कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही भागात पुर परिस्थिती असून मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
सिंधुदुर्ग/रत्नागिरी/रायगड – कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा जलमय झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर आणि नागोठणे येथे तिघे जण पुरात वाहून गेले आहेत. संगमेश्वर तालुक्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पुरामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खारेपाटण येथे ३० ते ३५ घरे पाण्याखाली गेली आहेत. वरवडे येथील ८ ते १० घरांमध्ये पाणी घुसले होते. तिरवडे खिंड-खारेपाटण भुईबावडा मार्गावर दरड कोसळून हा मार्ग बंद झाला आहे. अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे राजापूरची बाजारपेठ जलमय झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. कोकण रेल्वेच्या गाडय़ा पाच तास उशिराने धावत आहेत तर अनेक मार्गावरील एसटीची वाहतूक बंद झाली. जिल्ह्यातील महामार्गावर पाण्याचे साम्राज्य पसरले असून तुरळ व धामणी परिसरातील घरे व दुकाने पाण्याखाली गेली होती. संगमेश्वर तालुक्यात तरुण व विद्यार्थिनी ओढय़ातून वाहून गेले आहेत, तर धामणी गावात ११ जणांचे जीव वाचवण्यात यश मिळाले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पोलादपूर आणि नागोठणे येथे तिघे जण पुरात वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कडसुरे पुलावरून दोघे जण वाहून गेलेल्यांपैकी एकाचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. दुस-या घटनेत अलिबाग तालुक्यातील रामराज येथील वासंती सुभेकर ही महिला पुराच्या पाण्यातून वाहून गेली. तिस-या घटनेत पोलादपूर तालुक्यातील आकाश रिंगे हा तेरा वर्षाचा मुलगा पुरात वाहून गेला.
येत्या २४ तासात आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. शक्यतो मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
शाळकरी मुलगा वाहून गेला
पोलादपूर तालुक्यातील लहुळसे येथील आकाश गोपाळ रिंगे हा १३ वर्षीय मुलगा शाळेतून घरी परत येताना ओढ्याजवळ अचानक पाण्याचा लोंढा आल्याने वाहून गेला. त्याचे प्रेत हळदुले गावालगत नदी किनारी सापडल्याचे तहसीलदार रामदास सायगावकर यांनी सांगितले.
दरम्यान, चिपळूण ते रत्नागिरी दरम्यान आरवलीजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, पाली, सुधागड तालुक्यात मंगळवारी सकाळपासून संततधार पावसामुळे पूर परिस्थिती आली आहे. रोहा तालुक्यात पावसाचा जोर वाढत आहे. तसेच रोहा शहरातील त्रिमूर्तीनगर, परमारनगर, बाजारपेठ, दमखाडी भागात पाणी शिरले.
कोकण रेल्वे वाहतूक सुरळीत
आरवलीजवळ रेल्वे रुळांवर माती आल्याने कोकण रेल्वेची वाहतूक बंद पडली होती, मात्र तातडीने कामे करुन माती अडवण्यात आली असून कोकण रेल्वेची वाहतूक आता सुरळीत असल्याचे कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक रस्त्यावर विश्वनाथ विद्यालयासमोर दरड कोसळून शहराच्या मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. दरड हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
गोव्यातही दरड कोसळली
गोवा- कर्नाटक महामार्गावर अन्मोद घाटातही मंगळवारी रात्री दरडी कोसळल्याचे वृत्त आहे. गोवा चेकपोस्ट पासून सहा किलोमीटर अंतरावर पहाटे दोनच्या सुमारास दगड आणि माती रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक कोलमडली आहे. जिल्हाधिकारी एन. डी. अगरवाल आणि मदत पथक घटनास्थळी पोहचले असून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
[EPSB]
रायगडमध्ये धो धो!
मुंबई-ठाण्यात विश्रांती घेणा-या पावसाने रायगड जिल्ह्यात धो-धो बरसण्यास सुरुवात केली आहे.
[/EPSB]