२६/११ च्या हल्ल्यानंतर सरकारने कोटयवधी रुपये खर्च करून शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले होते. मात्र, यापैकी बहुतेक रेल्वे स्थानकांवरील मेटल डिटेक्टर बंद आहेत.
मुंबई- २६/११ च्या हल्ल्यानंतर सरकारने कोटयवधी रुपये खर्च करून शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षेसाठी मेटल डिटेक्टर बसवण्यात आले होते. मात्र, यापैकी बहुतेक रेल्वे स्थानकांवरील मेटल डिटेक्टर बंद आहेत. तर, काही ठिकाणी दोन मेटल डिटेक्टरमध्ये मोठी जागा सोडण्यात आली आहे. गर्दीच्या वेळी प्रवासी मेटल डिटेक्टरपेक्षा या मधल्या जागेतूनच जात असल्याचे पाहायला मिळते.
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहरातील रेल्वे स्थानक व महत्त्वाच्या ठिकांणी मेटल डिटेक्टर व सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. एखाद्या प्रवाशाकडे काही संशयास्पद वस्तू असल्यास ते मेटल डिटेक्टरद्वारे लगेच कळू शकेल, असा दावा पोलिसांकडून करण्यात येत होता. मात्र, प्रवाशांचा लोंढा पाहता मेटल डिटेक्टरद्वारे त्यांची तपासणी करणे अशक्य होत आहे. आता तर काही स्थानकांमधील मेटल डिटेक्टर बंद झाल्याने हलवण्यात आली आहेत. त्या जागी रेल्वे पोलिसच प्रवाशांच्या वस्तूंची तपासणी करतात. मात्र, हे पोलिसही एका जागेवर बसून काम करत असल्याने या सुरक्षा व्यवस्थेचा मुंबईकरांना काहीच उपयोग होत नसल्याचे उघड झाले आहे.