मानखुर्दमध्ये अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण असतानाच एका नवीन संकटाला नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ ओढावली आहे.
मुंबई- मानखुर्दमध्ये अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण असतानाच एका नवीन संकटाला नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ ओढावली आहे. इमारतींची दुरवस्था झाली असून अनेक इमारती कधी पडतील, अशी अवस्था झाली आहे.
त्यामुळे म्हाडाने उभारलेल्या या इमारती धोकादायक अवस्थेत असून रहिवाशांना जीव मुठीत घेऊन वास्तव्य करावे लागत आहे. मानखुर्दला मुंबईची सुरुवात मानली जाते,पण मानखुर्दकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे स्पष्ट दिसते.
मानखुर्दमध्ये १९९० साली पंतप्रधान आवास निवास योजना म्हणजेच (पी.एम.जी.पी.) कार्यान्वित करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून इमारत क्रमांक १ ते ३४ चे बांधकाम पूर्ण झाले. या योजनेमध्ये १ ते २८ क्रमांकाच्या इमारती दोन मजली असून इतर इमारती या एक मजली आहेत. १९९०नंतर म्हाडाने जणू या इमारतींकडे दुर्लक्षच केले आहे.
१९९०नंतर फक्त २००५ ते २००६ दरम्यान इमारतीचे सुशोभिकरण म्हाडाकडून एकदाच करण्यात आले. त्यानंतर म्हाडाकडून एकही अधिकारी चौकशीसाठी आलेला नाही. म्हाडाचे सर्वत्र उपक्रम चालू आहेत, पण मानखुर्दला म्हाडाने वाळीत टाकले आहे का, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहे.
मानखुर्दमधील या इमारती पडझडीला आलेल्या असतानाही या इमारतींना धोकादायक इमारती म्हणून जाहीर करण्याचीही तसदी म्हाडाचे अधिकारी घेत नाहीत. दरवर्षी मुंबईमध्ये किमान १ ते २ इमारती पडतात. याची कारणेदेखील वेगवेगळी असतात. काही वेळेस बांधकाम बरोबर न झाल्यामुळे या इमारती ढासळतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्यातील श्रीकृष्ण इमारत, ही इमारत कोसळल्यामुळे २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तशीच अवस्था आता मानखुर्दची होणार की काय, हाच प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
कल्याणमधील मातृकृपा आणि ठाण्यातील कृष्ण इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून २१ जणांचा जीव गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने अतिधोकादायक इमारतींवरील कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. पण या आदेशाची अंमलबजावणी कितपत होणार हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे. येत्या काही दिवसांत हे कळेलच. मानखुर्दमधील या इमारतींकडे गृहनिर्माण खात्याचे मंत्री आणि राज्य सरकार कधी लक्ष देणार हा प्रश्न आहे.
मानखुर्दमध्ये आतापर्यंत चारच विकासक येऊन गेले; पण आता असे म्हणावे लागेल की, विकासकांनी देखील मानखुर्दकडे कानाडोळा केला आहे. मानखुर्दमध्ये सन २००६ दरम्यान मिडास ग्रुपचे विकासक नवीन प्लॅनसोबत आले होते, पण काही व्यवहारिक बाबींमुळे हा प्लॅन यशस्वी ठरला नाही. असेच इतर विकासकांबरोबर झाले. त्यामुळे विकासकांनीही मानखुर्दमधील लक्ष काढून घेतल्याचे दिसते.
मानखुर्दमध्ये वसाहतीकरणाबरोबर अनेक इतर समस्या आहेत याकडे स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. आजवर विकासक आणि राजकीय व्यक्ती यांचं नेहमी क्रॉस कनेक्शन असल्यामुळे मानखुर्दचा विकास होत नसल्याचे काही लोक सांगतात.
मानखुर्दमध्ये तशी गुंतवणूक करायला विकासक तयार आहेत. पण राजकीय दुफळीमुळे विकासक नाराज असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. इमारत पडून लोकांचा मृत्यू झाल्याशिवाय या इमारतींचे पुनर्विकास काम सुरू होणारच नाही, असे परखड मत स्थानिक रहिवासी दत्तात्रय पार्टे यांनी व्यक्त केले. आम्ही जीव मुठीत घेऊन मानखुर्दमध्ये राहत असल्याची खंत भूषण घाडगे यांनी व्यक्त केली.
इमारती २५ वर्षे जुन्या झाल्या, इमारतीभोवती झोपडपट्टीत वाढ झाल्यामुळे, इमारती जुन्या असल्यामुळे तडे गेलेले आहेत, सुशोभिकरण न झाल्यामुळे इमारतीबरोबर घरातही तडे गेलेले पाहायला मिळतात. विकासक आणि रहिवासी यांच्यामध्ये व्यवहारिक अडचणी असल्यामुळे म्हाडाची पुनर्विकास करण्याची मुदत ३० वर्षे असते; पण इमारती २५ वर्षातच पडझडीला आल्यामुळे, विकासक आणि म्हाडा इमारतींकडे लक्ष देत नसल्यामुळे इमारतीमध्ये अनधिकृत बांधकाम वाढतच चालले आहे. यामुळे लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो.