केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच कौशल्य विकास, मेक इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट गाव योजना, स्वच्छ कॉलेज अभियान आदी घोषणा आणि तरतुदी असलेला मुंबई विद्यापीठाचा मोदी छाप अर्थसंकल्प सोमवारी जाहीर झाला.
मुंबई – केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाप्रमाणेच कौशल्य विकास, मेक इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट गाव योजना, स्वच्छ कॉलेज अभियान आदी घोषणा आणि तरतुदी असलेला मुंबई विद्यापीठाचा मोदी छाप अर्थसंकल्प सोमवारी जाहीर झाला. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ६३९ कोटी ५४ लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर केला. केंद्राकडून मिळालेले कर्मचा-यांचे २८ महिन्यांचे वेतन आणि संलग्न महाविद्यालयांकडून थकित रकम जमा झाल्याने यावेळच्या अर्थसंकल्प शिलकीचा ठरल्याची माहिती अर्थसंकल्पानंतर कुलगुरूंनी दिली.
विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात नव्या घोषणा आणि नवीन कार्यक्रमांवर केंद्र सरकारच्या योजनांची छाप असलेल्या या अर्थसंकल्पात विद्यापीठाकडून शैक्षणिक कार्यक्रमांचा डिजिटल गाजावाजा करण्यात आला. ज्या ठिकाणी विद्यापीठाचे क्षेत्र नाही अशा स्मार्ट गाव योजनेसाठीही ५० लाखांची तरतूद करून कुलगुरूंनी राज्य व केंद्र सरकारला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासोबच केंद्राच्या योजनांप्रमाणे स्वच्छ कॉलेज अभियानासाठीही ५० लाख आणि कौशल्य विकास केंद्रासाठी दोन कोटी, मेक इन इंडिया केंद्र उभे करण्यासाठी २ कोटी ८० लाख, डिजिटल विद्यापीठासाठी २ कोटी, ऑनलाईन डायनॅमिक शिक्षण केंद्रासाठी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.
विद्यापीठाने घोषणा केलेल्या नवीन योजना आणि उपक्रमांत अनेक योजना या माजी कुलगुरूंच्या काळातील असल्या तरी त्याला नवीन मुलामा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर पाणथळ जागा, आणि वनस्पतीशास्त्र उद्यानासाठी प्रत्येकी एक कोटीची तरतूद करून कुलगुरूंनी आपल्या आवडत्या विषयासाठीची सोय केल्याची टीका माजी सिनेट सदस्यांकडून करण्यात आली.
विद्यापीठाच्या या अर्थसंकल्पात शैक्षणिक विकासाच्या अनेक योजनांसाठी केवळ ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इतक्या कमी तरतुदीमुळे विद्यापीठ कोणते संशोधन करणार आहे, असा सवालही यामुळे उपस्थित होत आहे.
झारापमध्ये कौशल्य विकास केंद्र
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथे कौशल्य विकास केंद्रासाठी १ कोटी रुपयांची तरतूद विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून येथे सिंधू स्वाध्याय केंद्राच्या अंतर्गत सागरी विज्ञानविषयक अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी सरकारकडून २५ एकर जागा दिली जाणार असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. तसेच पालघर येथेही कौशल्य विकास केंद्रासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
भाषणबाजीसाठी २ कोटी ७० लाख
मुंबई विद्यापीठाचा १८ जुलै २०१६ रोजी १६० वा वर्धापन दिवस असून या निमित्त या अर्थसंकल्पात २ कोटी ७० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात चर्चासत्र, कार्यशाळा, भाषणे, प्रकाशने, भाषणांची मालिकेसाठी इतका मोठा निधी खर्च केला जाणार असल्याने याविषयी येत्या काळात मोठय़ा प्रमाणात या अर्थसंकल्पावर टीका होण्याची शक्यता आहे. यात विद्यापीठाने कोणाची ‘सोय’ केली आहे काय, असा सवाल माजी सिनेटकडून उपस्थित करण्यात आला आहे.
उद्योगपतींचा थेट हस्तक्षेप वाढणार
मुंबई विद्यापीठाकडून जाहीर केलेल्या मेक इन इंडिया केंद्र, विद्यार्थी व्यवसाय मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास, स्वच्छ महाविद्यालय आदी योजनांसाठी बडय़ा उद्योगपती आणि भांडवलदारांची मदत घेतली जाणार आहे. यामुळे येत्या काळात विद्यापीठाच्या अनेक कामकाजांवर उद्योगपतींचा थेट हस्तक्षेप वाढण्याची शक्यताही यामुळे निर्माण झाली आहे.