मराठीच नव्हे तर हिंदी प्रेक्षकांचाही आवडता कलाकार असलेला सिद्धार्थ जाधव, लवकरच ‘प्रेमाचा झोलझाल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये त्याने भरपूर आघाडी घेतलीय. पूर्वी पत्रकार असलेल्या सीमा उपाध्याय या चित्रपटाच्या निमित्ताने निर्मितीक्षेत्रात उतरत आहेत. या दोघांशीही त्यांच्या चित्रपटाविषयी मारलेल्या गप्पांमधून जाणवली ती त्यांच्यातली एक तळमळ.
‘‘प्रेमाचा झोलझाल’ ही माझ्या कारकिर्दीतली एक महत्त्वाची भूमिका आहे. ती करताना जितका आनंद झाला तितकीच या जबाबदारीची जाणीवही होती की, हा चित्रपट माझ्या खांद्यावर पेललेला आहे,’’ सिद्धार्थ जाधव त्याच्या भूमिकेविषयी भरभरून बोलत असतो. आपल्या कोणत्याही चित्रपटावर भरभरून प्रेम करणारा व त्याविषयी तितकाच भरभरून बोलणारा असा त्याचा स्वभाव आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आपण अधिकाधिक वेळ दिला पाहिजे, याची जाणीव त्याच्या मनात आहे. आपल्या कारकिर्दीत भरत जाधवला आपला आदर्श मानणा-या सिद्धार्थला आज त्याच्यापाठोपाठ महत्त्व आहे. कोणत्याही मोठय़ा कलाकाराची ओळख होते ती त्याच्या भूमिकांच्या वैविध्यपूर्ण अशा निवडीतून. ही गोष्ट तोही पाळत असतो. ‘‘आज मी अशा एका वळणावर येऊन पोहोचलो आहे, की मी भूमिकांची निवड करू शकतो. त्यांची लांबी-रुंदी बघण्यापेक्षा त्या कथानकाचा एकंदरीत प्रभाव काय आहे, याचा मी विचार करतो. या चित्रपटाच्या बाबतीतही मी हेच केलं.’’
संभाषणाची सूत्रं आपल्याकडे घेत निर्मात्या सीमा उपाध्याय सिद्धार्थबरोबरचा त्यांचा अनुभव सांगतात, ‘‘या कथेवर चित्रपट करायचा आम्ही ठरवलं तेव्हा या भूमिकेसाठी पहिलं नाव डोळ्यासमोर आलं ते सिद्धार्थ जाधवचं. एक तर त्याच्याशी संपर्क साधणंही आम्हाला सोपं गेलं. कधी कधी एखाद्या कलाकारापर्यंत जाता जाता निर्मात्याचे अनेक दिवसच नाही कधी कधी मूडही निघून जातो. सिद्धार्थने कोणतेही आढेवेढे न घेता कॉमेडी सर्कसच्या सेटवर आम्हाला बोलावलं. तिथे त्याने चांगला वेळ दिला. त्या वेळी दिग्दर्शक मनोज कोटियन याने त्याला चित्रपट व त्याची भूमिका समजावून सांगितली. त्यावरही त्याने संहिता मला वाचावी लागेल, असं सांगितलं व आमची पहिली मीटिंग संपली. त्यानंतरही त्याने अगदी सांगितल्या दिवशी मी ही भूमिका करत असल्याचं सांगितलं. चित्रीकरण प्रक्रियेच्या पहिल्याच दिवसापासून तो आम्हा सगळ्यांशी अशा प्रकारे वागायचा की, त्याची व आमची अनेक वर्षापासूनची मैत्री आहे, असंच वाटावं. चित्रपट चांगला करण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यासाठी तो सदैव तयार असायचा. एकदा तर चित्रपटाच्या सेटवर त्याचा छोटा अपघात झाला. एक पायरी चुकल्यामुळे त्याचा पाय मुरगळला. मात्र तशाही परिस्थितीत त्याने त्या दिवसाचं चित्रीकरण पूर्ण केलं. त्यानंतर तो दुस-या एका कामासाठी पुण्यालाही आला. सगळी कामं आटोपल्यावरच त्याने आपल्या पायावर उपचार केले. त्याचबरोबर दुस-या दिवशीच्या चित्रीकरणालाही तो उपस्थित राहिला. त्याच्या जागी जर हिंदीतला कुणीही कलाकार असता तर आमचं चित्रीकरण आठ-दहा दिवस तरी थांबलं असतं.’’
