनगरीय रेल्वे तिकिटे आणि पासाच्या बाबतीत ही सुविधा उपलब्ध नाही, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांनी दिली.
चार दिवसांत कोट्यवधींची कमाई
रेल्वेने भाडेवाढ केल्याने रविवार ते मंगळवापर्यंत अनेक पासधारकांची सहामाही व वार्षिक पास काढण्यासाठी झुंबड उडाली होती. भाडेवाढीच्या भीतीपोटी लाखो पासधारकांनी कमी भाड्यांतील पास काढले आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत तीन दिवसांत कोटय़वधी रुपयांचा महसूल जमा झाला. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच लाखो प्रवाशांनी तीन दिवसांत पास काढले.
[EPSB]
रेल्वेचा पास झाला मौल्यवान!
रेल्वे भाडेवाढीच्या भीतीपोटी वर्षाचा, सहा महिन्याचा पास काढण्यासाठी तिकीट खिडक्यांवर गर्दी करणा-या प्रवाशांना आता वर्षभर पास सांभाळावा लागणार आहे.
[/EPSB]