वाटाघाटीनुसार महापौरपद पदरात न पडल्याने उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची घालमेल सुरू आहे.
उल्हासनगर- वाटाघाटीनुसार महापौरपद पदरात न पडल्याने उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची घालमेल सुरू आहे. साई पक्षाच्या महापौर आशा इदनानी ४ जून रोजी राजीनामा देणार होत्या. मात्र पंधरा दिवसानंतरही त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे माजी आमदार पप्पू कलानींच्या मदतीने महापौराना खिंडीत गाठण्यासाठी सेनेने तयारी चालवली आहे. उपमहापौरांच्या दालनात कलानींसह शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बैठक झाल्याने सत्तेची नवी समीकरणे आकारास येण्याची चिन्हे आहेत.शिवसेना-भाजप-रिपाइंला राष्ट्रवादी काँग्रेसच्या १९ नगरसेवकांनी बाहेरून पाठिंबा देण्यासाठी सेनेची रणनिती सुरू असल्याची चर्चा आहे.
महापौर आशा इदनानी यांनी ४ जूनला वाटाघाटीनुसार, राजीनामा देण्याचे ठरले होते. मात्र त्यांची मुलगी आजारी असल्याने तिची भेट घेण्यासाठी त्या परदेशी गेल्या होत्या. परतल्यानंतर त्या पंधरा दिवसांत राजीनामा देतील, असे आश्वासन त्यांचे पती जीवन इदनानी यांनी सेनेला दिले होते. मात्र बुधवारी पंधरा दिवस होऊन महापौर राजीनामा देत नसल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे.
पालिका मुख्यालयातील भाजप उपमहापौर जमनादास पुरस्वानी यांच्या दालनात नगरसेवक राम पारवानी व शिवसेनेचे सभागृह नेते धनंजय बोडारे व राष्ट्रवादीचे माजी आमदार पप्पू कलानी यांच्यात बुधवारी बैठक झाली. दहा ते पंधरा मिनिटेच ही बैठक झाली असली तरी महापौरांना खिंडीत पकडण्यासाठीच हा खटाटोप असल्याचे बोलले जाते. दोन महिन्यांपूर्वी पप्पू कलानी यांनी भरसभेत महापौरांचे पती जीवन इदनानी यांना मारहाण केली होती. त्यामुळे कलानी व इदनानी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत झाले आहे. त्याचा फायदा उठवत साई पक्षासोबत शिवसेना नवी खेळी खेळत असल्याची चर्चा रंगली आहे.