मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात या महिन्यात नव्याने दाखल होत असलेल्या १६ आगीच्या बंबांचे (फायर इंजिन) उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे यासाठी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून महापौरांना पत्र पाठवण्यात आले आहे.
मुंबई – मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात या महिन्यात नव्याने दाखल होत असलेल्या १६ आगीच्या बंबांचे (फायर इंजिन) उद्घाटन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हावे यासाठी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयातून महापौरांना पत्र पाठवण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात या पत्राला महापौरांनी केराची टोपली दाखवल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महापालिका कारभारात मुख्यमंत्र्यांच्या वाढलेल्या लुडबुडीमुळे या बंबांचे श्रेयही भाजपाच्या पारडय़ात घेण्याचा डाव लक्षात येताच महापौरांनी आपल्या अधिकारात मुख्यमंत्र्यांच्या या इच्छेवर विरजण टाकले असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यातील आगीचे बंब (फायर इंजिन) परिवहन विभागाच्या नियमानुसार भंगारात निघाले आहेत. त्यांच्या जागी महापालिकेने १६ नव्या बंबांची खरेदी केली आहे. या बंबांच्या खरेदी प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी दिल्यानंतर या बंबांची बांधणी आणि पुरवठा करण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश दिले आहेत. यानुसार हे सर्व बंब या महिन्यात अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल होत आहेत.
त्यामुळे या बंबांचे उद्घाटन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु आजवर अशा प्रकारचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते केले जाते. या वेळी भाजपाची नेतेमंडळीही उपस्थित राहतात. पण या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. परंतु यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना बोलावता येत नसल्यामुळे, पण मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहायचे असल्याने त्याप्रमाणे कार्यक्रम आयोजित करावा, असे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातून महापौरांना पाठवल्याची माहिती मिळत आहे.
दोन दिवसांपूर्वी पाठवलेल्या या पत्राबाबत महापौरांनी महापालिकेतील शिवसेना नेत्यांना प्रथम कल्पना दिली. यानंतर ‘मातोश्री’लाही याची कल्पना देण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पत्राला उत्तर न देण्याचा संदेश महापौरांना मिळाल्याने त्यांनी पत्राला केराची टोपली दाखवल्याचे समजते. इमारत प्रस्ताव विभागाच्या परवानगीचे सुसूत्रीकरण करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार असताना प्रत्यक्षात उद्धव ठाकरे नसताना प्रशासनाने हे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले. यावरून प्रशासनासह भाजपाविरोधात शिवसेना नेत्यांकडून चीड व्यक्त करण्यात आली. त्यातच मोकळ्या जागा खासगी संस्थांना देण्याच्या धोरणाला महापालिकेत मंजुरी दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांच्या स्थगितीमुळे ही चीड वाढली आहे. मुख्यमंत्री महापालिकेच्या निर्णयांमध्ये थेट लुडबूड करत असल्यामुळे त्यांना जागा दाखवून देण्याचा निर्धार शिवसेनेने केला आहे.