पाऊस डोक्यावर आल्यानंतरही ‘म्हाडा’ने यंदा जाहीर केलेल्या आठ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारती रिकाम्या करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही.
मुंबई – पाऊस डोक्यावर आल्यानंतरही ‘म्हाडा’ने यंदा जाहीर केलेल्या आठ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारती रिकाम्या करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळय़ात एखादी मोठी दुर्घटना घडण्याच्या भीतीने या इमारतींत राहणा-या शेकडो रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.
७ जूनपर्यंत या इमारती रिकाम्या करण्याचे ‘म्हाडा’ने जाहीर केले होते. मात्र यंदाही कासवगती कारभाराचा कित्त गिरवत म्हाडाने कोणत्याही हालचाली सुरू न केल्याने तीव्र नारजी व्यक्त होत आहे.
२३ मे रोजी म्हाडाने अतिधोकादायक इमारती जाहीर केल्या असल्या तरी पावसाळापूर्व या इमारतींमधील रहिवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात कुचुराई दाखवण्यात आल्याचा आरोप होत आहे. पावसाळापूर्व धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करणे बंधनकारक असताना ‘म्हाडा’ने या संदर्भात साधी प्रक्रिया सुरू केलेली नाही.
केवळ रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटिसा बजावण्याचे काम केले आहे. मात्र इमारती रिकाम्या करण्याबाबत कोणत्याच हालचाली होताना दिसत नाहीत. या संदर्भात मोघम उत्तरे देणा-या म्हाडाच्या अधिकारी वर्गामुळे रहिवाशांत संताप व्यक्त होत आहे.
इमारती रिकाम्या करण्यापूर्वी रहिवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्याबद्द म्हाडाकडून ठोस उत्तर मिळत नाही, तोपर्यंत रहिवासी इमारत सोडण्यास तयार होत नाहीत ही मुख्य अडचण आहे. अतिधोकादायक इमारतींत राहणा-या रहिवाशांबरोबर या भागातून येणा-या-जाणा-यांची गर्दी प्रचंड असल्याने मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. अतिधोकादायक इमारती खाली करण्यास आणखी किती दिवस लागतील, याचे समाधानकारक उत्तरही अधिका-यांकडून मिळत नाही.
दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी महिनाभरापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची जागा अद्याप रिक्त आहे. त्यामुळे त्यांचा अतिरिक्त भार सहमुख्य अधिका-यांवर सोपवण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे इतर जबाबदा-या असल्याने धोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत चालढकल सुरूच आहे.
पुनर्विकास रखडल्याने स्थलांतर लांबणीवर
‘म्हाडा’च्या सुमारे १४ हजार उपकरप्राप्त इमारती असून त्यातील जवळपास सर्वच इमारती जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. ‘म्हाडा’कडून दरवर्षी या इमारतींचे पावसाळय़ापूर्वी सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर होते. यंदा आठ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक जाहीर करण्यात आल्या असून त्यातील तीन इमारती मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीतीलच आहेत. या इमारतींत २१५ निवासी व २१० अनिवासी रहिवासी आहेत. इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षापासून रखडल्याने रहिवासी तात्काळ इमारती सोडण्यास तयार होत नाहीत. मागील वर्षी धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी ‘म्हाडा’ला सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. यंदा इमारतींची संख्या कमी असली तरी त्या रिकाम्या करण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे वेळ जाणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत रहिवाशांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या इमारतीमधील २१ अधिकृत रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित केले जाईल. या महिनाअखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.
– डॉ. रमेश सुरवाडे, सहमुख्य अधिकारी