महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होत शिवसेनेने भाजपासोबत युतीचे सरकार चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होत शिवसेनेने भाजपासोबत युतीचे सरकार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही भाजपाच्या डोक्यात वेगळीच रणनीती आकार घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढवल्या जातील, अशी ग्वाही दिली.
परंतु प्रत्यक्षात मार्च २०१७च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळय़ांसमोर ठेवत शिवसेनेसोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेतून फोडाफोडी करण्याची व्यूहरचना भाजपाने बनवली आहे.
यात निवडून येण्याची क्षमता असलेले तसेच इतरांना पाडू शकतील, अशा विविध पक्षांच्या तब्बल १००हून आजी-माजी नगरसेवकांची यादीच त्यांनी बनवली आहे. या सर्वाना टप्प्याटप्प्याने भाजपात प्रवेश देत शिवसेनेचे संस्थान खालसा करण्यात येणार आहे.
मुंबई पालिकेत शिवसेना-भाजपाची १९९२ पासूनची युती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावरून युती तुटली. मात्र, सत्तेची खुर्ची टिकवण्यासाठी दोन्ही पक्ष एकमेकांच्या जवळ आले. युतीत निर्माण झालेल्या दुराव्यानंतर पक्षाचे आमदार फुटू नयेत म्हणून शिवसेना सत्तेत सहभागी झाली.
परंतु राज्यात ७० दिवसांपर्यंत शिवसेनेने भाजपाला लटकवून ठेवले. त्यामुळे भाजपाने पालिकेच्या निवडणुकीत हे चित्र नको, असा पावित्रा घेतला आहे. त्यामुळे पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला पाहिजे, असे ठरवून मुंबई भाजपाने जिंकून येण्याची क्षमता असलेल्या १०० आजी-माजी नगरसेवकांची यादी तयार केली आहे.
भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, विशेषत: सर्व पक्षातील गुजराती, उत्तर भारतीय आदी अमराठी नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्याखालोखाल मराठी नगरसेवक असल्याचे सांगितले. युती होणार नसल्याने फोडाफोडीचे तंत्र २०१२च्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२७ जागांपैकी शिवसेनेने १३५ जागा लढवल्या होत्या.
तर भाजपाने ६३ जागांवर निवडणूक लढवली होती. आणि रिपाइंला(आठवले गट)२९ जागा दिल्या होत्या. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे १५ तर भाजपाचे १४ आमदार निवडून आले. त्यामुळे भाजपाकडून निम्म्या जागांची मागणी होण्याची शक्यता आहे. शिवाय रिपाइं, भाजपासोबत असल्यामुळे भाजपाच्याच कोटय़ातून जागा देण्याची अट शिवसेनेकडून टाकली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात युती होणे अशक्य आहे. त्यामुळेच भाजपाने आतापासून निवडून येणा-या नगरसेवकांना विश्वासात घेऊन ठेवले आहे.