‘हॅपी न्यू इयर’ तीनशे कोटी, ‘बँग बँग’ अडीचशे कोटी, ‘सिंघम रिटर्नस’ दीडशे कोटी, ‘टाइम पास’, ‘लई भारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’ काही कोटींच्या वर, आताशा कोणत्याही चित्रपटाच्या उत्पन्नांचे आकडे हे कोटीच्या खाली येतानाच दिसत नाहीत. एकापाठोपाठ एक चित्रपट येत असताना, टीव्हीवर दररोज करमणुकीचा रतीब घातला जात असताना, पाश्चात्य सिनेमाही या बाजारात त्याच दिवशी प्रदर्शित होत असताना हे इतके उत्पन्न चित्रपटांना होत असते. गेल्या काही वर्षापूर्वी एखाद्याच चित्रपटाच्या नशिबी असं विक्रमी उत्पन्न असायचं. आताशा येणा-या जवळ जवळ प्रत्येक सिनेमाचे उत्पन्नाचे आकडे चांगले येत आहेत. सर्वसाधारणपणे मोठा कलाकार नसलेले चित्रपटही किमान काही कोटींपर्यंत जात आहेत. या नव्या ट्रेंडचा घेतलेला हा आढावा.
चित्रपटसृष्टीत सर्वाधिक महत्त्व असते ते चित्रपटाच्या दिसण्याला. ज्याला व्हिजुयल ट्रिट म्हणता येईल, अशा गोष्टींनी सर्वच चित्रपटांची कथा काही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडतच असेल असं सांगता येत नाही. मात्र या चित्रपटाच्या दिसण्याला आताशा महत्त्व आहे. यामुळे हा चित्रपट आपल्या प्रेक्षकांना काही तास त्यांच्या खुच्र्याना खिळवून ठेवू शकतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हॅपी न्यू इयर या चित्रपटाचं उदाहरण यासाठी बोलकं आहे. या चित्रपटाच्या कथेत तसं पाहायला गेलं तर फार लोकविलक्षण असं काही नाही. कलाकारांच्या अभिनयातही विशेष असं काही नाही की जेणेकरून त्यांच्यासाठी चित्रपट पाहायला जावं. मात्र या चित्रपटाच्या दृश्यांची सफाई जोरदार आहे. या चित्रपटात वापरण्यात आलेल्या दुबईला व त्याच्या दृश्यांनाही या चित्रपटाच्या यशात मोठं स्थान आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं कॅमे-याचं काम अनेक गोष्टी या आपोआप सुसह्य करून टाकत असतो. या चित्रपटाच्या संगीतात विशेष दम नसला तरी ही गाणी जेव्हा आपण पडद्यावर पाहत असतो, त्यावेळी आपली त्यात तंद्री लागतेच लागते. आपल्या प्रेक्षकांना कोणत्या गोष्टी कशा प्रकारे दाखवायच्या याचाही विचार आताशा हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये होऊ लागला आहे. एकटा शाहरूख खान त्याच्या चित्रपटात कशा प्रकारे दिसावा यासाठी हॉलिवुडमधली एक एजन्सी काम करत असते. त्याची एन्ट्री कशी असेल, कोणत्या प्रसंगात कोणता अँगल वापरला तर त्याचा प्रेक्षकांवर चांगला परिणाम होऊ शकेल, याचा आता शास्त्रोक्त विचार सुरू झाला आहे. हा विचारच चित्रपटाच्या दृश्यमानतेला पोषक होत असल्याचं मत या क्षेत्रातले जाणकार व्यक्त करत आहेत.
