पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी पोलिसांची गस्ती वाढवणे गरजेचे आहे. मात्र मुंबईतील अनेक भाग आजही असुरक्षित असून झोपडपट्टय़ांवर पोलिसांनी जागता पहारा देणे गरजेचे आहे.
मुंबई – पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरातील विविध ठिकाणी पोलिसांची गस्ती वाढवणे गरजेचे आहे. मात्र मुंबईतील अनेक भाग आजही असुरक्षित असून झोपडपट्टय़ांवर पोलिसांनी जागता पहारा देणे गरजेचे आहे. झोपडपट्टी भाग हा दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान ठरू शकतो, या पार्श्वभूमीवर या भागात कोंबिंग ऑपरेशन सतत सुरू ठेवणे गरजेचे आहे.
मानखुर्द खूप मोठा आणि जास्त लोकवस्ती असलेला विभाग आहे. त्यामुळे या विभागात दहशतवादी हल्ला झाल्यास अनेक कुटुंबं बेचिराख होण्याची शक्यता आहे. शिवाय अस्वच्छता, गलिच्छ वस्त्या, निमुळते रस्ते यांसोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीही दिवसेंदिवस वाढीस लागत आहे. अंतर्गत गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची गस्तीही पाहायला मिळत नाही. लहान-लहान वस्त्या असल्या तरी दाट लोकसंख्या असल्याने याठिकाणी हल्ले होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
कोणत्याही घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यावरही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. दहशतवादाची टांगती तलवार मुंबईवर असतानाही सामान्यांच्या प्रत्येक तक्रारीवर पोलिसांची करडी नजर असणे गरजेचे आहे. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची हालचाल केली जात नसल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
घातपाताची जास्त शक्यता
सुरक्षेच्या दृष्टीने साठय़ेनगर हा विभाग अत्यंत धोकादायक आहे. कारण पोलिसांना येथे होणाऱ्या घडामोडींबद्दल काहीच कल्पना नसते. दहशतवादी हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी पोलिसांकडून काहीच उपाय झालेले नाहीत.
– किलाचंद खुपटे, रहिवासी, साठय़ेनगरपोलिसांची संख्या फार कमी
रात्रीच्या वेळी येथे फक्त एकदाच गाडी येऊन जाते. पोलिसांनी रात्रीच्या वेळी जास्त लक्ष ठेवणे गरजेचे आहे. हल्ले कदाचित रात्रीही होऊ शकतात. परंतु रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्ती पाहायला मिळत नाही. पोलिसांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे पोलिसांची संख्या वाढायला पाहिजे. दहशतवादी हल्ल्यानंतर तरी सतर्क राहण्याकरिता पोलिसांची फौैज प्रत्येक ठिकाणी असणे गरजेचे आहे.
– दीपक खरात, ज्योतिर्लिगनगर