‘‘माझ्याकडे जेव्हा कोणीही नवा निर्माता येतो तेव्हा मला त्याची चित्रपट करण्याची आवड दिसून येते. ज्या चित्रपटाशी माझं नाव जोडलं गेलं असेल त्या चित्रपटाच्या एकंदरीत प्रभावाचा विचार करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. काही गोष्टी मला माहीत असतील तर त्या ज्यांना माहीत नाही त्यांच्याशी शेअर करणं, त्यांना त्या समजावून सांगणं मला आवडतं. मी हे माझ्या अगदी पहिल्या नाटकापासूनच करत आलो आहे. मला ही जी चित्रपट करण्याची संधी मिळते ती मला फार मोठी वाटते. मी अगदी एकांकिका वगैरे करून आलेलो आहे. त्या वेळी त्या लहानशा एकांकिकेसाठी आम्ही एवढी मेहनत करायचो की, त्तेव्हा चित्रपटासाठीही आपण तेवढीच मेहनत करायला हवी.’’ अशी माझी यामागची भूमिका असल्याचं सिद्धार्थ सांगतो.
या चित्रपटातल्या माझ्या भूमिकेविषयी मला जेवढं सांगता येतंय, त्यावरून मी सांगतो की, हा एक पैशांसाठी काही ना काही करणारा माणूस आहे. तो अगदी चो-यामा-या करणारा, याची टोपी त्याला व त्याची याला करणारा तरुण आहे. त्याच्याच व्यवसायवृद्धीसाठी तो शेवटी एक बुवा होण्याचं ठरवतो. त्यानंतर त्याच्या व त्याच्याशी संबंधित असणा-या लोकांच्या जीवनात काय काय बदल होतो ते सांगण्याचा प्रयत्न या चित्रपटातून आम्ही केला आहे. तो विनोदी पद्धतीने आहे हे वेगळं सांगायला नकोच. त्यात आमच्या इतर कलाकारांनीही अगदी जीव ओतून काम केलं आहे, याची मात्र खात्री मी सहज देऊ शकतो.
चित्रपटातल्या इतर कलाकारांच्या सहकार्याविषयीही निर्मात्या सीमा उपाध्याय अगदी भरभरून बोलतात. ‘‘आम्ही जेव्हा या चित्रपटाची पत्रकार परिषद सोलापुरात ठेवली होती. तेव्हा विजय पाटकर हे खास त्यांचं एक चित्रीकरण आटपून तिथे आले होते. त्यानंतर ते रातोरात पुन्हा गेले. त्यांची या चित्रपटाशी तितकी जवळीक नसती तर ते पत्रकार परिषदेला आलेही नसते. मात्र इतका प्रवास करूनही ते आले. त्याचबरोबर चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असतानाही त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं. ते इतके मोठे कलाकार आहेत, तरीही त्यांनी आपल्या व इतरांच्या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतली. ते चित्रपट महामंडळाशी संबंधित असल्याने त्याबाबतीतही त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. इतर कलाकारांनीही तशाच प्रकारचं सहकार्य आम्हाला केलं.’’
‘‘मी आतापर्यंत भरपूर काम केलं. अगदी आघाडीच्या इंग्रजी दैनिकात पत्रकारिता केली. त्यानंतर पब्लिक रिलेशन एजन्सीत काम केलं. काही आंतरराष्ट्रीय प्रकल्पही मी सांभाळले. त्या सगळ्याच कामांमध्ये मला जो आनंद मिळाला, तोच मला हा चित्रपट करतानाही मिळाल्याचं त्या सांगतात. त्यामुळेच पुढचा चित्रपटही मराठीच करण्यावर मी ठाम आहे.’’
आमचे आमच्या चित्रपटाविषयी फार मोठे दावे नाहीत. मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी घटका दोन घटका या चित्रपटासोबत प्रेक्षकांनी आनंद घ्यावा व मनमुराद हसावं अशी आमची इच्छा असल्याचं हे दोघंही सांगतात.