एक काळ असा होता की भारतीय चित्रपट केवळ भारतीय बाजारपेठेतच प्रदर्शित होत असतं. आताशा भारतीय बाजारपेठेच्या कक्षा रुंदावल्याचे दिसून येत आहे. याआधी भारतीय चित्रपट व त्यातही काही कलात्मक चित्रपट हे केवळ काही आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकताना दिसत असतं. मूळ भारतीय प्रेक्षकांनाही आपल्या देशातले चित्रपट पाहण्यासाठी केवळ सीडी किंवा कॅसेटवरच अवलंबून राहावे लागत असे. आता भारतीय चित्रपट हे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित होताना दिसतात. काही देशांमध्ये भारतीय चित्रपटांचे प्रीमिअरही आयोजित होताना दिसतात. हॅपी न्यू इयर या चित्रपटात दुबई या देशाचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे हा चित्रपट संपूर्णपणे दुबईतच चित्रित झालेला आहे. या चित्रपटाच्या दुबई इथल्या प्रीमिअरला अनेक दिग्गजांनी हजेरी लावलेली दिसून आली. या चित्रपटाबरोबरच अनेक चित्रपटांनी आपल्या चित्रपटांचे प्रीमिअर हे विविध देशांमध्ये केलेले आहेत. केवळ एका शोपुरतेच प्रदर्शत न होता त्या त्या देशांमध्ये थेट चित्रपटगृहांमध्येही हे चित्रपट प्रदर्शित होताना दिसून येतात. त्यांना केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी नागरिकांचीही चांगली दाद मिळताना दिसत आहे. याचाही सारा परिणाम या चित्रपटांच्या उत्पन्नांवर होताना दिसतो. संगणकाच्या व इंटरनेटच्या माध्यमातून अनेक नवे चित्रपट पाहण्याची संधीही आताशा परदेशस्थ भारतीयाना मिळत आहे. पायरसीमध्ये वाया गेलेलं उत्पन्न या माध्यमातून निर्मात्यांना मिळत असल्याचं दिसून येतं.
विलक्षण लोकेशन्स
आताच्या चित्रपटातल्या नजरेत भरणा-या गोष्टींमध्ये या चित्रपटाच्या लोकेशनचाही मोठा सहभाग असतो. संपूर्णपणे केवळ भारतातच चित्रित झालेला व्यावसायिक चित्रपट आताशा विरळाच झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर बॉलिवुडची वाढत चाललेली लोकप्रियता पाहता आता बॉलिवुडमधून आपल्या देशाचे दर्शन लोकांना घडावे अशी इच्छा अनेक देश बाळगून आहेत. त्यासाठी भारतीय निर्मात्यांना सध्या परदेशात लाल पायघडय़ा घातल्या जात असल्याच पाहायला मिळत आहे. याचा थेट परिणाम या चित्रपटाच्या दृश्यमानतेवर होताना दिसून येतो. चित्रपटाचा संपूर्ण जॉनरच वाढवणा-या या गोष्टींनी आताशा प्रेक्षकांच्याही डोळय़ांना मेजवानी मिळत असल्याचं दिसून येत आहे. काही मारधाडीच्या दृश्यांसाठी विशिष्ट देशातल्या लोकवस्तींचा केलेला वापरही नजरेला सुखावून जाताना पाहायला मिळत आहे. याचबरोबर आजकाल अनेक पाश्चात्य तंत्रज्ञही भारतीय व खासकरून बॉलिवुडचे चित्रपट करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या चित्रपटांच्या दर्जात जबरदस्त वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. याचा फायदाही बॉलिवुडला होताना दिसतो.
संगणकाचा वापर
एक काळ असा होता की, जेव्हा दिग्दर्शकाला आपला चित्रपट पहिल्या रॉकटच्या वेळीसच दिसून यायचा. त्याआधी आपल्या चित्रपटातल्या दृश्यांचे किमान चित्रीकरण तरी कसे झाले आहे हेही त्याला माहीत नसे. आता काळ बदलला आहे. संगणकांने आता हे क्षेत्र पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतले आहे. आता चित्रपटाच्या केवळ चित्रीकरणाचा तिथल्या तिथे मॉनिटरवर तर पाहता येतेच येते त्याचबरोबर या चित्रीकरणातल्या अनेक गोष्टींना सुधारण्याची संधीही मिळते. एकेकाळी ज्या चुकांसाठी पुन्हा चित्रीकरण करण्याशिवाय पर्याय नसे त्या गोष्टीही आता केवळ बसल्याजागी संगणकाच्या सहाय्याने सुधारण्यात येत आहेत. हे तंत्र चित्रपटाच्या दृश्यांमध्ये व त्याच्या ध्वनींमध्येही वापरण्यात येत आहे. आता या सा-या गोष्टींचा चित्रपटाच्या यशाशी काय संबंध असा जर विचार येत असेल तर आता चित्रपट पाहण्यातले सर्वच व्यत्यय नाहीसे झाले आहेत, असं आपल्याला सहज म्हणता येईल.
