तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंजूर केलेले एमआयडीसीच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदरवासीयांना मिळू लागल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भाईंदर – तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंजूर केलेले एमआयडीसीच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर पाणी मिरा-भाईंदरवासीयांना मिळू लागल्याने शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात आता रोज पाणीपुरवठा होत असून शहरी भागातदेखील पाणीपुरवठय़ातील अंतराचे तास कमी झाले आहेत.
मुंबईला खेटून असलेल्या मिरा-भाईंदर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षात झपाटय़ाने वाढली आहे, परंतु शहराची तहान मात्र स्टेम प्राधिकरणाकडून मिळणा-या ८६ दशलक्ष पाणीपुरवठय़ावरच कशीबशी भागवण्याचे काम केले जात होते.
त्यानंतर एमआयडीसीच्या कोटय़ातून ३० दशलक्ष लिटर पाणी शहराला मिळू लागले आहे, परंतु शहराची गरज मात्र त्यापेक्षा जास्त असल्याने एमआयडीच्या कोटय़ातील १०० दशलक्ष लिटर पाणी देण्याची मागणी तत्कालीन महापौर तुळशीदास म्हात्रे व विद्यमान उपमहापौर नूरजहाँ हुसेन आदींनी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे केली होती.
त्या वेळी नारायण राणे यांनी मिरा-भाईंदरकरांची पाण्याची निकड लक्षात घेऊन तातडीने २० दशलक्ष लिटर पाणी देण्याचे आदेश एमआयडीसीला दिले होते. तसेच १०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्धतेनुसार मिरा-भाईंदरसाठी राखून ठेवण्याचे निर्देशदेखील राणे यांनी दिले होते.
महापालिका प्रशासनाने २० दशलक्ष लिटर पाणी मिळण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता करून निविदा मागवल्या होत्या. साकेत येथे एमआयडीसीच्या जलवाहिनीतून स्टेमच्या जलवाहिनीत पाणी उचलण्यासाठी व्हीएफडी पंप बसवण्यात आले. ऑनलाइन बुस्टिंग पद्धतीसह ओवळा ते काजूपाडा व हाटकेश ते कनकि-यादरम्यान नवीन जलवाहिनी टाकण्यात आली.
या एकूण कामापोटी सुमारे २९ कोटी रुपयांचा खर्च आल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यापासून या वाढीव पाणी घेण्याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. आता शहराला एमआयडीसीकडून आणखी २० दशलक्ष लिटर पाणी मिळू लागले आहे.
मुर्धा ते उत्तन व पेणकर पाडा ते काजूपाडा या ग्रामीण भागात आठवडय़ातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जात असे. आता वाढीव पाणी सुरू झाल्याने दर २४ तासांनी या ग्रामीण भागास पाणीपुरवठा केला जात असल्याचे वाकोडे म्हणाले. याशिवाय भाईंदर पश्चिम भागात ४८ ते ५० तासांनी होणारा पाणीपुरवठा आता ३८ ते ४० तासांनी होत आहे.
भाईंदर पूर्व भागात ५० तासांनी होणारा पाणीपुरवठा ४० ते ४२ तासांनी तर मिरा रोडमध्ये ४२ तासांनी मिळणारे पाणी आता ३८ तासांनी मिळू लागल्याचे वाकोडे यांनी सांगितले. यामुळे नागरिकांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला असून, आमदार मुझफ्फर हुसेन, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, उपमहापौर नूरजहाँ हुसेन आदींनी माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आभार मानले आहेत.
मिरा-भाईंदर शहरासाठी राखीव ठेवण्यात आलेले एमआयडीसीच्या कोटय़ातील शंभर दशलक्ष लिटर पाणीही नागरिकांना लवकर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे सावंत हुसेन म्हणाले. शहरवासीयांना अतिरिक्त पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांचे स्वाभिमान संघटनेचे संदीप राणे, मनोज राणे यांनीही आभार मानले.