सुखकर अनुभव
चित्रपट पाहण्याच्या अनुभवातही आता सुधारणा झाल्याचं दिसून येत आहे. मल्टीप्लेक्समुळे व त्यात देण्यात येणा-या विविध सुविधांमुळे चित्रपट पाहण्याचा अनुभव काहीसा खर्चिक असला तरीही तो अधिक सुखकर असल्याचा अनुभव आहे. एकाच ठिकाणी असलेल्या अनेक पर्यायांमुळे सिंगल स्क्रिनमधले चित्रपट मुकण्याचा धोका कमी झाला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून होत असलेल्या तिकीट विक्रीमुळे आताशा तिकीट काढणे वा इतर गोष्टींसाठी होणारा त्रास वाचल्यामुळेही मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट पाहणा-यांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. सिंगल स्क्रिनमध्येही आताशा तिकीट खिडकीवर चांगली गर्दी दिसून येत आहे. चांगल्या निर्मितीमूल्यांमुळे अनेक प्रेक्षक आपल्या मनोरंजनासाठी पुन्हा चित्रपटांकडे वळल्याचे एक सकारात्मक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याचा परिणाम या चित्रपटांच्या यशावर होताना दिसून येत आहे.
जनसंपर्काचे तंत्र
चित्रपटांच्या वाढलेल्या प्रेक्षकसंख्येला कळत नकळत जनसंपर्काचं नवे तंत्रही कारणीभूत होताना दिसून येतं. आपल्या चित्रपटांसाठी कोणी कोणत्या भागात फिरावं, कोणत्या पद्धतीने या चित्रपटाची हवा तयार करावी, याचा शास्त्रोक्त विचार होताना दिसतोय. साध्या टीव्ही कार्यक्रमात लागणारी कलाकारांची हजेरी योजनाबद्ध पद्धतीने होते. त्याचप्रमाणे ज्या नायकाचा चित्रपट येणार असतो नेमके त्याचेच इतर चित्रपट विविध मूव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात येत असतात. या कलाकाराची आठवण या निमित्ताने प्रेक्षकांना करून दिली जाते. त्याचप्रमाणे सध्या हिदी चित्रपट कलाकार या निमित्ताने सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये मिसळताना दिसतात. त्याचाही एक सकारात्मक परिणाम या चित्रपटाच्या यशावर होतो. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी अनेक उत्पादन कंपन्याही आपल्या खास उत्पादन श्रेणी बाजारात उतरवत असतात. या कार्यक्रमांनाही ही कलाकार मंडळी हजेरी लावत असतात. चित्रपटाच्या निमित्ताने कलाकारांच्या आयोजित करण्यात येणा-या मुलाखती, त्याच्याविषयीच्या विविध बातम्या यांच्या माध्यमातूनही त्यांच्या चित्रपटाची चांगली हवा आजकाल तयार करण्यात येत असते. हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख ही जवळजवळ वर्षभर आधीच ठरत असल्याने जनसंपर्क सांभाळणा-या संस्थांनाही अनेक योजना आखता येत असल्याचं दिसून येत आहे. या सा-या घटकांचाही चित्रपटांच्या उत्पन्न वाढीवर सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे.
मराठी चित्रपटांमध्येही चांगला बदल
कोणत्याही बदलणा-या व्यवसायाचा इतर भाषिक चित्रपटांवरही चांगला परिणाम होत असतो. सध्याच्या काळात याचाच फायदा हा मराठी चित्रपटांनाही होताना दिसत आहे. ऑनलाइन व इतर माध्यमातून होणा-या प्रसिद्धीमुळे आताशा मराठी चित्रपटांची प्रेक्षकसंख्या व उत्पन्नांच्या आकडय़ात भर पडल्याचं दिसून येत आहे. यात काही चांगल्या चित्रपटांनी निर्माण केलेल्या वातावरणाचेही श्रेय अधोरेखित करावे लागेल. सर्वच मराठी चित्रपटांकडे प्रसिद्धीच्या बाबतीत पूर्ण जागरूकता नसते. आपल्या चित्रपटाला चांगली प्रसिद्धी कशी मिळू शकेल याची जाणीव नसल्यानेही अनेक चित्रपटांना त्याचा फटका बसत असला तरी अनेक निर्माते याबाबत सजग झाल्याचे दिसून येत आहे. येत्या काही काळात यात अधिक भर पडून मराठी चित्रपटही कोटीच्या कोटी उड्डाणांमध्ये सातत्य राखू शकेल, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी तर आपला प्यारवाली लव्ह स्टोरी हा चित्रपट थेट अमेरिकेत प्रदर्शित करून मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा पायंडा पाडल्याचे दिसून येत आहे.